संत भगवंत चालते - बोलते!ध्रु.
भय घालविती
नाम वदविती
घास कैवल्याचे भरविती हाते!१
संतसमागम
लाभ हा परम
अंतरीची ज्योत जगा उजळीते!२
त्यांची पदसेवा
अनमोल ठेवा
संतकृपा भक्ता मार्गासी लावते!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९७ (६ एप्रिल) वर आधारित काव्य.
व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही, त्याला नाही परमार्थ करता येणार. निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू. संतांचा समागम करावा म्हणजे आपण मार्गास लागतो. संत हे देहाचे रोग बरे करीत नसून, त्या रोगाची भीति नाहीशी करतात. संत हे चालते बोलते देवच आहेत. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे, हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे कार्य होय.