Friday, March 6, 2026

जा पवना जा वेगे

आणि शिवनेरीवर एका शुभदिनी, फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१, १९ फेब्रुवारी १६३० चौघडा झडू लागला. जो तो उत्कंठेने दुसऱ्यास विचारी, "अहो काय झालं? काय झालं?"
तितक्याच उल्हसित स्वरात उत्तर येई  "मुलगा! मुलगा झाला आपल्या लाडक्या जिजाऊला! 

या पुत्रजन्मसोहळ्याचं वर्णन काय करावं? जणू काही नव्या गोकुळीं नवा कृष्णच जन्माला आला!

ही शुभवार्ता साऱ्या जणांना कळविण्याची गडावरील स्त्रियांची कोण घाई? त्यांनी ते काम पवनावरच सोपविले.

पवन दूताला त्या सांगू लागल्या!

जा पवना जा वेगे मिरव जनी शुभ वार्ता
शिवनेरी घेत जन्म शुभयोगे शककर्ता ॥ ध्रु.॥

सरली नैराश्य निशा उजळल्यात दाही दिशा
पूर्व क्षितिजि येत अरुण, देत अभय शिवभक्ता ॥१॥

दिवस खचित सोन्याचा घुमत गजर वाद्यांचा
अवतरला काय कृष्ण दंडण्यास परसत्ता ॥२॥

सह्याचल थरथरला गहिवरला मनि हसला
पाहण्यास मुखचंद्रा आतुरली उत्सुकता ॥३॥

वळत वळत बाळमुठी लव हसला जगजेठी
श्रीशिवाईचा प्रसाद उचलुनि घे वत्सलता ॥४॥

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, March 5, 2026

जेथे नाही 'राम', तेथे कैचा आराम?

जेथे नाही 'राम', तेथे कैचा आराम?ध्रु.

'मी नव्हे नव्हे' हो कोणी
तो रामच अंत:करणी 
हे ठसण्या जपणे प्रभुनाम!१

लागता प्रेम नामाचे 
आनंदे अंतरि नाचे 
तो भक्तसखा हो श्रीराम!२

'मी नुरणे' पूर्णावस्था 
लाभेल भाग्य वश होता 
परि सोडु नये कधी नाम!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६५ (५ मार्च) वर आधारित काव्य.

ज्या प्रपंचात राम नाही त्या प्रपंचात आराम होणार नाही. एका म्यानात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे मी आणि भगवंत एका अंत:करणात राहू शकत नाहीत. संत हे भगवंताशी एकरूप झालेले असतात. नामाचे प्रेम लागले म्हणजे कर्तेपणाचा अभिमान कमी होतो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना "त्याच्या" इच्छेने व सत्तेने घडून येतात अशी जाणीव ज्याच्या अंत:करणात उमटली त्यांना भगवंताचे खरे अस्तित्व समजले. मी खरा नसून "तोच" खरा आहे हे सांगण्यासाठी जेथे मीच उरत नाही ती खरी पूर्णावस्था होय. नाम घेत असताना सदाचरण कधी सोडू नये. नीतीच्या मर्यादा कधी ओलांडू नयेत. निराश कधी बनू नये, देहाला उगीच कष्टवू नये, पण काही झाले तरी भगवंताचे नाम कधी सोडू नये.

Tuesday, March 3, 2026

प्रपंच ऐसा करावा!

परमार्थाच्या आड न ये जो 
प्रपंच ऐसा करावा!ध्रु.

