Tuesday, May 1, 2018

कृपामेघ बरसला भूमिवर! अध्याय २ - सांख्य योग्य

खरा धर्म जर कळला नाही कर्म कसे ते घडणार?
देहच मी अज्ञान मनाचे लयास कैसे जाणार? १

शोक न करणे योग्य अशाच्या शोकी अर्जुन बुडलेला
पांडित्याच्या गोष्टी हरिला रणात सांगत सुटलेला!२

कृष्णाच्या उपदेशासाठी अर्जुन निमित्त झालेला
कृपामेघ बरसला भूमिवर जो तो मानव धालेला!३

आत्मा असतो नित्य सत्य हे तनु येई तैशी जाई
स्वधर्म ध्यानी धरूनि पार्था झुंज रिपूंशी तू घेई!४

धर्मोचित हे युद्ध पांडवा जरी न आता करशील
उपहासाला जगात अवघ्या पात्र इथे तू ठरशील!५

'मी कर्ता' हे नकोस समजू अज्ञाने या बेजार
नसत्या शंका काढुनि पार्था वाढविशी तू आजार!६

प्रसन्नतेच्या योगे दुःखे बघता बघता सरतात
सोशिकता तर अशी वाढते भूमाता तो साक्षात!७

प्रज्ञा ज्याची स्थिरावलेली कसा वागतो वदे कसा
हरी तयाच्या हृदयमंदिरी, विश्वसखा तो भक्त असा!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment