Tuesday, June 23, 2026

शुद्ध हेतु राखावा - प्रचीती घ्यावी!

शुद्ध हेतु राखावा - दक्षता घ्यावी!
कृती सहज अनुरूप - प्रचीती घ्यावी!ध्रु.

विषय विसरावे, भजनि रंगावे
हवेपण जावे, तत्त्व बिंबावे
विस्मृती नको देवाची आस पुरवावी!१

प्रपंची रमले, संत निंदिले
स्वहित ऐकले, सोडुनी दिधले
दुर्दशाच अश्रद्धांची गाठी बांधावी!२ 

देव हृद‌यात, सकळ जीवात 
शोध जो घेत, तृप्त तो होत 
नामौषधि रोगा पळवी निरंतर घ्यावी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १७५ (२३ जून) वर आधारित काव्य.

मनुष्याने शुद्ध हेतु ठेवण्याचा प्रयत्न करावा.  हेतु शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरूप होऊ लागते व प्रगतीला मदत होते. ज्याला विषयाची गोडी असते, त्याला नाही परमार्थाची गोडी लागत. जो खरा कर्ता आहे त्याचे मोठेपण खरे असते खरे कर्तेपण भगवंताचे असल्याने त्याच्याकडे ते द्यावे, म्हणजे मोठेपण त्याच्याकडे जाते. आयुष्यात काही दिवस तरी मी कोणाचा नोकर नसून मी भगवंताचा आहे असे माणसाला वाटावे याकरता भगवंत ज्या ठिकाणी आहे तेथे त्याला शोधा. तो सर्वांच्या हृदयात आहे. म्हणून तेथे त्याला पहा. "देव आहे" असे खऱ्या अर्थाने वागणारे जगामध्ये थोडेच असतात. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे.

Sunday, June 21, 2026

द्रव्य जसे संसारी, "भाव" हवा परमार्थी!

द्रव्य जसे संसारी, "भाव" हवा परमार्थी!ध्रु.

भावे कळे देव
भावे मिळे देव
सहज खात नैवेद्य पाषाणाची मूर्ती!१

देहे आचरावे कर्म
मुखे उच्चारिता नाम
स्तंभातही झाली भक्ता ईश्वराची प्राप्ती!२

बीज जळे वासनेचे
विस्मरण मीपणाचे 
नारायणा नेमे करी भक्तिभावि वस्ती!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १७३ (२१ जून) वर आधारित काव्य.

प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हास देवाची प्राप्ती होईल. आपल्यासारख्या आस्तिकांना देव "हवा" असे वाटते पण "हवाच" असे वाटत नाही. आपल्या प्रपंचाच्या मदतीसाठी देव हवा असे वाटते. प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातील कर्तव्यांची आवड असावी. देहाने ते कर्तव्य करावे व मनाने मात्र अनुसंधान ठेवावे. दगडातील माती अनेक यंत्रांनी व चाळणीने चाळून काढून टाकतात व नंतर सोने हाती लागते, त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात  व ज्यांना व्याप नाही तेहि लोक रडतात. मग सुख कशात आहे? सुख हे समजुतीमध्ये आहे, आणि भगवंताचे होणे हीच समजूत तेवढी खरी आहे. आपल्या देहावर आपली सत्ता नाही, आपल्या पैशावर आपली सत्ता नाही, आपल्या माणसांवर आपली सत्ता नाही, म्हणून आपण कर्तव्य तेवढे करावे आणि ते करीत असताना आपले मन दुश्चित होऊ देऊ नये. आपल्या इच्छेनुसार सर्व गोष्टी घडत नाहीत ही भगवंताची कृपा आहे.

Friday, June 19, 2026

खरोखर सर्वस्वा मुकलो!

स्वराज्यातला सरसेनानी
विकारवश होताच त्याक्षणी  
न्यायनिष्ठ राजास सोडुनी
हराम मी झालो 
खरोखर सर्वस्वा मुकलो!

कुठुन आठवे मला अवदसा
पापाचा घेतला मी वसा
गनिमाच्या लष्करात शिरूनी 
गुलाम मी बनलो 
खरोखर सर्वस्वा मुकलो!

आता केवळ मरणयातना
जगण्याची, मज नुरे वासना 
अनंत मरणे आधी मरूनी 
स्वजनद्रोही ठरलो 
खरोखर सर्वस्वा मुकलो!

घडेल कैशी इथुन मुक्तता 
धर्मांतर मज एकच त्राता 
पापक्षालनासाठि आज मी 
धर्मा आंचविलो
खरोखर सर्वस्वा मुकलो!

काल लक्ष्मण, आज बिभीषण 
नियती खेळे मजशी भीषण
वाल्या कोळ्यापरी आज मी 
पापपंकि रुतलो
खरोखर सर्वस्वा मुकलो!

चुकलों मी कर्तव्यपालनी 
दण्ड परी भोगण्यावाचुनी
व्यक्तीसाठी राष्ट्रहिताचा 
घातक मी ठरलो 
खरोखर सर्वस्वा मुकलो!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, June 12, 2026

दुःख द्वैतामध्ये आहे, सुख एकामध्ये!

दुःख द्वैतामध्ये आहे, सुख एकामध्ये!ध्रु.

