संत हवासा वाटावा,
देव तयांतचि भेटावा!ध्रु.
वाट चुकली तर संगे येतो
बोट पकडुनी तो चालवितो
तो करुणाघन बरसावा!१
विषय सुटावा, शिव गाठावा
भेद मिटावा, भ्रमहि फिटावा
हृदयासनि बसण्या यावा!२
उक्ति कळावी, कृती घडावी
संत अनाथा मार्गी लावी
तळमळ लागो या जीवा!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११९ (२८ एप्रिल) वर आधारित काव्य.
विषयाची आवड कमी होऊन खरी तळमळ लागली म्हणजे संत भेटतो. असंताची आवड नाहीशी होईल तेव्हाच संत हवासा वाटेल. विषय आपल्याला त्रास देतात पण ते सोडावे कसे हे समजत नाही. जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपले झाले आहे. आपली वाट चुकली आहे असे ज्याला वाटेल तोच जंगलातून बाहेर जाण्याची वाट विचारतो. कर्ममार्ग सांभाळताना "कर्ता मी नव्हे" हे सांभाळणे जरूर आहे. स्वतःला कसे विसरावे हे कळण्यासाठीच संतांना शरण जावे. ज्याचे अंत:करण शुद्ध आहे तो स्वतः तर आनंदी असतोच, पण त्यामुळे भोवतालचे वातावरणही आनंदाचे बनते.