Sunday, June 7, 2026

नाम सदोदित घ्यावे- नामरंगि रंगावे!

नाम सदोदित घ्यावे-
नामरंगि रंगावे!ध्रु. 

नित्याचा हा नियम 
वाढवि रामावरचे प्रेम  
ध्यावे जीवे भावे!१

नामस्मरणे मानसशुद्धी 
खचित होतसे भक्तिवृद्धी
नित्यकर्म पाळावे!२

राम मिळतसे दिव्यप्रेमे 
श्वासासह ते नामहि घेणे 
सोऽहं भावि रमावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५९ (७ जून) वर आधारित काव्य.

नित्यनेम म्हणजे काय? नित्याचा जो नियम तो खरा नित्यनेम होय. नित्य कोण? जो कधी बदलत नाही तो नित्य. म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा. नियम करणे याचा अर्थ नियमन करणे, निग्रह करणे, वश करून घेणे, स्वाधीन ठेवणे हा होय. आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे, त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणे, याचे नाव नित्यनियम होय. भगवंताचे नाम अखंड घेणे हा आपला खरा नित्य नियम आहे. इतर सर्व गोष्टी शास्त्राची बंधने, पोथी वगैरे वाचणे, स्नान संध्यादी नित्यकर्मे पाळावीत; पण त्यांचा हट्ट व आग्रह असू नये. कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे नाम मात्र सोडू नये एवढाच हट्ट क्षम्य आहे. शुद्ध भावनेने नाम घेतले की भगवंत दर्शन देतो. भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमानेच वश होतो. परमार्थ आपोआप वाढावा, त्याला ताण देऊन वाढवू नये. सतत नाम घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते आणि सर्व शंका आपोआप विरून जातात. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे यातच जीवनाचे सर्वस्व आहे.

Friday, June 5, 2026

प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे जीवनी रामा भरावे!

प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे
जीवनी रामा भरावे!ध्रु.

शुद्ध हेतू बाळगावा
राम गावा, राम ध्यावा 
पाविजे मग तो स्वभावे!१

राम मी ही राम तू ही
राम वसतो सर्व ठायी
दुःखहरणे तोष पावे!२

भावभक्ती तनि मुरावी
बाह्य वृत्ती आवरावी 
राम आपण अनुभवावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५७ (५ जून) वर आधारित काव्य.

परमार्थात शुद्ध हेतू ठेवून स्वतःपासून सुरुवात करावी. निर्भेळ हेतू शिवाय भजन केले तर त्याचा उपयोग काय? आस्तिक हा भगवंत सर्व ठिकाणी भरलेला आहे हे जाणतो. पक्षाला हजार लोक जेवायला घालणाऱ्यापेक्षा जो आईबाप जिवंत असताना त्यांची सेवा करतो तोच खरा पुत्र. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल.

Tuesday, June 2, 2026

भगवंतावर अकारण प्रेम करणे याचेच नाव परमार्थ

अकारण प्रेम हाच परमार्थ!ध्रु.

अभिमानाचे नाव नसे
भगवंती दृढ भाव असे
जागता देव अंतरात!१

मन असो समाधानात 
जनि साधावा एकांत 
रंगणे नित्य भजनरंगात!२

मी माझे हे भान सुटावे
मी रामाचा हृदयि स्फुरावे 
बसता एकाच ठायि निवांत!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५४ (२ जून) वर आधारित काव्य.

भगवंतावर अकारण प्रेम करणे म्हणजे परमार्थच. जो प्रपंचात उबगला तो भगवंतास शरण गेला. आपण अडाणी झाल्याशिवाय, म्हणजे आपली विद्या व मोठेपण विसरल्याशिवाय परमार्थ साधत नाही. जेथे असमाधान फार तेथे दुष्ट शक्तींना काम करायला वाव मिळतो. देहाचा मनाशी संबंध आहे, आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे, म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे, म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल. ज्याने व्यवहार तपासून केला त्याला परमार्थ साधलाच. भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ. मनुष्याला परमार्थ किती साधला हे त्याच्या बोलण्यावरून व दृष्टीवरून ओळखता येते.

Tuesday, May 26, 2026

रामनाम घेता घेता नाम स्वये व्हावे! भगवंताच्या स्मरणी राहुनि पुण्य जोडावे!

रामनाम घेता घेता नाम स्वये व्हावे! 
भगवंताच्या स्मरणी राहुनि पुण्य जोडावे!ध्रु.

