Thursday, January 23, 2020

विधिलिखिताच्या कठोर पानी...

मकरसंक्रांत पार पडली आणि ८/९ दिवसातच भयंकर घात झाला (२३ जानेवारी १६६४). महाराजांना त्याची चाहूल नव्हती.  रायगडावर आईसाहेबांच्या मनालाही काही पूर्वकल्पना नव्हती. पण विधिलिखिताच्या कठोर पानावर कल्पांत लिहिलेला स्पष्टच आढळून आला!
-------------------------------------
काय जाहले, कसे जाहले असे अकस्मात?
विधिलिखिताच्या कठोर पानी लिहिला कल्पांत!

जंगलात राजे शिरले
सावजा पाहण्या घुसले
चौखूर अश्व मग उधळे
वेलीस भाग्य अडखळले
कोसळता धरणीवरती दो क्षणात हो देहांत
विधिलिखिताच्या कठोर पानी लिहिला कल्पांत!

तो लोळ विजेचा आला
हृदयासी जाळुनी गेला
नजरेचा कणखर भाला
रोखता काळ थरथरला
'जाणार मी सती' बोल उमटता एकच आकांत!
विधिलिखिताच्या कठोर पानी लिहिला कल्पांत!

ये आक्रंदत शिव पुढती
कर दोन्ही घालुन कंठी
"तू नको जाउ गे सती"
परि थिजे जननिची दिठी
फुलाहुनी मृदु माय लाजवी वज्रा निमिषात!
विधिलिखिताच्या कठोर पानी लिहिला कल्पांत!

येत ना आसवे नयनी
हा वियोग क्षणभर मानी
नश्वर तनु घेउनि अग्नी
नेईल पतीच्या सदनी
ती सती जशी की संगमरवरी मूर्त दिसे साक्षात!
विधिलिखिताच्या कठोर पानी लिहिला कल्पांत!

जर सोडुनि मजला जाशी
मी शपथ घालतो तुजशी
धर क्षणभर मज हृदयाशी
अश्रूत न्हाउ दे मजशी
निर्वाणीची हाक ऐकता उसळत वत्सल लाट!
विधिलिखिताच्या कठोर पानी टळला कल्पांत!
विधिलिखिताच्या कठोर पानी टळला कल्पांत!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(२३ जानेवारी १६६४ रोजी शहाजीराजांचे निधन झाले त्या प्रसंगावरचे हे काव्य)

No comments:

Post a Comment