प्रपंचाच्या दहा दिशा 
परमार्था एक दिशा 
तिच्याकडे लक्ष देणे मर्म हेच साधे!१

जन्महेतु परमार्थ
होमिणे हो निजस्वार्थ 
परमार्थ शिकताना देहबुद्धि बाधे!२

वासनेचे बीज सूक्ष्म 
कधी येत पालवून 
नामस्मरणात रहा तृप्त होत संतबोधे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १६४ (१२ जून) वर आधारित काव्य.

द्वैतामध्ये दुःख आहे तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे. प्रपंचाच्या दहा दिशा आहेत, पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे, तिच्याकडे आपण लक्ष लावावे . काही न करणे, अर्थात मनाने, हा खरा परमार्थ होय. परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे हे आपल्याला कळत नाही.  वासनेचे सूक्ष्म बीज आपल्यात कुठेतरी दडलेले असते त्यामुळे लौकिक सुटत नाही. याकरता संतांनी स्वतः एक मार्ग सुचवला आहे आणि तो म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची उर्मी उठू न देणे. आपण काही न करताच संतांना दोष देतो. प्रपंचातील विघ्न ही सूचनावजा असतात ती आपल्याला जागे करतात. जन्मास आलो ते भगवंतांना ओळखण्याकरता हे विसरू नये म्हणून विघ्नांची योजना असते.

Sunday, June 7, 2026

नाम सदोदित घ्यावे- नामरंगि रंगावे!

नाम सदोदित घ्यावे-
नामरंगि रंगावे!ध्रु. 

नित्याचा हा नियम 
वाढवि रामावरचे प्रेम  
ध्यावे जीवे भावे!१

नामस्मरणे मानसशुद्धी 
खचित होतसे भक्तिवृद्धी
नित्यकर्म पाळावे!२

राम मिळतसे दिव्यप्रेमे 
श्वासासह ते नामहि घेणे 
सोऽहं भावि रमावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५९ (७ जून) वर आधारित काव्य.

नित्यनेम म्हणजे काय? नित्याचा जो नियम तो खरा नित्यनेम होय. नित्य कोण? जो कधी बदलत नाही तो नित्य. म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा. नियम करणे याचा अर्थ नियमन करणे, निग्रह करणे, वश करून घेणे, स्वाधीन ठेवणे हा होय. आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे, त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणे, याचे नाव नित्यनियम होय. भगवंताचे नाम अखंड घेणे हा आपला खरा नित्य नियम आहे. इतर सर्व गोष्टी शास्त्राची बंधने, पोथी वगैरे वाचणे, स्नान संध्यादी नित्यकर्मे पाळावीत; पण त्यांचा हट्ट व आग्रह असू नये. कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे नाम मात्र सोडू नये एवढाच हट्ट क्षम्य आहे. शुद्ध भावनेने नाम घेतले की भगवंत दर्शन देतो. भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमानेच वश होतो. परमार्थ आपोआप वाढावा, त्याला ताण देऊन वाढवू नये. सतत नाम घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते आणि सर्व शंका आपोआप विरून जातात. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे यातच जीवनाचे सर्वस्व आहे.

Friday, June 5, 2026

प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे जीवनी रामा भरावे!

प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे
जीवनी रामा भरावे!ध्रु.

शुद्ध हेतू बाळगावा
राम गावा, राम ध्यावा 
पाविजे मग तो स्वभावे!१

राम मी ही राम तू ही
राम वसतो सर्व ठायी
दुःखहरणे तोष पावे!२

भावभक्ती तनि मुरावी
बाह्य वृत्ती आवरावी 
राम आपण अनुभवावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५७ (५ जून) वर आधारित काव्य.

परमार्थात शुद्ध हेतू ठेवून स्वतःपासून सुरुवात करावी. निर्भेळ हेतू शिवाय भजन केले तर त्याचा उपयोग काय? आस्तिक हा भगवंत सर्व ठिकाणी भरलेला आहे हे जाणतो. पक्षाला हजार लोक जेवायला घालणाऱ्यापेक्षा जो आईबाप जिवंत असताना त्यांची सेवा करतो तोच खरा पुत्र. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल.

Tuesday, June 2, 2026

भगवंतावर अकारण प्रेम करणे याचेच नाव परमार्थ

अकारण प्रेम हाच परमार्थ!ध्रु.

अभिमानाचे नाव नसे
भगवंती दृढ भाव असे
जागता देव अंतरात!१

मन असो समाधानात 
जनि साधावा एकांत 
रंगणे नित्य भजनरंगात!२

मी माझे हे भान सुटावे
मी रामाचा हृदयि स्फुरावे 
बसता एकाच ठायि निवांत!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५४ (२ जून) वर आधारित काव्य.

भगवंतावर अकारण प्रेम करणे म्हणजे परमार्थच. जो प्रपंचात उबगला तो भगवंतास शरण गेला. आपण अडाणी झाल्याशिवाय, म्हणजे आपली विद्या व मोठेपण विसरल्याशिवाय परमार्थ साधत नाही. जेथे असमाधान फार तेथे दुष्ट शक्तींना काम करायला वाव मिळतो. देहाचा मनाशी संबंध आहे, आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे, म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे, म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल. ज्याने व्यवहार तपासून केला त्याला परमार्थ साधलाच. भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ. मनुष्याला परमार्थ किती साधला हे त्याच्या बोलण्यावरून व दृष्टीवरून ओळखता येते.