Saturday, April 11, 2026

साधने न साधते जे, सत्संगे साधते

साधने न साधते जे, सत्संगे साधते!ध्रु. 

संत राहतात देही
परी ते विदेही 
अहर्निश चित्तावरी राज्य त्यांचे चालते!१

संतवचन परिसावे 
तसे तसे आचरावे
विषय याचना त्यांपाशी जराही न साजते!२

'राम कर्ता' मानतात 
भूती देव पाहतात
संत्संगी साधकासी आत्मज्ञान होते!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०२ (११ एप्रिल) वर आधारित काव्य.

संतांनी जगातील राज्य मिळवली नाहीत, पण त्यांनी स्वतःवर राज्य केले. संतांचे वचन पूर्णपणे समजून ऐकत जावे.  आपल्या आणि संतांच्या कर्मामध्ये फरक आहे.  ' राम कर्ता ' या भावनेने त्यांनी कर्म केले, आपण आपलेपणाने ते करतो, म्हणून आपल्याला कर्म बंधनकारक बनते.  जो विषयाचे प्रेम देईल तो खरा संत नव्हे. साधनांनी जे साधत नाही ते संतांचे सहवासात राहिल्याने साधते. आपण ज्या संताकडे जातो त्याला विषयाचे प्रेम असत नाही, इतकेच नव्हे तर त्याच्या माणसाने विषयांमध्ये मग्न राहिले असता त्याच्या हृदयाला पीळ पडतो.  आपण विषयमग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटते. जिज्ञासू शिष्य भेटला तर संताना आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते.

Friday, April 10, 2026

कैसे वर्तावे या जगती

सज्जन सांगती कैसे वर्तावे या जगती!ध्रु.

बंधनास कारण 
मनाची ठेवण
सुखदुःख देइ न दुसरा असो द्यावे चित्ती!१

राबावे अखंड
जाळुनी पाखंड 
फलाशा न बाळगावी तीच थोर भक्ती!२ 

उगम जसा रामी 
विलय तसा रामी 
रामार्पण होण्याची ही सांगतात रीती!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०१ (१० एप्रिल) वर आधारित काव्य.

बंधनास खरे कारण परिस्थिती नसून आपल्याच मनाची ठेवण हे आहे. जाणिवेने जैसे घ्यावे। तैसे मनाने सुखदुःख भोगावे। अखंड राखावे अनुसंधान। येणे कर्म होईल सहज रामार्पण। प्रयत्नेविण राहो नये। फळाची आशा ठेवू नये। भगवंताला विसरू नये।

Thursday, April 9, 2026

तुम्ही संत थोर कृपावंत

तुम्ही संत थोर कृपावंत!ध्रु.

मनाचे खंबीर 
सागर गंभीर 
फुलविता जगती वसंत!१

धीर पुरविता
पाठिशी राहता
वानू कैसे सद्‌गुण अनंत!२

आळस असेना 
फलाशा शिवेना 
महीवरी तुम्ही भगवंत!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०० (९ एप्रिल) वर आधारित काव्य.

संत आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतात, परंतु आपला अभिमान आपल्या आड येतो व आपण संतांना नावे ठेवतो.  जगाचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी जो सुखदुःखाच्या जाळ्यात सापडला नाही, त्याच्याकडे जावे. संत कर्म करूनही त्याच्या फळाच्या आशेने लिप्त होत नाहीत.

Monday, April 6, 2026

संत भगवंत चालते - बोलते

संत भगवंत चालते - बोलते!ध्रु.

भय घालविती 
नाम वदविती
घास कैवल्याचे भरविती हाते!१

संतसमागम 
लाभ हा परम
अंतरीची ज्योत जगा उजळीते!२

त्यांची पदसेवा 
अनमोल ठेवा 
संतकृपा भक्ता मार्गासी लावते!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९७ (६ एप्रिल) वर आधारित काव्य.

