Tuesday, October 31, 2017

अशी व्हावी सहजच एकादशी.



अशी व्हावी सहजच एकादशी

देहच देहू तुकया आत्मा गात्रे इंद्रायणी
आळंदी मन, ज्ञाना आई, घे मज उचलूनी
ती पाजत प्रेमाचा पान्हा काय उणे मजशी?
अशी व्हावी सहजच एकादशी ! १

मायबाप विठ्ठल रखुमाई धरता ती पाउले
आज्ञापालन हातुन घडता विठ्ठल घरी आले
पुंडलिकास्तव सान विटेवर तिष्ठे हृषिकेशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! २

हरिपाठाची गोडी लागे, रुजते मनि ओवी
अभंगवाणी श्रीतुकयाची हरि वेणू वाजवी
विवेक सद्गुरु अंतरी वसुनी मजला उपदेशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ३

नकोस शिणवू काया वाया, नको दूर तुज जाण्या येण्या
बोरे चाखी, सेवी पोहे, कृष्ण चापतो कण्यावर कण्या
भक्तिभाव भर सांभाळुन धर माथ्यावर कळशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ४

तू जे करशी कल्याणाचे श्रद्धा दृढ राहो
सबुरी होवो मज सवयीची देह भले जावो
स्वरूप आनंदाने न्यावे मज पवनाशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ५

राम कृष्ण हरि, ज्ञानबा तुकाराम गजर पडो कानी
भानुदास एकनाथ पैठणहुन ये मृदुल मधुर वाणी
भागवताचे निमित्त करुनी कधी हृदयी धरशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ६

मी कर्ता हा नकोच ताठा पाण्यासम व्हावे
पाट काढुनी वाट दिली त्या दिशेनेच जावे
हे जगदीशा वनराईतुन फुलांतुनी हसशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ७

मन कोणाचे नच दुखवावे पथ्या पाळावे
परस्परांशी मधुर भाषणे मैत्र जुळुन यावे
तो मी तू ही मुळात एकच गिरवु पाठाशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ८

भाजी भाकर सेवन केली व्रत नच मोडेल
पचायला जड टाळावे कोठे बिघडेल
गावकऱ्यांनी प्रेमभराने कराव्यात चौकशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ९

प्रश्न विचारुन शंका फिटती समाधान होते
कारण येते शोधाया मग रहस्य उलगडते
समजावुन ते द्यावे जे जे कळते आपणासी
अशी व्हावी सहजच एकादशी ! १०

देशी भाषा वेषहि देशी चालरीत देशी
प्रचलित सगळ्या प्रांतांमध्ये असे कधी करशी
रामराज्य भूवरती नांदे दिसु दे सगळ्यांशी
अशी व्हावी सहजच एकादशी ! ११

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, October 22, 2017

नास्तिक.



देवा तुज जन नित्य प्रार्थिती
कोणी तव प्रतिमांना पुजिती
मला मात्र निष्क्रीय बघोनि
जन म्हणति मज 'नास्तिक' नास्तिक' ।।१।।

मला न मूर्तिपुजा आवडे
बाह्याचरणी मम मन न रमे
मी तुज चिंतित असे मनीं पण
जन म्हणती मज 'नास्तिक' नास्तिक' ।।२।।

बाह्यात्कारी तव स्तुति करुनि
हृदयि भयानक द्वेष धरुनि
राक्षस जगि या आस्तिक ठरती
जन म्हणती मज 'नास्तिक' 'नास्तिक'।।३।।

दगडामघ्ये देव असे का?
आकाशामधिं नित्य वसे का?
सर्वाभूतीं ईश्वर बघता
जन म्हणती मज 'नास्तिक' नास्तिक' ।।४।।

पुरुनी टाका द्वेष भावना
सारे जग हे एक कल्पना
उरी बाळगा असे सांगता
जन म्हणती मज 'नास्तिक' नास्तिक' ।।५।।

- श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७ जानेवारी १९५५

Saturday, October 21, 2017

ओवाळणी



सांग भगिनी! घालू तुजला कोणती ओवाळणी?
लाडका भाऊ तुझा मी पातलो गावाहुनी।।ध्रु.।।

गगन किती हे उंच आहे, येतसे का मोजतां
रत्नाकराची भव्यता येईल कोणा वर्णितां
माया तुझी तैशी मला बोलुं ना देते अता
मूक माझ्या भावना या दाटु बघती लोचनी!१

ताई, मजसाठिच तू गे देह अपुला झिजविला
प्रेमरस पाजुनी तू मज सुस्वभावी बनविला
तुजपुढे मी सान मूर्ति काय देऊ मी तुला?
वाटते ऐसे मला, व्हावे न मी कधि अनृणी!२

तेल उटणे लावुनि गे न्हाउ घालि तू मला
होउ दे अजि मज फिरूनी बंधु तुझा सानुला
बाळपणचा सोहळा तो फिरुनि लाभो आजला
भेट परि गे अल्पशी तू गोड घेई मानुनी!३

- श्रीराम बाळकृष्ण आठवले
   ७ ऑगस्ट १९५५

Thursday, October 19, 2017

एवढे दान दे आता....



एवढे दान दे आता
ते प्रेम शिकव भगवंता! ध्रु.

