Wednesday, April 22, 2026

अपार सत्संगाचा महिमा!

अपार सत्संगाचा महिमा! 
अगाध सत्संगाचा महिमा!ध्रु.

ऐसे दुसरे साधन नाही 
भगवंताप्रत घेऊन जाई
प्रकाश नुरवी लेश तमा!१

संतांना या मरण कुठे 
जन्ममृत्युचे मूळ तुटे 
या महिम्यासी नच उपमा!२

ईश्वर आहे याची प्रचिती
या संतांची निरखा भक्ती
अनुभवाच यांचा प्रेमा!३

देहाचा मग विसर पडे
भगवंताचे स्मरण घडे
संतोषाची परिसीमा!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११३ (२२ एप्रिल) वर आधारित काव्य.

मनुष्य जन्मास येणे, संतांची भेट होणे, आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणे, या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत. म्हणूनच संतसमागमासारखा लाभ नाही असे म्हणतात. मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात. आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो. देहाच्या पलीकडे असणारे व कायमचे टिकणारे आणि देहाला विसरून व देवाला स्मरून जे मिळवायचे असे भगवंताचे सुख आहे ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे. संत आपल्याला सत्य स्वरूपाची ओळख करून देतात. संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोहोचतात. संगतीचा परिणाम जितका नकळत होतो, तितका कृतीचा होत नाही म्हणून सत्संगती धरावी.

Tuesday, April 21, 2026

त्यात समाधान थोर आहे

संताज्ञापालन, संतसमागम!
त्यात समाधान थोर आहे!ध्रु. 

देव कर्ता मानावे 
अभिमाना सांडावे 
आत्माराम तेणे क्षणी तोषताहे!१

नव्हे मी देहाचा
नव्हे मी मनाचा
विषयाची नावड सत्संग देताहे!२ 

देव असे भावात
देव वसे नामात
नामचिंतामणी भक्ता लाभलाहे!३

संत लाज राखे
संत भक्ति पोखे 
मधुर वचने प्रेम वर्षताहे!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११२ (२१ एप्रिल) वर आधारित काव्य.

समाधान एकपणात आहे, अद्वैतात आहे. मी कर्ता नसून देव कर्ता आहे असे मानावे. मी नाही कोणाचा हे बघावे. मी देहाचा व मनाचाही नाही. संत विषयाची आसक्ती कमी करतात; अशा संतास शरण जावे. देव भावात असतो; तो भाव शुद्ध व उच्च असावा. सत्समागम म्हणजेच सत्याचा समागम; संत सांगतील त्याप्रमाणे वागावे. भगवंताला विसरून भजन करू नका. जगाच्या लाजेला भिऊन भगवंतास अंतर देऊ नये. निर्विषय चित्त संतांनाच करता येते. नामाच्या योगानेच संत ओळखता येतात, जोडता येतात, आणि टिकविता येतात.

Monday, April 20, 2026

संत सह‌वास भाग्य हेच थोर!

संत सह‌वास भाग्य हेच थोर!ध्रु.
 
तेणे रामरूप जाहलेसे मन 
अतां अम्हांलागी दिसे जग शून्य
संते मरणाचा संपविला घोर!१

देहबुद्धि गेली, भक्ति रुजविली
"मी तो परमात्मा" खूण पटविली
संते पिटाळिला दूर दूर चोर!२  

संते जोडियले श्वासासंगे नाम
मन घोकु लागे क्षणोक्षणी राम
देवा बांधण्याते दिला सोऽहं दोर!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १११ (२० एप्रिल) वर आधारित काव्य.

Saturday, April 18, 2026

उपजण्या अंतरि भक्ति, झडो झडो देहबुद्धि

उपजण्या अंतरि भक्ति, झडो झडो देहबुद्धि!ध्रु.
 
हात जोडिले श्रीरामा 
तूच धाव भक्तकामा 
तगमग शांतवी रे करि "राममय" वृत्ती!१

तुज नित्य आठवावे
देहालागी विसरावे
असे करी रामा काही तुझे ठायी जडो प्रीती!२

वृत्ति ज्याची राममय 
तोचि तोचि निरामय
संतसंग दे गा सदा मागणेच हे संप्रती!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०९ (१८ एप्रिल) वर आधारित काव्य.

परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे. भक्तीमार्गातील पहिली पायरी म्हटली म्हणजे मोबदल्यारहित, निष्काम, नि:स्वार्थी परमात्मस्मरण करणे; व शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणे, देहबुद्धी विगलित होणे, ही होय. देहरक्षण परमात्मप्राप्ति करिता करावे. प्रेम व उपचार यांचा अन्योन्य संबंध असतो. या उपचाराने भगवंताशी संबंध वाढतो. संत विषयात देव पाहतात, पण आम्ही मात्र देवातसुद्धा विषय पाहतो. संतांची वृत्ती राममयच असते. परमार्थात मर्यादा एकच, आणि ती म्हणजे भगवंताच्या नामापासून विचलित न होणे.

