अपार सत्संगाचा महिमा!
अगाध सत्संगाचा महिमा!ध्रु.
अगाध सत्संगाचा महिमा!ध्रु.
ऐसे दुसरे साधन नाही
भगवंताप्रत घेऊन जाई
प्रकाश नुरवी लेश तमा!१
संतांना या मरण कुठे
जन्ममृत्युचे मूळ तुटे
या महिम्यासी नच उपमा!२
ईश्वर आहे याची प्रचिती
या संतांची निरखा भक्ती
अनुभवाच यांचा प्रेमा!३
देहाचा मग विसर पडे
भगवंताचे स्मरण घडे
संतोषाची परिसीमा!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११३ (२२ एप्रिल) वर आधारित काव्य.
मनुष्य जन्मास येणे, संतांची भेट होणे, आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणे, या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत. म्हणूनच संतसमागमासारखा लाभ नाही असे म्हणतात. मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात. आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो. देहाच्या पलीकडे असणारे व कायमचे टिकणारे आणि देहाला विसरून व देवाला स्मरून जे मिळवायचे असे भगवंताचे सुख आहे ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे. संत आपल्याला सत्य स्वरूपाची ओळख करून देतात. संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोहोचतात. संगतीचा परिणाम जितका नकळत होतो, तितका कृतीचा होत नाही म्हणून सत्संगती धरावी.