Friday, April 3, 2026

प्रभात काली "माधवनाथा" ध्याना बसवावे

प्रभात काली "माधवनाथा" ध्याना बसवावे 
अंतरि आपण भवती आपण सदा जाणवावे!ध्रु.

स्वामी माझ्या मस्तकि राहो सदा वरद हात 
मनास वळवा माझ्या नकळत तुम्ही आत आत 
मन पवनाशी 'नाथा' आपण अलगद जोडावे!१

इंद्रिये न ती मुळीच वैरी बालमंडळी ती 
सत्संगाने श्रवणाने ती अंकित जणु होती 
मना सज्जना सन्मार्गावर आपण आणावे!२

ओवी ओवी वाचत जाता कानी ये वाणी 
प्रवचन स्फुरते आतुन नकळत जरि मी अज्ञानी 
अनुग्रहाने मना माझिया आपण बदलावे!३ 

नित्य नवा दिन गुरुभेटीचा नवाच आनंद 
सांजसकाळी मनास रमवी माझा गोविंद 
'राम कृष्ण हरि' नामामृत मी सदैव सेवावे!४

पाठीवरुनी हात फिरावा प्रेमे निरखावे 
बोलला न जरि संवादाचे सुख मी भोगावे 
स्वरूप आनंदाचे दर्शन नित मज घडवावे!५ 

'अनुसंधानी संतत ठेवा' दुजे नको काही 
मनास माझ्या अभ्यासाचा ध्यास जडुन राही 
गावे भावे मी डोलावे - शांत स्वस्थ व्हावे!६ 

असो कुठेही असो कसाही स्वामी हृदयात 
तेच आतुनी पुढची पुढची दाखवती वाट 
साधनेतल्या आनंदाच्या गावाला जावे!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३०.०९.१९८९

अरे साधका ऊठ तू जाग आता

अरे साधका ऊठ तू जाग आता
तुला जागवी सद्‌गुरुनाथ त्राता
स्वरूपी रमावे, स्वरूपास ध्यावे
प्रभाते मनी माधवा आठवावे!१

तुझ्या अंतरी तो कधी बैसलासे
प्रतीक्षा करी, मूक तो जाह‌लासे
वरी मौन नेत्रांस झाकूनि घ्यावे
प्रभाते मनी माधवा आठवावे!२

जिवाची शिवाशी अशी भेट व्हावी 
विदेहीपणे सर्व काया निवावी
कसा चालला आत सोऽहं स्वभावे 
प्रभाते मनी माधवा आठवावे!३

करी साधना तू मदालस्य सोड
तुझी बंधने तूच जाणूनि तोड 
विवेके विचारे तदाकार व्हावे
प्रभाते मनी माधवा आठवावे!४

जरा हास प्रेमे जरा गोड बोल
तुला पाहता येत आप्तांस डोल 
जना आपलेसे करी प्रेमभावे 
प्रभाते मनी माधवा आठवावे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
स्वामी माधवनाथ यांना केलेली प्रार्थना
१७.०७.१९९३

Friday, March 6, 2026

जा पवना जा वेगे

आणि शिवनेरीवर एका शुभदिनी, फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१, १९ फेब्रुवारी १६३० चौघडा झडू लागला. जो तो उत्कंठेने दुसऱ्यास विचारी, "अहो काय झालं? काय झालं?"
तितक्याच उल्हसित स्वरात उत्तर येई  "मुलगा! मुलगा झाला आपल्या लाडक्या जिजाऊला! 

या पुत्रजन्मसोहळ्याचं वर्णन काय करावं? जणू काही नव्या गोकुळीं नवा कृष्णच जन्माला आला!

ही शुभवार्ता साऱ्या जणांना कळविण्याची गडावरील स्त्रियांची कोण घाई? त्यांनी ते काम पवनावरच सोपविले.

पवन दूताला त्या सांगू लागल्या!

जा पवना जा वेगे मिरव जनी शुभ वार्ता
शिवनेरी घेत जन्म शुभयोगे शककर्ता ॥ ध्रु.॥

सरली नैराश्य निशा उजळल्यात दाही दिशा
पूर्व क्षितिजि येत अरुण, देत अभय शिवभक्ता ॥१॥

दिवस खचित सोन्याचा घुमत गजर वाद्यांचा
अवतरला काय कृष्ण दंडण्यास परसत्ता ॥२॥

सह्याचल थरथरला गहिवरला मनि हसला
पाहण्यास मुखचंद्रा आतुरली उत्सुकता ॥३॥

वळत वळत बाळमुठी लव हसला जगजेठी
श्रीशिवाईचा प्रसाद उचलुनि घे वत्सलता ॥४॥

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, March 5, 2026

जेथे नाही 'राम', तेथे कैचा आराम?

जेथे नाही 'राम', तेथे कैचा आराम?ध्रु.

'मी नव्हे नव्हे' हो कोणी
तो रामच अंत:करणी 
हे ठसण्या जपणे प्रभुनाम!१

लागता प्रेम नामाचे 
आनंदे अंतरि नाचे 
तो भक्तसखा हो श्रीराम!२

'मी नुरणे' पूर्णावस्था 
लाभेल भाग्य वश होता 
परि सोडु नये कधी नाम!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६५ (५ मार्च) वर आधारित काव्य.

