शुद्ध हेतु राखावा - दक्षता घ्यावी!
कृती सहज अनुरूप - प्रचीती घ्यावी!ध्रु.
कृती सहज अनुरूप - प्रचीती घ्यावी!ध्रु.
विषय विसरावे, भजनि रंगावे
हवेपण जावे, तत्त्व बिंबावे
विस्मृती नको देवाची आस पुरवावी!१
प्रपंची रमले, संत निंदिले
स्वहित ऐकले, सोडुनी दिधले
दुर्दशाच अश्रद्धांची गाठी बांधावी!२
देव हृदयात, सकळ जीवात
शोध जो घेत, तृप्त तो होत
नामौषधि रोगा पळवी निरंतर घ्यावी!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १७५ (२३ जून) वर आधारित काव्य.
मनुष्याने शुद्ध हेतु ठेवण्याचा प्रयत्न करावा. हेतु शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरूप होऊ लागते व प्रगतीला मदत होते. ज्याला विषयाची गोडी असते, त्याला नाही परमार्थाची गोडी लागत. जो खरा कर्ता आहे त्याचे मोठेपण खरे असते खरे कर्तेपण भगवंताचे असल्याने त्याच्याकडे ते द्यावे, म्हणजे मोठेपण त्याच्याकडे जाते. आयुष्यात काही दिवस तरी मी कोणाचा नोकर नसून मी भगवंताचा आहे असे माणसाला वाटावे याकरता भगवंत ज्या ठिकाणी आहे तेथे त्याला शोधा. तो सर्वांच्या हृदयात आहे. म्हणून तेथे त्याला पहा. "देव आहे" असे खऱ्या अर्थाने वागणारे जगामध्ये थोडेच असतात. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे.