Wednesday, April 15, 2026

सत्संगाचा लाभ मोठा! आनंदा ना तोटा!

सत्संगाचा लाभ मोठा! 
आनंदा ना तोटा!ध्रु.

मन द्रव्यांतरि गुंतत नाही 
ओढ हरीची लागुन राही 
गहिवर ये प्रभु स्मरता!१

सर्व गुणांचा सागर ईश्वर 
तो संतांचा बनतो किंकर 
अपार संत महत्ता!२ 

विकार विरती, विचार स्फुरती
हृदि पाजळती ज्ञानज्योती 
विश्व धवळले आता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०६ (१५ एप्रिल) वर आधारित काव्य.

सत्संगतीच्या योगे मन पैक्यावर गुंतून राहात नाही. जे सुख चिरकाल टिकणारे नाही ते घेऊन काय करायचे? पैक्यासारख्या निर्जीव वस्तूत आपले मन किती गुंतून राहते! पैशाचे नाव अर्थ, पण तो करतो मोठा अनर्थ. पैसा प्रपंचाला पुरेसा असावा! म्हणजे किती तर पेन्शन असेल तर त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला. आपल्याला अडचण नाही पडली, की आपली श्रीमंतीच आहे. पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र आग्रहाने करावा आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे. आपण आतून निष्काम, निर्लोभ व निरिच्छ असावे. सत्संगती पासून सद्विचार व सद्वासना प्राप्त होतात. ज्याचे विचार चांगले तो मनुष्य खरा चांगला होय; व जिथे भगवंताचे अनुसंधान आहे तेथे राहणे हीच खरी सत्संगति होय.

Tuesday, April 14, 2026

ऋणी असावे यासाठी, संत जागे करताती

ऋणी असावे यासाठी, संत जागे करताती!ध्रु. 

त्यांची तळमळ 
क्षाळितसे मळ 
चुकल्या पथिका मधुर बोलुनी पथावरी आणती!१

त्यांच्या लीला 
जग तरण्याला 
स्वार्थाचा लवलेश न चित्ती ते तर शुद्धमती!२

अनुभव बोले
हृदयी ठसले
संतांच्या आज्ञेचे पालन देही दे मुक्ती!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०५ (१४ एप्रिल) वर आधारित काव्य.

संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो; म्हणून चांगल्या विचाराच्या माणसांची संगत धरावी. आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला, परंतु संतांनी आपल्याला जागे केले. ते ज्या लीला करतात त्या जगाच्या कल्याणासाठी असतात. ते स्वस्थ बसलेले दिसले तरी जगाचे कल्याण करीतच असतात. ज्या संतांचा ग्रंथ आपण वाचतो, त्यांच्या कृपेवाचून तो नीट समजणार नाही. ज्याच्यावर त्यांची कृपा आहे, त्याला काही विद्वत्ता नसताना देखील त्या ग्रंथाचा बरोबर अर्थ अगदी स्वाभाविकपणे कळेल. संतांची आज्ञा पालन करणे म्हणजे संतसेवाच होय. सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनविणे हा खरा सत्समागम आहे.
आपल्याला जीवनांतील ध्येयाचा विसर पडल्यामुळे संत आपल्याला जागे करतात.

Monday, April 13, 2026

देह सावलीप्रमाणे हे, ज्ञान संतांना

देह सावलीप्रमाणे हे, ज्ञान संतांना!ध्रु. 

व्यवहारापुरती 
तयांसी असते देहस्मृती
विकार म्हणुनी कधि न बाधती संतांचिया मना!१

जगाहुनी भिन्न-
तयांसी भक्ति हेंच अन्न 
भक्ति भोजनी, भक्ति प्राशनी, भक्ति पुरे श्वसना!२

लोकांती, एकांती
बिघडत ना शांती
वेदांताचे मर्म खरोखर ठावे या सज्जना!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०४ (१३ एप्रिल) वर आधारित काव्य.

साधुसंत देहास सावलीप्रमाणे मानतात. सावलीला दुःख झाले म्हणून रडणे मूर्खपणाचे आहे; म्हणूनच संतांच्या मनावर सुखदुःखाचा परिणाम होत नाही. संतांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृती असते. संत एकांतात जातात याचे कारण असे की लोकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात व एकांतात भेटणारे निराळे असतात. लोकांतात संतांची शांती बिघडते असे मुळीच नाही, पण एकांतात भेटणाऱ्यांना लोकांतात भेटता येत नाही, म्हणून ते एकांतात जातात. संतांच्या वचनाचा ओढून ताणून अर्थ करू नये, त्याचा सरळ अर्थ घ्यावा. संतांचे ज्ञानच असे असते की त्यांना वेदांताचे मर्म आपोआप कळते.

