Sunday, May 12, 2024

भाउजी, इथेच बांधा कुटी!

श्रीराम जय राम जय जय राम!

मनि भरली ही पंचवटी, इथेच बांधा कुटी, 
भाउजी, इथेच बांधा कुटी!ध्रु.

शीतल गंधित इथला वारा 
पर्णकुटीचा सुखद निवारा 
गोदेचा हा सुरम्य परिसर ठसला नेत्रपुटी!१ 

इथे बहरली हिरवी सृष्टी 
श्रीरामांची खिळली दृष्टी 
तळ्यात डुलती असंख्य कमळे सुखावलीसे दिठी!२ 

अशी देखणी कुटी उभारा 
प्रासादाचा उतरो तोरा 
साधेपणही करताहे घर रसिकाच्या चित्ती!३ 

गोदेचे मी पाणी आणिन 
फुलझाडे मी असंख्य लाविन
फुललेल्या सुमनांची माळा घालिन पतिकंठी!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०६.०८.१९७३ 
दरबारी कानडा

Saturday, May 11, 2024

श्रीमंत तोचि ज्यास समाधान!

आपले आपण घेणे समाधान!
श्रीमंत तोचि ज्यास समाधान!ध्रु.

हवे पण जावे
पुरे पण यावे
जेथ नोहे चिंता तेथ समाधान!१

रामासंगे सुख
रामाविण दुःख
नामस्मरणाने लाभे समाधान!२

चित्त स्थिर व्हावे
भक्तीत रंगावे
रामावरि निष्ठा हेच समाधान!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन २२२, ९ ऑगस्ट वर आधारित काव्य

ज्याचे ‘ हवेपण ’ जास्त असते तो गरीब जाणावा, आणि ज्याचे हवेपण कमी असते तो श्रीमंत जाणावा. ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत. 
खरोखर, समाधानासारखे औषधच नाही. ते मिळत नाही म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात. काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो.

Wednesday, May 8, 2024

मना संगती घ्यावे नाम मधुर मधुर गावे

मना संगती घ्यावे नाम मधुर मधुर गावे 
त्या दोघांची ओळख घडता तन हलके व्हावे!ध्रु.

राम रमवितो, कृष्ण ओढतो, हरि हा हारवितो 
ओंकाराच्या पाठबळाने भक्त अभय होतो 
चिंतन जेथे तिथे न चिंता, धरून चालावे!१

तन नत होते देवदर्शने, अमोल संस्कार 
सदैव बसणे प्रभुचरणांशी नमन सांगणार 
अनुसंधानी अगा अनंता भक्ता ठेवावे!२ 

कंठी धरतो भक्ता सुचवी तुळशीचा हार 
कर पाठीवर प्रेमळ प्रभुचा असाच फिरणार 
गंगायमुनांनी भक्ताला न्हाऊ घालावे!३
 
आळंदी देहू नि पंढरी घरीच असतात
माय रुक्मिणी तात विठोबा निश्चित असतात 
असे घराला उपासनेने मंदिर पण यावे!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

शांकर धनु आज कसे भंग पावले?

श्रीराम जय राम जय जय राम !

कडाड कड् , कडाड कड् ध्वनी उमट‌ले 
शांकर धनु आज कसे भंग पावले?ध्रु.

राम नव्हे पौरुष हे पुढती ठाकले 
त्या अजेय शिवचापा सहज स्पर्शिले
प्रत्यंचा ज्या क्षणि ते लावु लागले!१

कडकडाट भयद असा पृथ्वि डळमळे 
सूर्यरथाचे वारू स्वैर उधळले 
श्रीरामे कठिण पणा सहज जिंकले!२

आशीर्वच मुनि देती, उधळली फुले 
दुंदुभिच्या तालावर पडति पाउले
आज धरा धन्य अशा नरवरामुळे!३

पंचारति ओवाळिति गीत गाउनी-
नाचतात नर्तकि ही धुंद होउनी-
संशय, अज्ञान, गर्व लुप्त जाहले!४

वरमाला सीतेने कंठि घातली-
कनकगौर बाला ती लाज लाजली
नयनांतुनि भावमधुर दृश्य तरळले!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२१.०७.१९७३
खेमटा, तालगीत, लयबद्ध वाचन

Sunday, May 5, 2024

विनविते तुम्हां रघुनाथा - वनासी संगे न्या सीता!

श्रीराम जय राम जय जय राम !

विनविते तुम्हां रघुनाथा -
वनासी संगे न्या सीता!ध्रु.

थट्टा कसली भलत्या वेळी 
नाथा आपण असे मांडली?
सुखदुःखांतरि सोबत माझी -
कशास नाकारिता!१ 

धर्म न्याय्य जे तेच सांगते 
आज्ञा मज ही असे मानते 
सन्निध असता स्वामी आपण -
भय न शिवे चित्ता!२

संगे असता नाथा आपण 
पशू न बघतिल मजसी ढुंकुन 
भय दाखविता, मला टाळता 
कारण मुळि नसता!३ 

कंदमुळे आनंदे सेविन 
पत्निधर्म मी अचूक पाळिन 
विभिन्न देही एकच आत्मा 
ध्यानि न का घेता?४

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
२५.०७.१९७३
जोगी, आधा

त्या क्षणी रघुनाथा वरिले!

श्रीराम जय राम जय जय राम!

दुर्गामंदिरी, मी शुभयोगे, चरणकमल पाहिले 
त्या क्षणी रघुनाथा वरिले! ध्रु. 

नरश्रेष्ठ हा पणास जिंकिल 
संशय सगळे सहजचि फिटतिल
मनोदेवता विश्वासाने मजपाशी बोले! १

दुर्गापूजन मी करताना 
मनी उमलली नवी भावना 
मी जिव ते शिव नाते ऐसे आनंदे जुळवले!२

मानसपूजन श्रीरामांचे
गुणसंकीर्तन श्रीरामांचे
दुर्गापूजन नावापुरते हातुनि घडलेले!३

लज्जा भिववी, लज्जा खुलवी
लज्जा झुलवी, लज्जा नाचवि
दिवास्वप्न मी त्या विजयाचे औत्सुक्ये पाहिले!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
बिहाग आधा
मम आत्मा

अनित्य विषयी उदास व्हा नित्य ईश्वरा स्मरा स्मरा!

नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका
+++++++

अनित्य विषयी उदास व्हा
नित्य ईश्वरा स्मरा स्मरा! ध्रु.

भोगवासना खंडि साधना
अन्य कामना नको मना
मुखि रामाचे नाम धरा!१

बरवी शांती ती विश्रांती
संतोषच संतांची रीती
शांतिब्रह्मची मना करा!२

सच्ची तळमळ, गुरु भेटावा
विरक्ति उज्ज्वल ' काम ' जळावा
रामनामधर हरा स्मरा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन २०८, २६ जुलै वर आधारित काव्य. 

अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे. नंतर, या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी. हे दुसरे साधन होय. आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते; तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे.