Tuesday, December 30, 2014

ऐका कहाणी गीतेची : अध्याय चौथा - ज्ञानकर्मसन्यासयोग



अध्याय चौथा - ज्ञानकर्मसन्यासयोग

ऐकव गीते तुझी कहाणी, निर्मळ निर्मळ तुझी वाणी 
भगवंताच्या वाणीला धार अगदी विलक्षण 
ज्ञान ज्यातून प्रकट होते ओजस्वीच असे ते भाषण 
कर्मयोग अनुसरला तर सहज लाभे आत्मज्ञान
श्रद्धा हवी, संयम हवा, श्रोता हवा सावधान 
जन्मकर्म दिव्यच असते लोकोत्तर या पुरुषांचे 
रहस्य जाणत अवतारांचे ते तर मोठे भाग्याचे 
आत्मतत्त्वा धरुन चालता ढळत नाही तोल कधी 
भगवंताचे कर्मच असे बाधत नाही त्याला कधी 
मिळवायाचे काहीच नाही तरी कर्म करीत असतो 
जीवेभावे करता कर्मे उदाहरण ठेवून जातो
धर्मग्लानी जेव्हा होते, अधर्म थैमान घालत सुटतो
तेव्हा तेव्हा मीच पार्था येथे अवतार घेत असतो
मागचे पुढचे सगळे स्मरते पूर्वापार कर्मयोग 
परंतु पामर विसरून गेले गिळती त्यांना विषयभोग 
इंद्रियांचे व्हावे स्वामी मनावरती अंकुश हवा 
त्याची धाव जरी बाहेर निर्धारे त्या आत वळवा 
भोगात काय ठेवले बाबा, त्यागात आगळा आनंद आहे 
नकोत विद्या नकोत कला भक्त भक्तीत रंगत आहे
देहापासून देवाकडे जर पाहिजे घ्याया झेप 
वासना ठेव वासुदेवी सरेल जन्ममरण खेप 
वैराग्याचे ज्ञान मुरते, विवेक साधना बहीण भाऊ 
आनंदाचे लाडू आपण निरंतर खात जाऊ 
जुळले नाते आईचे, प्रेमाचे पुण्याईचे 
संवादाची घेत रुची, ऐका कहाणी गीतेची, ऐका कहाणी गीतेची



Sunday, December 28, 2014

ऐका कहाणी गीतेची : अध्याय तिसरा - कर्म योग



अध्याय तिसरा - कर्म योग 

ऐकव गीते तुझी कहाणी निर्मळ निर्मळ तुझी वाणी
अर्जुन मोठा खट्याळ होता कर्मच टाकू पहात होता 
लोभच सोडला फलाचा लेप न लागे कर्माचा 
’मी कर्ता’ हे विसरून जा आनंद आगळा मिळवत जा 
दिवा दिव्याने लागे जसा सत्कर्माचा खोल ठसा 
कर्म ऐसे सहज घडावे टक लावून बघत राहावे 
वाढे जैसी तन्मयता सुटतो बघ सगळा गुंता 
मना उलटता होते नाम कर्मही घडते ते निष्काम 
कर्मा दे भक्तीची जोड जीवन वाटे बघ बहु गोड 
अन्न जसे जगण्याकरिता कर्म तसे देहाकरिता 
अत्यावश्यक हे युद्ध धनंजया हो कटिबद्ध 
पराक्रमाची शर्थ करी आत्मोन्नति रे तुझ्या करी 
ऐकत जो गीतावचने त्याच्या भाग्या काय उणे? 
संग सोडूनी कर्म करी यज्ञ करी हे ध्यानी धरी 
जबाबदारी जो जाणे त्याला ना कधी पडे उणे 
विकास कर्माने करता नरजन्माला सार्थकता 
वडीलधारे जे करती इतर लोक ते अनुसरती 
आळसास का द्या थारा उद्योगाने पोट भरा 
कामक्रोधच शत्रु खरे शत्रुंजय त्या संहारे 
धर्मरक्षणा झुंजावे दैत्यांना निर्दालावे 
हातपाय नच गाळावे आत्मबला जोपासावे 
गीता मातांची माता ती कळते गाता गाता 
जुळले नाते आईचे प्रेमाचे पुण्याईचे 
संवादाची घेत रुची ऐका कहाणी गीतेची, ऐका कहाणी गीतेची 