परमार्थाचा मुख्य धंदा
प्रपंच केवळ जोडधंदा
गुंतु नये मन प्रपंचात कधि 
राघव तया विसावा!१

व्यवहाराते सांभाळावे 
आहारी ना त्याच्या जावे
सुखदुःखांच्या झंजावाती 
राघव ना विसरावा!२

प्रपंच ना कधि कोणा सुटला
भक्ताते परि राम भेटला 
आकुंचितता ताप देतसे 
संश सोडुनी द्यावा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६३ (३ मार्च) वर आधारित काव्य 

प्रत्येक माणसाने परमार्थ हा मुख्य धंदा ठेवून प्रपंच हा जोडधंदा म्हणून करावा; म्हणजेच प्रपंचात होणाऱ्या लाभहानीचा परिणाम भगवंताचे अनुसंधानावर होऊ देऊ नये. परमार्थाचे आड प्रपंच न येईल अशा युक्तीने वागावे. भाजीला जसे मीठ लागते तसे परमार्थाला प्रपंच लागतो. मीठ नसेल तर भाजी अळणी लागते पण मीठ जास्त झाले तर भाजी खाववत नाही, त्याचप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ यांचा संबंध आहे. प्रपंचात व्यवहार जतन करावा खरा, पण तो काही सर्वस्व नव्हे. प्रपंच पाहिजे आणि दुःख नको असे म्हणणे वेडेपणाचे आहे. नुसता प्रपंच तापदायक नाही नाही तर आकुंचित प्रपंच हा तापदायक आहे. आपण ज्याप्रमाणे आपल्या या खिशातील पैसे त्या खिशामध्ये ठेवतो, त्याचप्रमाणे प्रपंचातील आपले मन आपण काढून भगवंताकडे लावावे तसे करण्यात समाधान आहे.

Monday, February 9, 2026

हनुमंत धन्य झाला!

जय जय रघुवीर समर्थ

हनुमंत धन्य झाला! हनुमंत धन्य झाला!ध्रु. 

व्रत ब्रह्मचर्य घेई 
सेवेस देह देई
कामास जिंकतो तो, हरिभक्त धन्य झाला!१ 

याचें मुखांत नाम 
बाधे न यास काम 
धारिष्ट्य-धैर्य ज्याचें लागे असे पणाला!२ 

बलवंत, भक्तिवंत
हनुमंत, बुद्धिमंत 
तुलना न सापडे हो ज्याच्या जगीं यशाला!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१३.७.१९७४

खालील श्लोकावर आधारित काव्य.

मुखीं राम त्या काम बांधू शकेना। 
गुणे इष्ट धारिष्ट त्याचें चुकेना॥
हरीभक्त तो शक्त कामास मारी। 
जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी॥

ज्याच्या मुखी राम आहे त्याला काम बाधू शकत नाही. (नामसंकीर्तनाच्या) गुणाने विषयवासनांशी झगडण्यात त्याचें धारिष्टय-धैर्य चळत नाही. हरिभक्त हा मोठा बलिष्ठ असून तो कामास मारतो (जिंकतो) अशा प्रकारचे ब्रह्मचारी मारुतीराय धन्य होत.

Friday, February 6, 2026

शरणागति पथ एकला!

शरणागति पथ एकला!ध्रु.

नाम स्मरता 
रामच कर्ता 
कळते मला!१

कृतीच नाही
गर्वहि नाही
दिसते मला!२

नुरे वासना
स्फुरे चेतना
पटते मला!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३७ (६ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

भगवत्प्राप्तीला शरणागतीशिवाय मार्ग नाही व शरणागतीला नामस्मरणासारखा उत्तम उपाय नाही. स्मरण हा मनाचा धर्म असल्याने त्यात कृतीचा प्रश्नच येत नाही. नामाचे स्मरण होत असते, ते करू म्हणून जमत नाही. म्हणून शरणागतीला नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही. शरणागतीचा दुसरा अर्थ म्हणजे कायिक, वाचिक व मानसिक क्रिया थांबवणे. काहीही कृती न करणे हे कृती करण्यापेक्षा फार कठीण असते. गीतेत भगवंतांनी अर्जुनाला तू नुसता मला शरण ये असे सांगितले आहे. देहबुद्धी गेल्याशिवाय शरणागती येत नाही. जगातील वैभवाची आसक्ति व परमात्मप्राप्ती या दोन्ही गोष्टी एकत्र असूच शकत नाहीत. जगाकडे पाठ फिरवल्याशिवाय भगवंत मिळत नाही.

