Saturday, September 21, 2019

स्पर्शे विटाळतो तो देव नव्हे..दारे जो लावितो तो धर्म नव्हे!

स्पर्शे विटाळतो तो देव नव्हे
दारे जो लावितो तो धर्म नव्हे!ध्रु.

मन ज्याचे संकुचित तोच हो पतित
धर्मबांधवा झिडकारी तोच हो पतित
खरा देव सर्वजणांना उरी लावताहे!१

स्वाभिमान होता जागा लाचारी नुरते
स्वावलंब साधन थोर सहज हाती येते
ज्ञानदान सर्वजणांसी पापनाश आहे!२

आजवरी पापे घडली पुण्य साधु या
आजवरी एकी भंगे पुन्हा घडवु या
रामचंद्र ऐशा यत्ना साथ देत आहे!३

उराउरी भेटू सारे ऐक्यगीत गाऊ
हिंदुराष्ट्र वैभवशिखरी निश्चयेच नेऊ
योगिराज माधव दिव्या शक्ति देत आहे!४

स्पर्शबंदि रोटीबंदी आड येत भिंती
बांधवासि कारण नसता दूर ठेवताती
कळे परी कार्य न करि जो राष्ट्रभक्त नोहे!५

कलंक हे धर्मावरचे अश्रुजले क्षाळू
नवे नियम हिंदुत्वाचे यथाशक्ति पाळू
धर्माचे स्थान खरे तर अंतरात आहे!६

जन्मजात जातिभेद सर्व ही विरावे
विवेके विचारे मानस सर्वदा भरावे
स्नेहदीप ऐसे करता हृदी तेवताहे!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर १९७३ मधे लिहिलेल्या कवितांपैकी पतित पावन मंदिर प्रसंगावर आधारित ही कविता)

No comments:

Post a Comment