ऐका कहाणी गीतेची : अध्याय दुसरा - सांख्य योग


अध्याय दुसरा - सांख्य योग

ऐकव गीते तुझी कहाणी निर्मळ निर्मळ तुझी वाणी
शिष्य तुझा मी पार्थ बोलला भगवंताला शरण गेला 
करू काय मी? प्रश्नच पडला कढत आसवे ढाळू लागला 
ज्याचा शोक करायला नको अर्जुन त्याचाच शोक करतो 
शिकवावे जर त्याला काही,         पांडित्याच्या बाता मारतो 
वस्त्र पुराणे जसे टाकणे जीर्ण शरीरा सोडून देणे
यात रडण्यासारखे काय नव्हे देह मी घोकत जाय
लढावेच लागते क्षत्रियाला या कर्माचा का कंटाळा? 
लढून जिंकता राज्य लाभते रणात मरता कीर्ती होते 
आत्म्याचा जो करी विचार तो ना केव्हाच बावरणार 
ऊठ अर्जुना निर्धार कर चापबाण तू हाती धर 
रणात लढणे धर्म तुझा नकोस शोधू मार्ग दुजा 
लाभहानि समान मान सुखदु:खांना समान मान 
ऐसी संधी येणार नाही शत्रूंना कर त्राहि त्राहि 
कर्म करावे तो अधिकार अरे फलाचा नको विचार 
कर्म टाळतो दळभद्री खांद्यावरती झोळी धरी 
यश येवो अपयश लाभो देह भले राहो जावो 
समत्व ज्याला हे जमले तो तर तरला योगबले 
भगवंताचा हा आवेश मोह घालवण्या नि:शेष 
ज्याची प्रज्ञा स्थिरावली महीवरी तो महाबली 
आत्म्यातच जो संतुष्ट त्याला ना कुठले कष्ट 
दु:ख न करते उद्विग्न सुखे न जाई हुरळून 
हवे नकोची ना बाधा सत्पुरुषाला त्या वंदा 
प्रसाद जर हृदयी भरला बुद्धी स्थिर तेथे अमला 
कृष्ण स्वये तैसा होता निर्वातीचा दीप जसा 
ऐकत राही धनंजय जमेल मजला मनोजय? 
पाठीवर मायेचा हात बघता बघता गीता पाठ 
मन सारे एकवटून ऐका कहाणी गीतेची, ऐका कहाणी गीतेची 

