Wednesday, April 29, 2026

डोळे असुनी आंधळे त्या संतच कोठे भेटेना!

डोळे असुनी आंधळे त्या संतच कोठे भेटेना!ध्रु.

अंतरी भावाची वाण 
जवळि ना थोडी ही जाण 
विषयकर्दमी लोळला त्या गंगाजलही पिववेना!१

अहंता सोडि नच ज्याते
तयाची झिंग चढत जाते 
सुटेना ज्यास आसक्ती तयांसी तोल गवसेना!२

असत् जे तेच उरि धरि‌ले
भ्रमाने सत् ही लाथाडिले
फेकिले दूर जर परिसा, लोहता खचित संपेना!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२० (२९ एप्रिल) वर आधारित काव्य.

कामवासना आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला विघातक आहेत.  एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण "स्व" देणार नाही, "स्व" देऊन "सर्व" ठेवले तरी चालेल पण "सर्व" घेऊन "स्व" ठेवला तर मात्र ते चालणार नाही. म्हणजेच "मी देतो" ही भावना राहिली, तर सर्वच देणे वाया जाते.  संतांचा संतपणा दिसत नाही, याचे कारण आमच्यात तळमळ नाही. सत्ययुगात जो राम होता तोच आजही आहे, पण माझा भावच कमी झाला त्याला काय करावे? जो भगवंताचा झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले व त्यालाच खरे समाधान मिळाले.

Tuesday, April 28, 2026

संत हवासा वाटावा, देव तयांतचि भेटावा!

संत हवासा वाटावा, 
देव तयांतचि भेटावा!ध्रु. 

वाट चुकली तर संगे येतो 
बोट पकडुनी तो चालवितो
तो करुणाघन बरसावा!१

विषय सुटावा, शिव गाठावा 
भेद मिटावा, भ्रमहि फिटावा 
हृदयासनि बसण्या यावा!२

उक्ति कळावी, कृती घडावी
संत अनाथा मार्गी लावी 
तळमळ लागो या जीवा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११९ (२८ एप्रिल) वर आधारित काव्य.

विषयाची आवड कमी होऊन खरी तळमळ लागली म्हणजे संत भेटतो. असंताची आवड नाहीशी होईल तेव्हाच संत हवासा वाटेल.  विषय आपल्याला त्रास देतात पण ते सोडावे कसे हे समजत नाही.  जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपले झाले आहे. आपली वाट चुकली आहे असे ज्याला वाटेल तोच जंगलातून बाहेर जाण्याची वाट विचारतो. कर्ममार्ग सांभाळताना "कर्ता मी नव्हे" हे सांभाळणे जरूर आहे. स्वतःला कसे विसरावे हे कळण्यासाठीच संतांना शरण जावे. ज्याचे अंत:करण शुद्ध आहे तो स्वतः तर आनंदी असतोच, पण त्यामुळे भोवतालचे वातावरणही आनंदाचे बनते.

Sunday, April 26, 2026

संते महत्कार्य केले भगवंता सगुणी आणिले!

संते महत्कार्य केले
भगवंता सगुणी आणिले!ध्रु.

प्रेम आले साधनी 
राम भरला लोचनी 
जणु पुण्य फळा आले!१

"राम कर्ता" बोधिले 
"राम दाता" वर्णिले 
भिन्नत्वचि विलया नेले!२

रुचि आली सेवेसी
वसला देव हृदयदेशी
सद्गुरु प्रसाद अनुभविले!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११७ (२६ एप्रिल) वर आधारित काव्य.

भगवंताला सगुणामध्ये आणला हा संतांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे. संतांनी आपल्याला सांगितले की, ही दृश्य मूर्ती तुझी आहे, "तुला हव्या असणाऱ्या सर्व वस्तू देणारा भगवंत तोच आहे" ही जाणीव व  कल्पना आपल्या ठिकाणी वाढत गेली तर त्यामुळे "भगवंत दाता आहे" ही जाणीव उत्पन्न होईल. "भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझ्या सुखाचा आधार आहे, तो माझे कल्याण करणारा आहे," ही जाणीव झाली की, जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेनेच मिळाले ही भावना होऊन, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकेल. सर्व भोग भोगून काळजी नसणे हे उपासनेचे खरे बीज आहे. जगाचे खरे स्वरूप कळण्यास सगुण उपासनाच कारणीभूत आहे. आपण ज्या मूर्तीची उपासना करतो त्या मूर्तीमध्ये तेज वाढत असते.

Friday, April 24, 2026

दान एवढे द्यावे संता, आज्ञापालन व्हावे

दान एवढे द्यावे संता, आज्ञापालन व्हावे!ध्रु. 