Saturday, January 24, 2026

नामसाधन संतत आवडते विश्वंभरा! पाषाणाही भंगू शके नित्य कोसळती धारा!

नामसाधन संतत आवडते विश्वंभरा!ध्रु.
पाषाणाही भंगू शके नित्य कोसळती धारा!

देह, मन दोन पेठी - मन स्थिर, देह फिरे 
प्रारब्धाच्या खुंट्यामुळे देह पेठे हे तो फिरे 
भगवंती मन स्थिर साधक हो तुम्ही करा!१

नको शंका, नको भय, नको आळस, प्रमाद 
नित्यनेमे जर झाले नाम साधन प्रसाद 
गुरुचरणी जो भाव तोच खास तारणारा!२ 

दृढविश्वासाने नाम मना आवडीने घ्यावे 
पुरे कर्तव्याचे भान तुवा राखावे राखावे 
ऐसा भक्तचि निश्चये प्रिय होतसे ईश्वरा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २४ (२४ जानेवारी) वर आधारित काव्य.

एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड नुसता भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा होईल पण तेच पाणी थेंब थेंब असे एकाच ठिकाणी व अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोक पडेल. त्याप्रमाणे केव्हातरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्यनेमाने जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणामकारक होते. जात्याला दोन पेठी असतात त्यातील एक स्थिर राहून दुसरे फिरत राहिले तर दळण दळले जाऊन पीठ बाहेर पडते पण जर दोन्ही पेठी फिरत राहिली तर दळण दळले न जाता श्रम होतात. माणसाची शरीर व मन अशी दोन पेठी आहेत. त्यातील मन हे स्थिर आहे व देह हे फिरणारे पेठे आहे. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे व देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्या. प्रारब्धाचा संबंध देहापर्यंतच असतो. प्रारब्धरुपी खुंटा देहरूपी पेठ्यात बसून तो त्याला फिरवतो व मनरूपी पेठे स्थिर असते. देह प्रारब्धावर सोडावा.

Thursday, January 22, 2026

गणपती जनप्रिय झाला हो

गणपतीच्या लोकप्रियतेचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पड‌तात; राष्ट्रसंघटनेसाठी त्याने खानेसुमारी केली. मोजले गेलेल्या लोकांचा समूह म्हणजे गण- ज्यांच्याजवळ काही गुण आहेत अशांचीच गणना व्हायची. अशा लोकांचा - गणांचा तो नायक झाला. शिस्त - श्रमविभागणी - सहकार हे गुण त्याने निर्माण केले. शासन आणि जनसामान्य यांच्यात जेव्हढा जिव्हाळा गजाननाने निर्माण केला तेवढा एखाद्यानेच केला असेल - ऐकू याच त्याची महती!


गणपती जनप्रिय झालाऽ हो 
विघ्नेश जनप्रिय झाला...!ध्रु.

आधी केले मग सांगितले 
संघटनेचे जाळे विणले 
जनतेत मिसळूनी गेला हो!१ 

देह ढगळ साधीच राहणी 
ज्ञान खोल, बारीक पाहणी 
हा वात्सल्याचा सागर हो!२

व्यक्ती व्यक्ती याने गणिली
परिस्थितीची पारख केली 
गुण थोडा ही घे मिळता हो!३

स्वतंत्र प्रज्ञाधारी नेता 
तो सुखकर्ता तो दुखहर्ता
जिव्हाळा निर्मी जगती हो!४
 
पराक्रमीही तरी संयमी 
न्यायी निष्ठुर परंतु प्रेमी 
गणराज्य रमे गुणगानी हो!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

(गणेशदर्शन या गणपती वरील काव्या मधून)
केरवा, राग कर्नाटकी