Sunday, April 12, 2026

साधावी गुरुसेवा, होण्यासी भगवद्भक्ती

साधावी गुरुसेवा, होण्यासी भगवद्भक्ती!ध्रु. 

भगवंताची मूर्ती दिसली 
तीच मानली गुरुमाउली 
गुर्वाज्ञेचे पालन होता संपणार आसक्ती!१

जिज्ञासा जर तीव्र जाहली
प्रगतीसाठी वाटच खुलली
जोपासावी निष्ठा शिष्या तीच महत्तम शक्ती!२

खोल तळाशी जाता जाता
विचारमौक्तिक हाती येता 
अभ्यासी रंगावे - ध्येयाची होण्या प्राप्ती!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०३ (१२ एप्रिल) वर आधारित काव्य.

भगवंताची मूर्ती पहावी व तीच आपली गुरुमाऊली मानावी. संताजवळ राहावे व भक्तीचे साधन करावे.  भगवंताची भक्ती व्हायला गुरुसेवा हे एक मुख्य साधन आहे. अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही, पण संत समागम प्रारब्धाने होतो. संतांना जिज्ञासा मूळचीच असते, आपल्याला ती नाही म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे.  काही केल्याशिवायत सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय म्हणजे सत्संगती होय.

Saturday, April 11, 2026

साधने न साधते जे, सत्संगे साधते

साधने न साधते जे, सत्संगे साधते!ध्रु. 

संत राहतात देही
परी ते विदेही 
अहर्निश चित्तावरी राज्य त्यांचे चालते!१

संतवचन परिसावे 
तसे तसे आचरावे
विषय याचना त्यांपाशी जराही न साजते!२

'राम कर्ता' मानतात 
भूती देव पाहतात
संत्संगी साधकासी आत्मज्ञान होते!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०२ (११ एप्रिल) वर आधारित काव्य.

संतांनी जगातील राज्य मिळवली नाहीत, पण त्यांनी स्वतःवर राज्य केले. संतांचे वचन पूर्णपणे समजून ऐकत जावे.  आपल्या आणि संतांच्या कर्मामध्ये फरक आहे.  ' राम कर्ता ' या भावनेने त्यांनी कर्म केले, आपण आपलेपणाने ते करतो, म्हणून आपल्याला कर्म बंधनकारक बनते.  जो विषयाचे प्रेम देईल तो खरा संत नव्हे. साधनांनी जे साधत नाही ते संतांचे सहवासात राहिल्याने साधते. आपण ज्या संताकडे जातो त्याला विषयाचे प्रेम असत नाही, इतकेच नव्हे तर त्याच्या माणसाने विषयांमध्ये मग्न राहिले असता त्याच्या हृदयाला पीळ पडतो.  आपण विषयमग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटते. जिज्ञासू शिष्य भेटला तर संताना आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते.

Friday, April 10, 2026

कैसे वर्तावे या जगती

सज्जन सांगती कैसे वर्तावे या जगती!ध्रु.

बंधनास कारण 
मनाची ठेवण
सुखदुःख देइ न दुसरा असो द्यावे चित्ती!१

राबावे अखंड
जाळुनी पाखंड 
फलाशा न बाळगावी तीच थोर भक्ती!२ 

उगम जसा रामी 
विलय तसा रामी 
रामार्पण होण्याची ही सांगतात रीती!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०१ (१० एप्रिल) वर आधारित काव्य.

बंधनास खरे कारण परिस्थिती नसून आपल्याच मनाची ठेवण हे आहे. जाणिवेने जैसे घ्यावे। तैसे मनाने सुखदुःख भोगावे। अखंड राखावे अनुसंधान। येणे कर्म होईल सहज रामार्पण। प्रयत्नेविण राहो नये। फळाची आशा ठेवू नये। भगवंताला विसरू नये।

Thursday, April 9, 2026

तुम्ही संत थोर कृपावंत

तुम्ही संत थोर कृपावंत!ध्रु.

मनाचे खंबीर 
सागर गंभीर 
फुलविता जगती वसंत!१

धीर पुरविता
पाठिशी राहता
वानू कैसे सद्‌गुण अनंत!२

आळस असेना 
फलाशा शिवेना 
महीवरी तुम्ही भगवंत!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०० (९ एप्रिल) वर आधारित काव्य.

संत आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतात, परंतु आपला अभिमान आपल्या आड येतो व आपण संतांना नावे ठेवतो.  जगाचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी जो सुखदुःखाच्या जाळ्यात सापडला नाही, त्याच्याकडे जावे. संत कर्म करूनही त्याच्या फळाच्या आशेने लिप्त होत नाहीत.