व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही, त्याला नाही परमार्थ करता येणार. निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू. संतांचा समागम करावा म्हणजे आपण मार्गास लागतो. संत हे देहाचे रोग बरे करीत नसून, त्या रोगाची भीति नाहीशी करतात.  संत हे चालते बोलते देवच आहेत. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे, हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय.  हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे कार्य होय.

Sunday, April 5, 2026

संतसंगे दोष नासताती

संतसंगे दोष नासताती!ध्रु.
 
नामाची आवड 
विषयी नावड  
संत हाती मोक्षसुख देती!१

पळविती पाप 
निवारिती ताप 
संत मेघ होउनि वर्षताती!२

संतवाणी गोड 
अमृताची जोड
संत स्वये निर्भयत्व देती !३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९६ (५ एप्रिल) वर आधारित काव्य.

सत्पुरुषाच्या संगतीत आपले पाप शोषून घेतले जाते आणि पुन्हा तो सत्पुरुष स्वतः शुद्ध तो शुद्धच राहतो. विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते. वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी. संत आपल्या हिताचे सांगतात, पण आपले मन विषयात वावरत असल्याने त्यांचे बोलणे आपल्या मनात पूर्णपणे ठसत नाही.  ज्यास भगवंताचे अधिष्ठान आहे त्याचे कडक बोलणेसुद्धा कोणास लागणार नाही. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे, कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही.

Saturday, April 4, 2026

तोचि संत

सृष्टि राम रूप शिष्य रामरूप
विश्व राम ज्यास तोचि संत!१

देह‌बुद्धि नाही आत्मबुद्धि आहे 
निवांत जो राही तोचि संत!२

दुःख मूळ जाणे सोऽहंभाव बाणे 
खणखणीत नाणे तोचि संत!३

पा‌हुनिया आर्त कळवळे मनात
येतसे धावत तोचि संत!४

दुरित जळावे तिमिर हटावे 
आणवी प्रभात तोचि संत!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९५ (४ एप्रिल) वर आधारित काव्य.

आपले शहाणपण बाजूला ठेवून जो संतास शरण जातो तोच खरा साधक. संत हे पहिल्याने आपल्यातीलच होते, परंतु अनुसंधानाच्या मार्गाने ते वर गेले. आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच आपला शोध करीत आपल्याकडे चालत येतील. संताला कर्म मागेपुढे करता येते पण ते टाळता येत नाही.

Friday, April 3, 2026

प्रभात काली "माधवनाथा" ध्याना बसवावे

प्रभात काली "माधवनाथा" ध्याना बसवावे 
अंतरि आपण भवती आपण सदा जाणवावे!ध्रु.

स्वामी माझ्या मस्तकि राहो सदा वरद हात 
मनास वळवा माझ्या नकळत तुम्ही आत आत 
मन पवनाशी 'नाथा' आपण अलगद जोडावे!१

इंद्रिये न ती मुळीच वैरी बालमंडळी ती 
सत्संगाने श्रवणाने ती अंकित जणु होती 
मना सज्जना सन्मार्गावर आपण आणावे!२

ओवी ओवी वाचत जाता कानी ये वाणी 
प्रवचन स्फुरते आतुन नकळत जरि मी अज्ञानी 
अनुग्रहाने मना माझिया आपण बदलावे!३ 

नित्य नवा दिन गुरुभेटीचा नवाच आनंद 
सांजसकाळी मनास रमवी माझा गोविंद 
'राम कृष्ण हरि' नामामृत मी सदैव सेवावे!४

पाठीवरुनी हात फिरावा प्रेमे निरखावे 
बोलला न जरि संवादाचे सुख मी भोगावे 
स्वरूप आनंदाचे दर्शन नित मज घडवावे!५ 

'अनुसंधानी संतत ठेवा' दुजे नको काही 
मनास माझ्या अभ्यासाचा ध्यास जडुन राही 
गावे भावे मी डोलावे - शांत स्वस्थ व्हावे!६ 

असो कुठेही असो कसाही स्वामी हृदयात 
तेच आतुनी पुढची पुढची दाखवती वाट 
साधनेतल्या आनंदाच्या गावाला जावे!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३०.०९.१९८९