Wednesday, April 15, 2026

सत्संगाचा लाभ मोठा! आनंदा ना तोटा!

सत्संगाचा लाभ मोठा! 
आनंदा ना तोटा!ध्रु.

मन द्रव्यांतरि गुंतत नाही 
ओढ हरीची लागुन राही 
गहिवर ये प्रभु स्मरता!१

सर्व गुणांचा सागर ईश्वर 
तो संतांचा बनतो किंकर 
अपार संत महत्ता!२ 

विकार विरती, विचार स्फुरती
हृदि पाजळती ज्ञानज्योती 
विश्व धवळले आता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०६ (१५ एप्रिल) वर आधारित काव्य.

सत्संगतीच्या योगे मन पैक्यावर गुंतून राहात नाही. जे सुख चिरकाल टिकणारे नाही ते घेऊन काय करायचे? पैक्यासारख्या निर्जीव वस्तूत आपले मन किती गुंतून राहते! पैशाचे नाव अर्थ, पण तो करतो मोठा अनर्थ. पैसा प्रपंचाला पुरेसा असावा! म्हणजे किती तर पेन्शन असेल तर त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला. आपल्याला अडचण नाही पडली, की आपली श्रीमंतीच आहे. पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र आग्रहाने करावा आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे. आपण आतून निष्काम, निर्लोभ व निरिच्छ असावे. सत्संगती पासून सद्विचार व सद्वासना प्राप्त होतात. ज्याचे विचार चांगले तो मनुष्य खरा चांगला होय; व जिथे भगवंताचे अनुसंधान आहे तेथे राहणे हीच खरी सत्संगति होय.

Tuesday, April 14, 2026

ऋणी असावे यासाठी, संत जागे करताती

ऋणी असावे यासाठी, संत जागे करताती!ध्रु. 

त्यांची तळमळ 
क्षाळितसे मळ 
चुकल्या पथिका मधुर बोलुनी पथावरी आणती!१

त्यांच्या लीला 
जग तरण्याला 
स्वार्थाचा लवलेश न चित्ती ते तर शुद्धमती!२

अनुभव बोले
हृदयी ठसले
संतांच्या आज्ञेचे पालन देही दे मुक्ती!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०५ (१४ एप्रिल) वर आधारित काव्य.

संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो; म्हणून चांगल्या विचाराच्या माणसांची संगत धरावी. आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला, परंतु संतांनी आपल्याला जागे केले. ते ज्या लीला करतात त्या जगाच्या कल्याणासाठी असतात. ते स्वस्थ बसलेले दिसले तरी जगाचे कल्याण करीतच असतात. ज्या संतांचा ग्रंथ आपण वाचतो, त्यांच्या कृपेवाचून तो नीट समजणार नाही. ज्याच्यावर त्यांची कृपा आहे, त्याला काही विद्वत्ता नसताना देखील त्या ग्रंथाचा बरोबर अर्थ अगदी स्वाभाविकपणे कळेल. संतांची आज्ञा पालन करणे म्हणजे संतसेवाच होय. सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनविणे हा खरा सत्समागम आहे.
आपल्याला जीवनांतील ध्येयाचा विसर पडल्यामुळे संत आपल्याला जागे करतात.

Monday, April 13, 2026

देह सावलीप्रमाणे हे, ज्ञान संतांना

देह सावलीप्रमाणे हे, ज्ञान संतांना!ध्रु. 

व्यवहारापुरती 
तयांसी असते देहस्मृती
विकार म्हणुनी कधि न बाधती संतांचिया मना!१

जगाहुनी भिन्न-
तयांसी भक्ति हेंच अन्न 
भक्ति भोजनी, भक्ति प्राशनी, भक्ति पुरे श्वसना!२

लोकांती, एकांती
बिघडत ना शांती
वेदांताचे मर्म खरोखर ठावे या सज्जना!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०४ (१३ एप्रिल) वर आधारित काव्य.

साधुसंत देहास सावलीप्रमाणे मानतात. सावलीला दुःख झाले म्हणून रडणे मूर्खपणाचे आहे; म्हणूनच संतांच्या मनावर सुखदुःखाचा परिणाम होत नाही. संतांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृती असते. संत एकांतात जातात याचे कारण असे की लोकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात व एकांतात भेटणारे निराळे असतात. लोकांतात संतांची शांती बिघडते असे मुळीच नाही, पण एकांतात भेटणाऱ्यांना लोकांतात भेटता येत नाही, म्हणून ते एकांतात जातात. संतांच्या वचनाचा ओढून ताणून अर्थ करू नये, त्याचा सरळ अर्थ घ्यावा. संतांचे ज्ञानच असे असते की त्यांना वेदांताचे मर्म आपोआप कळते.