Saturday, December 27, 2014

ऐका कहाणी गीतेची : अध्याय पहिला - अर्जुनविषादयोग



अध्याय पहिला 
अर्जुनविषादयोग 

ऐकव गीते तुझी कहाणी निर्मळ निर्मळ तुझी वाणी 
धनुर्धराला काय झाले ’धनुष्यबाण’ गळून पडले 
मोहन जवळ असतानाही ऐसे कैसे मोहे गिळले?
पंडु सुताचा ऐसा विषाद कधी कोणा झाला होता? 
महाभारती रणांगणावर नवलाचेही नवल घडले 
शस्त्रे टाकून धनंजयाने शांतीवरती प्रवचन झोडले
कृष्णावाचून श्रोता कोण? रथा सारथी दुसरा कोण? 
त्याने सर्व ऐकून घेतले, रोगनिदान मनात केले! 
बोललाच नाही एक अक्षर, पार्थाचा जीव खालीवर 
तोंड कोरडे, भोवळ आली, कंप सुटला देहाला 
जो युद्धाचा हेतू होता त्याचाच विसर पडलेला 
आचार्यांना आप्तांनाही रणात मारून मिळणार काय? 
त्रैलोक्याचे राज्य नको मज, शस्त्रत्यागा ना पर्याय
यावर काय बोलू तरी मी, वेडा सांगे तत्त्वज्ञान
विवेक ज्याला गेला सोडून, त्याचे सगळी सुटले भान 
तो जे बोले बोलू द्यावे, तो जे ओके ओकू द्यावे
झुंजेन मी घमेंड होती, नाही लढणार खोटी उक्ती 
एक विषण्ण, एक प्रसन्न, का ही ऐशी होते स्थिती? 
घसरणारा घसरत गेला, बोलून सगळे पुरता थकला 
आता पुढे होणार काय, कृष्ण काही सांगणार काय?
गीता सांगते या ना आत, चालणार्‍याला मिळते वाट 
ऐसे घेई विश्वासात, सर्वच गीता करूया पाठ 
जुळले नाते आईचे, मुलेबाळे आवडीची
संवादाची रुचि घेत, ऐका कहाणी गीतेची, ऐका कहाणी गीतेची 

Friday, December 26, 2014

ऐका कहाणी गीतेची

१९९९ मध्ये अण्णांनी म्हणजे श्रीराम बाळकृष्ण आठवले यांनी लिहिलेले हे लिखाण. याची छोटीसी पुस्तिका ही त्यांनी काढली होती आणि स्वतःच्या आवाजात त्यांनी घरच्या घरी ध्वनीमुद्रणही केले होते. ते क्रमश: ब्लॉगवर टाकायचा प्रयत्न करतो आहे..

ऐका कहाणी गीतेची

ऐका कहाणी गीतेची । ऐका कहाणी गीतेची ॥धृ॥
गोविंद जय जय । गोपाळ जय जय
माधव जय जय । मुकुंद जय जय
ज्ञान वितरते, भक्ती शिकवते, गाते महती कर्माची ॥१॥

अश्रू पुसते, गोड हसवते
निर्भय करते, जवळी घेते
नरदेहाची करुनि बासरी, फुंकर घाली सोऽहंची ॥२॥

जन्मा आला मरावयाचा
मरायचा तो पुन्हा यायचा
रडायचे ना, झुरायचे ना, दिंडी पुढेच न्यायाची ॥३॥

नका गोंधळु, वदे गोंधळी
ज्ञानांजन तो नयनी घाली
पुढचे सुचवी, सावध करवी, किमया गोपालकृष्णाची ॥४॥

तुण तुण तुण तुण वदे तुणतुणे
कडाडतो डफ, झांज झणझणे
फुरफुरताती कैसे बाहु, गाथा लिहवी शौर्याची ॥५॥

जो जो जैसा मला भजतसे
त्याला मी तैसा पावतसे
भक्ति वाढता वाढे शक्ती, युक्ति साधते मोक्षाची ॥६॥

घराघरातून पोचो गीता
कराकरातून विलसो गीता
तुडवित काटे तरीहि हासत वाट चालणे ध्येयाची ॥७॥

नित्यकर्म सवयीचे होता
आस फलाची निघून जाता
सहजसमाधी देते साधून शाल पांघरे मायेची ॥८॥

नादमधुरता प्रासादिकता
प्रसन्न गायक, प्रसन्न श्रोता
कृष्णार्जुनसंवादापुढती साखरही लाजायाची ॥९॥

ऐसे मंथन सुंदर झाले
नवनीतहि मग वरती आले
ज्ञानबा तुकया टिळक विनोबा सेवित गोडी गीतेची ॥१०॥

कारागारी रहस्य लिहिले
गीताप्रवचन तिथे चालले
जे ज्याचे त्या करिता अर्पण तृप्त तृप्तता रामाची ॥११॥

****