Monday, April 6, 2026

संत भगवंत चालते - बोलते

संत भगवंत चालते - बोलते!ध्रु.

भय घालविती 
नाम वदविती
घास कैवल्याचे भरविती हाते!१

संतसमागम 
लाभ हा परम
अंतरीची ज्योत जगा उजळीते!२

त्यांची पदसेवा 
अनमोल ठेवा 
संतकृपा भक्ता मार्गासी लावते!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९७ (६ एप्रिल) वर आधारित काव्य.

व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही, त्याला नाही परमार्थ करता येणार. निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू. संतांचा समागम करावा म्हणजे आपण मार्गास लागतो. संत हे देहाचे रोग बरे करीत नसून, त्या रोगाची भीति नाहीशी करतात.  संत हे चालते बोलते देवच आहेत. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे, हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय.  हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे कार्य होय.

Sunday, April 5, 2026

संतसंगे दोष नासताती

संतसंगे दोष नासताती!ध्रु.
 
नामाची आवड 
विषयी नावड  
संत हाती मोक्षसुख देती!१

पळविती पाप 
निवारिती ताप 
संत मेघ होउनि वर्षताती!२

संतवाणी गोड 
अमृताची जोड
संत स्वये निर्भयत्व देती !३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९६ (५ एप्रिल) वर आधारित काव्य.

सत्पुरुषाच्या संगतीत आपले पाप शोषून घेतले जाते आणि पुन्हा तो सत्पुरुष स्वतः शुद्ध तो शुद्धच राहतो. विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते. वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी. संत आपल्या हिताचे सांगतात, पण आपले मन विषयात वावरत असल्याने त्यांचे बोलणे आपल्या मनात पूर्णपणे ठसत नाही.  ज्यास भगवंताचे अधिष्ठान आहे त्याचे कडक बोलणेसुद्धा कोणास लागणार नाही. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे, कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही.

Saturday, April 4, 2026

तोचि संत

सृष्टि राम रूप शिष्य रामरूप
विश्व राम ज्यास तोचि संत!१

देह‌बुद्धि नाही आत्मबुद्धि आहे 
निवांत जो राही तोचि संत!२

दुःख मूळ जाणे सोऽहंभाव बाणे 
खणखणीत नाणे तोचि संत!३

पा‌हुनिया आर्त कळवळे मनात
येतसे धावत तोचि संत!४

दुरित जळावे तिमिर हटावे 
आणवी प्रभात तोचि संत!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९५ (४ एप्रिल) वर आधारित काव्य.

आपले शहाणपण बाजूला ठेवून जो संतास शरण जातो तोच खरा साधक. संत हे पहिल्याने आपल्यातीलच होते, परंतु अनुसंधानाच्या मार्गाने ते वर गेले. आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच आपला शोध करीत आपल्याकडे चालत येतील. संताला कर्म मागेपुढे करता येते पण ते टाळता येत नाही.

Friday, April 3, 2026

प्रभात काली "माधवनाथा" ध्याना बसवावे

प्रभात काली "माधवनाथा" ध्याना बसवावे 
अंतरि आपण भवती आपण सदा जाणवावे!ध्रु.

स्वामी माझ्या मस्तकि राहो सदा वरद हात 
मनास वळवा माझ्या नकळत तुम्ही आत आत 
मन पवनाशी 'नाथा' आपण अलगद जोडावे!१

इंद्रिये न ती मुळीच वैरी बालमंडळी ती 
सत्संगाने श्रवणाने ती अंकित जणु होती 
मना सज्जना सन्मार्गावर आपण आणावे!२

ओवी ओवी वाचत जाता कानी ये वाणी 
प्रवचन स्फुरते आतुन नकळत जरि मी अज्ञानी 
अनुग्रहाने मना माझिया आपण बदलावे!३ 

नित्य नवा दिन गुरुभेटीचा नवाच आनंद 
सांजसकाळी मनास रमवी माझा गोविंद 
'राम कृष्ण हरि' नामामृत मी सदैव सेवावे!४

पाठीवरुनी हात फिरावा प्रेमे निरखावे 
बोलला न जरि संवादाचे सुख मी भोगावे 
स्वरूप आनंदाचे दर्शन नित मज घडवावे!५ 

'अनुसंधानी संतत ठेवा' दुजे नको काही 
मनास माझ्या अभ्यासाचा ध्यास जडुन राही 
गावे भावे मी डोलावे - शांत स्वस्थ व्हावे!६ 

असो कुठेही असो कसाही स्वामी हृदयात 
तेच आतुनी पुढची पुढची दाखवती वाट 
साधनेतल्या आनंदाच्या गावाला जावे!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३०.०९.१९८९

