अकारण प्रेम हाच परमार्थ!ध्रु.
अभिमानाचे नाव नसे
भगवंती दृढ भाव असे
जागता देव अंतरात!१
मन असो समाधानात
जनि साधावा एकांत
रंगणे नित्य भजनरंगात!२
मी माझे हे भान सुटावे
मी रामाचा हृदयि स्फुरावे
बसता एकाच ठायि निवांत!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५४ (२ जून) वर आधारित काव्य.
भगवंतावर अकारण प्रेम करणे म्हणजे परमार्थच. जो प्रपंचात उबगला तो भगवंतास शरण गेला. आपण अडाणी झाल्याशिवाय, म्हणजे आपली विद्या व मोठेपण विसरल्याशिवाय परमार्थ साधत नाही. जेथे असमाधान फार तेथे दुष्ट शक्तींना काम करायला वाव मिळतो. देहाचा मनाशी संबंध आहे, आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे, म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे, म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल. ज्याने व्यवहार तपासून केला त्याला परमार्थ साधलाच. भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ. मनुष्याला परमार्थ किती साधला हे त्याच्या बोलण्यावरून व दृष्टीवरून ओळखता येते.