नामस्मरणे आत्मोद्धार
नाम व्हावा सहजोद्गार 
सद्‌बुद्धीसी कधि न साधके फाटे फोडावे!१

सद्बुद्धीचा दाता राम 
तारक राम, भयहारक राम 
प्रारब्धे आलेल्या भोगा हासत भोगावे!२

नाम स्मरता येती सद्‌गुण
नाम स्मरता पळती दुर्गुण 
राम भानु वरि येता सोऽहं पद्मे उमलावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १४७ (२६ मे) वर आधारित काव्य.

जो नामस्मरण करतो असे म्हणतो तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते. कारण जी व्यक्ती नामस्मरण करते ती स्वतःचा उद्धार करून घेत असते, म्हणजे पर्यायाने माझ्यावर उपकारच करीत असते. भगवंताचे स्मरण हे सद्बुद्धीला व विस्मरण हे दुर्बुद्धीला कारण आहे. सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिले पाहिजे, परंतु व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवणे हे त्याहिपेक्षा श्रेष्ठ होय. अनुसंधानात स्त्री-पुरुष, श्रीमंत -गरीब, हे भेद नाहीत. इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते हाच या युगाचा महिमा आहे. इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र होणे याला अनुसंधान असे म्हणतात. देवा प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस.

Monday, May 25, 2026

गृह स्वर्ग हे गमावे!

आधी असे पहावे 
गृह स्वर्ग हे गमावे!ध्रु.

नामात राहिल्यास
भवभ्रांतिचा निरास 
भजनात दंग व्हावे!१

आनंद हा विशाल
स्वार्थास घालवील 
नामे मनी ठसावे!२

आनंद हाच नित्य
तो देवरूप सत्य
विषयातुनी वळावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १४६ (२५ मे) वर आधारित काव्य.

आपली वृत्ति अशी असावी की ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. जीवन हे मूलतः आनंदमय आहे. सृष्टिक्रमावर सोडले तर ते सुखी होईल. सर्व जगाला आनंद हवा असतो. आनंद हा शाश्वत आहे; पण आपण विषयातच आनंद मानतो, त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही. वासना भगवंताकडे वळवली तर माणसाला आनंदरूप बनविते, पण ती जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते.  वासना, म्हणजे अभिमान किंवा मीपण, हा मनुष्याचा शत्रू असून तो त्याच्या आनंदावर विरजण घालतो. वासनेला जिंकण्यास भगवंताच्या नामात राहण्यासारखा दुसरा उपाय नाही. वासना न ठेवता कर्म करणे याचेच नाव संन्यास. जेथे वासना संपली तेथे आनंदच आहे. सदासर्वकाळ नामात राहिल्यास वासनेचा हळूहळू अंत होऊन केवळ आनंदच आपल्याजवळ राहील.

Thursday, May 21, 2026

अट्टाहासे निदिध्यासे, नाम घ्यावे नाम घ्यावे!

गोडी कळो अथवा न कळो, नाम घ्यावे, नाम घ्यावे!
अट्टाहासे निदिध्यासे, नाम घ्यावे नाम घ्यावे!ध्रु.

हवा आनंद आनंद 
घेणे नामाचाच छंद 
गावे सुस्वर, नाचावे नाम घ्यावे राम व्हावे!१

नामस्मरणात हित
होऊ वासनारहित
जाणण्यास भगवंता नाम घ्यावे नाम गावे!२

जरी प्रपंच अपूर्ण 
करी रामराया पूर्ण
राम आहे प्रेममूर्ति रामा नामात पहावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १४२ (२१ मे) वर आधारित काव्य.

उगीच वरवर नामस्मरण करू नये, ते अट्टाहासाने व अंत:करणपूर्वक घ्यावे यातच खरे हित आहे. प्रत्येक जीवाला भगवंताची गरज असल्यामुळे त्याच्याशिवाय त्याला चैन पडत नाही. प्रपंचात कुठेतरी कमतरता नेहमी असायचीच, त्याची पूर्तता भगवंताशिवाय होत नाही. आपल्याला असणारी तळमळ ही भगवंताची म्हणजे पूर्णत्वाची तळमळ आहे. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. भगवंत हा प्रेम-मूर्ति आहे.  आपण आपले मागील घडलेले सर्व भगवंतांना अर्पण करावे, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते.

Tuesday, May 19, 2026

दुःखाचे हे मूळ, पडला रामाचा विसर!

दुःखाचे हे मूळ, पडला रामाचा विसर!ध्रु.

रामासंगे नाही दुःख 
रामावीण नाही सुख
विटत नाही विषया जीव अज्ञानी पामर!१

जे जे धन हाती आले
रामाविण वाया गेले
खरे सुख ते लाभे ना लागे हुरहूर!२

"मी माझे" विसरायाचे 
राम दास मज व्हायाचे 
जोडताच रामराणा दुःख जात दूर दूर!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १४१ (२० मे) वर आधारित काव्य.