ज्या प्रपंचात राम नाही त्या प्रपंचात आराम होणार नाही. एका म्यानात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे मी आणि भगवंत एका अंत:करणात राहू शकत नाहीत. संत हे भगवंताशी एकरूप झालेले असतात. नामाचे प्रेम लागले म्हणजे कर्तेपणाचा अभिमान कमी होतो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना "त्याच्या" इच्छेने व सत्तेने घडून येतात अशी जाणीव ज्याच्या अंत:करणात उमटली त्यांना भगवंताचे खरे अस्तित्व समजले. मी खरा नसून "तोच" खरा आहे हे सांगण्यासाठी जेथे मीच उरत नाही ती खरी पूर्णावस्था होय. नाम घेत असताना सदाचरण कधी सोडू नये. नीतीच्या मर्यादा कधी ओलांडू नयेत. निराश कधी बनू नये, देहाला उगीच कष्टवू नये, पण काही झाले तरी भगवंताचे नाम कधी सोडू नये.

Tuesday, March 3, 2026

प्रपंच ऐसा करावा!

परमार्थाच्या आड न ये जो 
प्रपंच ऐसा करावा!ध्रु.

परमार्थाचा मुख्य धंदा
प्रपंच केवळ जोडधंदा
गुंतु नये मन प्रपंचात कधि 
राघव तया विसावा!१

व्यवहाराते सांभाळावे 
आहारी ना त्याच्या जावे
सुखदुःखांच्या झंजावाती 
राघव ना विसरावा!२

प्रपंच ना कधि कोणा सुटला
भक्ताते परि राम भेटला 
आकुंचितता ताप देतसे 
संश सोडुनी द्यावा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६३ (३ मार्च) वर आधारित काव्य 

प्रत्येक माणसाने परमार्थ हा मुख्य धंदा ठेवून प्रपंच हा जोडधंदा म्हणून करावा; म्हणजेच प्रपंचात होणाऱ्या लाभहानीचा परिणाम भगवंताचे अनुसंधानावर होऊ देऊ नये. परमार्थाचे आड प्रपंच न येईल अशा युक्तीने वागावे. भाजीला जसे मीठ लागते तसे परमार्थाला प्रपंच लागतो. मीठ नसेल तर भाजी अळणी लागते पण मीठ जास्त झाले तर भाजी खाववत नाही, त्याचप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ यांचा संबंध आहे. प्रपंचात व्यवहार जतन करावा खरा, पण तो काही सर्वस्व नव्हे. प्रपंच पाहिजे आणि दुःख नको असे म्हणणे वेडेपणाचे आहे. नुसता प्रपंच तापदायक नाही नाही तर आकुंचित प्रपंच हा तापदायक आहे. आपण ज्याप्रमाणे आपल्या या खिशातील पैसे त्या खिशामध्ये ठेवतो, त्याचप्रमाणे प्रपंचातील आपले मन आपण काढून भगवंताकडे लावावे तसे करण्यात समाधान आहे.

Monday, February 9, 2026

हनुमंत धन्य झाला!

जय जय रघुवीर समर्थ

हनुमंत धन्य झाला! हनुमंत धन्य झाला!ध्रु. 

व्रत ब्रह्मचर्य घेई 
सेवेस देह देई
कामास जिंकतो तो, हरिभक्त धन्य झाला!१ 

याचें मुखांत नाम 
बाधे न यास काम 
धारिष्ट्य-धैर्य ज्याचें लागे असे पणाला!२ 

बलवंत, भक्तिवंत
हनुमंत, बुद्धिमंत 
तुलना न सापडे हो ज्याच्या जगीं यशाला!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१३.७.१९७४

खालील श्लोकावर आधारित काव्य.

मुखीं राम त्या काम बांधू शकेना। 
गुणे इष्ट धारिष्ट त्याचें चुकेना॥
हरीभक्त तो शक्त कामास मारी। 
जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी॥

ज्याच्या मुखी राम आहे त्याला काम बाधू शकत नाही. (नामसंकीर्तनाच्या) गुणाने विषयवासनांशी झगडण्यात त्याचें धारिष्टय-धैर्य चळत नाही. हरिभक्त हा मोठा बलिष्ठ असून तो कामास मारतो (जिंकतो) अशा प्रकारचे ब्रह्मचारी मारुतीराय धन्य होत.

Friday, February 6, 2026

शरणागति पथ एकला!

शरणागति पथ एकला!ध्रु.

नाम स्मरता 
रामच कर्ता 
कळते मला!१

कृतीच नाही
गर्वहि नाही
दिसते मला!२

नुरे वासना
स्फुरे चेतना
पटते मला!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३७ (६ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

भगवत्प्राप्तीला शरणागतीशिवाय मार्ग नाही व शरणागतीला नामस्मरणासारखा उत्तम उपाय नाही. स्मरण हा मनाचा धर्म असल्याने त्यात कृतीचा प्रश्नच येत नाही. नामाचे स्मरण होत असते, ते करू म्हणून जमत नाही. म्हणून शरणागतीला नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही. शरणागतीचा दुसरा अर्थ म्हणजे कायिक, वाचिक व मानसिक क्रिया थांबवणे. काहीही कृती न करणे हे कृती करण्यापेक्षा फार कठीण असते. गीतेत भगवंतांनी अर्जुनाला तू नुसता मला शरण ये असे सांगितले आहे. देहबुद्धी गेल्याशिवाय शरणागती येत नाही. जगातील वैभवाची आसक्ति व परमात्मप्राप्ती या दोन्ही गोष्टी एकत्र असूच शकत नाहीत. जगाकडे पाठ फिरवल्याशिवाय भगवंत मिळत नाही.