अरे साधका ऊठ तू जाग आता

अरे साधका ऊठ तू जाग आता
तुला जागवी सद्‌गुरुनाथ त्राता
स्वरूपी रमावे, स्वरूपास ध्यावे
प्रभाते मनी माधवा आठवावे!१

तुझ्या अंतरी तो कधी बैसलासे
प्रतीक्षा करी, मूक तो जाह‌लासे
वरी मौन नेत्रांस झाकूनि घ्यावे
प्रभाते मनी माधवा आठवावे!२

जिवाची शिवाशी अशी भेट व्हावी 
विदेहीपणे सर्व काया निवावी
कसा चालला आत सोऽहं स्वभावे 
प्रभाते मनी माधवा आठवावे!३

करी साधना तू मदालस्य सोड
तुझी बंधने तूच जाणूनि तोड 
विवेके विचारे तदाकार व्हावे
प्रभाते मनी माधवा आठवावे!४

जरा हास प्रेमे जरा गोड बोल
तुला पाहता येत आप्तांस डोल 
जना आपलेसे करी प्रेमभावे 
प्रभाते मनी माधवा आठवावे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
स्वामी माधवनाथ यांना केलेली प्रार्थना
१७.०७.१९९३

Friday, March 6, 2026

जा पवना जा वेगे

आणि शिवनेरीवर एका शुभदिनी, फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१, १९ फेब्रुवारी १६३० चौघडा झडू लागला. जो तो उत्कंठेने दुसऱ्यास विचारी, "अहो काय झालं? काय झालं?"
तितक्याच उल्हसित स्वरात उत्तर येई  "मुलगा! मुलगा झाला आपल्या लाडक्या जिजाऊला! 

या पुत्रजन्मसोहळ्याचं वर्णन काय करावं? जणू काही नव्या गोकुळीं नवा कृष्णच जन्माला आला!

ही शुभवार्ता साऱ्या जणांना कळविण्याची गडावरील स्त्रियांची कोण घाई? त्यांनी ते काम पवनावरच सोपविले.

पवन दूताला त्या सांगू लागल्या!

जा पवना जा वेगे मिरव जनी शुभ वार्ता
शिवनेरी घेत जन्म शुभयोगे शककर्ता ॥ ध्रु.॥

सरली नैराश्य निशा उजळल्यात दाही दिशा
पूर्व क्षितिजि येत अरुण, देत अभय शिवभक्ता ॥१॥

दिवस खचित सोन्याचा घुमत गजर वाद्यांचा
अवतरला काय कृष्ण दंडण्यास परसत्ता ॥२॥

सह्याचल थरथरला गहिवरला मनि हसला
पाहण्यास मुखचंद्रा आतुरली उत्सुकता ॥३॥

वळत वळत बाळमुठी लव हसला जगजेठी
श्रीशिवाईचा प्रसाद उचलुनि घे वत्सलता ॥४॥

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, March 5, 2026

जेथे नाही 'राम', तेथे कैचा आराम?

जेथे नाही 'राम', तेथे कैचा आराम?ध्रु.

'मी नव्हे नव्हे' हो कोणी
तो रामच अंत:करणी 
हे ठसण्या जपणे प्रभुनाम!१

लागता प्रेम नामाचे 
आनंदे अंतरि नाचे 
तो भक्तसखा हो श्रीराम!२

'मी नुरणे' पूर्णावस्था 
लाभेल भाग्य वश होता 
परि सोडु नये कधी नाम!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६५ (५ मार्च) वर आधारित काव्य.

ज्या प्रपंचात राम नाही त्या प्रपंचात आराम होणार नाही. एका म्यानात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे मी आणि भगवंत एका अंत:करणात राहू शकत नाहीत. संत हे भगवंताशी एकरूप झालेले असतात. नामाचे प्रेम लागले म्हणजे कर्तेपणाचा अभिमान कमी होतो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना "त्याच्या" इच्छेने व सत्तेने घडून येतात अशी जाणीव ज्याच्या अंत:करणात उमटली त्यांना भगवंताचे खरे अस्तित्व समजले. मी खरा नसून "तोच" खरा आहे हे सांगण्यासाठी जेथे मीच उरत नाही ती खरी पूर्णावस्था होय. नाम घेत असताना सदाचरण कधी सोडू नये. नीतीच्या मर्यादा कधी ओलांडू नयेत. निराश कधी बनू नये, देहाला उगीच कष्टवू नये, पण काही झाले तरी भगवंताचे नाम कधी सोडू नये.