तुम्ही भगवंताच्या मूर्ती 
तुम्ही ध्येयाची परिपूर्ती
श्रद्धाबळ अंतरात संता जोमाने वाढावे!१

हवेपण जधी कण ना उरले
दुःखाचे ते कारण सरले
अपुल्या चरणींची धूली मज संता झणी करावे!२

अपार आहे सद्गुरु महिमा
साधुसंत साक्षात् परमात्मा
अपुल्या स्मरणे यावा गहिवर मस्तक पदि टेकावे!३

 रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११५ (२४ एप्रिल) वर आधारित काव्य.

संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे.
मनाच्या विषादाला कारण एकच असावे की, भगवंताचा मी अजून झालो नाही. हवेपण नाहीसे झाले म्हणजे मग दुःखाचे कारणच राहात नाही. श्रद्धेने जे काम होते ते दुसऱ्या कोणत्याही तपश्चर्येने होत नाही. गुरु म्हणजे साक्षात् परमात्मा. त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या.

Wednesday, April 22, 2026

अपार सत्संगाचा महिमा!

अपार सत्संगाचा महिमा! 
अगाध सत्संगाचा महिमा!ध्रु.

ऐसे दुसरे साधन नाही 
भगवंताप्रत घेऊन जाई
प्रकाश नुरवी लेश तमा!१

संतांना या मरण कुठे 
जन्ममृत्युचे मूळ तुटे 
या महिम्यासी नच उपमा!२

ईश्वर आहे याची प्रचिती
या संतांची निरखा भक्ती
अनुभवाच यांचा प्रेमा!३

देहाचा मग विसर पडे
भगवंताचे स्मरण घडे
संतोषाची परिसीमा!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११३ (२२ एप्रिल) वर आधारित काव्य.

मनुष्य जन्मास येणे, संतांची भेट होणे, आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणे, या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत. म्हणूनच संतसमागमासारखा लाभ नाही असे म्हणतात. मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात. आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो. देहाच्या पलीकडे असणारे व कायमचे टिकणारे आणि देहाला विसरून व देवाला स्मरून जे मिळवायचे असे भगवंताचे सुख आहे ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे. संत आपल्याला सत्य स्वरूपाची ओळख करून देतात. संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोहोचतात. संगतीचा परिणाम जितका नकळत होतो, तितका कृतीचा होत नाही म्हणून सत्संगती धरावी.

Tuesday, April 21, 2026

त्यात समाधान थोर आहे

संताज्ञापालन, संतसमागम!
त्यात समाधान थोर आहे!ध्रु. 

देव कर्ता मानावे 
अभिमाना सांडावे 
आत्माराम तेणे क्षणी तोषताहे!१

नव्हे मी देहाचा
नव्हे मी मनाचा
विषयाची नावड सत्संग देताहे!२ 

देव असे भावात
देव वसे नामात
नामचिंतामणी भक्ता लाभलाहे!३

संत लाज राखे
संत भक्ति पोखे 
मधुर वचने प्रेम वर्षताहे!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११२ (२१ एप्रिल) वर आधारित काव्य.

समाधान एकपणात आहे, अद्वैतात आहे. मी कर्ता नसून देव कर्ता आहे असे मानावे. मी नाही कोणाचा हे बघावे. मी देहाचा व मनाचाही नाही. संत विषयाची आसक्ती कमी करतात; अशा संतास शरण जावे. देव भावात असतो; तो भाव शुद्ध व उच्च असावा. सत्समागम म्हणजेच सत्याचा समागम; संत सांगतील त्याप्रमाणे वागावे. भगवंताला विसरून भजन करू नका. जगाच्या लाजेला भिऊन भगवंतास अंतर देऊ नये. निर्विषय चित्त संतांनाच करता येते. नामाच्या योगानेच संत ओळखता येतात, जोडता येतात, आणि टिकविता येतात.

Monday, April 20, 2026

संत सह‌वास भाग्य हेच थोर!

संत सह‌वास भाग्य हेच थोर!ध्रु.
 
तेणे रामरूप जाहलेसे मन 
अतां अम्हांलागी दिसे जग शून्य
संते मरणाचा संपविला घोर!१

देहबुद्धि गेली, भक्ति रुजविली
"मी तो परमात्मा" खूण पटविली
संते पिटाळिला दूर दूर चोर!२  

संते जोडियले श्वासासंगे नाम
मन घोकु लागे क्षणोक्षणी राम
देवा बांधण्याते दिला सोऽहं दोर!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १११ (२० एप्रिल) वर आधारित काव्य.