मन दुसऱ्याशी समरस व्हावे
परदु:खाने व्याकुळ व्हावे
लाजविण्या नवनीता!१

जनहितार्थ मी नित्य झटावे
उदात्त उन्नत मानस व्हावे
आतुर नित परमार्था!२

अपराधाचे स्मरण नुरावे
सोसायाला बळ लाभावे
क्षमाशील कर आता!३

अंतरातला विवेक जागव
कुविचारांचा कचरा घालव
केरसुणी दे भक्ता!४

नैराश्याचे नकोच वादळ
पूर्वग्रहांचे काळे बादल
हटवी बघता बघता!५

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

लक्ष्मीमाते...

लक्ष्मीमाते....

लक्ष्मीमाते प्रसन्न होई
दे दे दे वरदान मला!
शांति सुखाचा अक्षय ठेवा
तशी सन्मती देइ मला! ध्रु.

नको द्रव्य मज कष्ट न करता
आलस्याची नकोच वार्ता
जी लागे दुर्बलाकारणी
शक्तिसंपदा देइ मला!१

या देहाचा विसर पडावा
खरा देव ओळखता यावा
जरी दरिद्री मज नारायण -
दिसो, दृष्टि देई विमला!२

श्रद्धा वैभव प्रल्हादाचे
निश्चयबळ ते बालध्रुवाचे
अज्ञानाच्या तमातुनी ने
प्रकाशाकडे जगताला!३

सदाचार हे सोने आहे
सद्विचार हे भूषण आहे
सात्त्विकता सौन्दर्य खरे ते
ती श्रीमंती देइ मला!४

- श्रीराम बाळकृष्ण आठवले
(१९८५ सालची रचना)
लक्ष्मीमाते..
 👆🏻 ऑडिओ

Sunday, October 8, 2017

प्रसाद पुष्पे - समर्थांचे काव्य! अनुभवाचा विषय !

समर्थांचे काव्य! अनुभवाचा विषय !

त्यांची तळमळ, मनाचा प्रांजळपणा, भावनांचा खळाळता प्रवाह, ओजो गुण, प्रासादिकता स्तिमित करून सोडतात.

श्रीरामचंद्रा करुणासमुद्रा! ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा
नेत्री न ये रे तुजवीण निद्रा! कैं भेटसीबा मजला सुभद्रा

श्रीरामाचा वियोग किती असह्य झाला पाहा.

शिवराय छत्रपती झाले.  हिंदवी स्वराज्य स्थापन झाले तो आनंद कसा ओसंडतो पहा

बुडाला औरंग्या पापी, म्लेंच्छ संहार जाहला
उदंड जाहले पाणी, स्नानसंध्या करावया

आपल्या संपूर्ण काव्यामधून समर्थ आपल्या मनाचे आरस्पानी दर्शन घडवितात, आत्मारामाशी सुखसंवाद करतात, चालता बोलता दासबोध करतात आणि मनाची बाहेरची धाव थांबवून त्याला आत वळवून अनंत राघवाचा अनंत मार्ग चालून जाण्यासाठी मनोबोध रचतात.

करुणाष्टके, विविध देवांच्या आरत्या लिहाव्या समर्थांनीच.

रामदासांनी श्रीरामचंद्राला समर्थ म्हणून गौरविले - जय जय रघुवीर समर्थ! तर जनतेला हा रामाचा दासच समर्थ वाटला.  स्वामी वाटला.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

प्रसाद पुष्पे - आधी बीज एकले

प्रसाद पुष्पे - आधी बीज एकले

संतांची जर कृपा असली तर साहित्यिक त्या संतचरित्राशी - संतसाहित्याशी इतके एकरूप होतात की त्यांच्या साहित्याला अभंगत्व प्राप्त होते.

'आधी बीज एकले' ही कै. शांताराम आठवले यांची काव्यरचना!

अभ्यासकांनी तुकाराम महाराजांच्या गाथेत शोध शोध शोधले पण मौज अशी 'तुका म्हणे ' अशी मुद्रा त्या रचनेत नाहीच.

दिसणारे भासणारे सर्व त्या अनंताचेच रूप

आधी बीज एकले। बीज अंकुरले,  रोप वाढले
एका बीजापोटी। तरु कोटि कोटि।
कोटि जन्म घेती। सुमने फळे।
व्यापुनि जगता। तूही अनंता
बहुविध रूपे घेशी। परि अंती ब्रह्म एकले
आधी बीज एकले।

केशवराव भोळे यांचे संगीत आणि पागनीसांचा अभिनय व स्वर.

ती समरसता मला अच्युता
कधी एकदा देशिल का?
देणे घेणे सरले सगळे
मने मोकळा होईन का?


- श्रीराम बाळकृष्ण आठवले


Tuesday, October 3, 2017

कसे जगावे?




कसे जगावे?

कसे जगावे? प्रश्न तुला का अवघड हा पडला
निसर्ग निरखुन पहा मानवा प्रश्न कसा सुटला

बीज स्वतःला दडपून घेई आधी मातीत
मेघ बरसतो नकळत वरती अंकुर येतात
फुलाफळांनी झाड लहडते सुगंध दरवळला

गुण दुसऱ्याचे जगा कथावे वारा हे शिकवी
ओला वारा, गंधित वारा तप्त जनां सुखवी
खुल्या मनाने करी स्वागता कण कण मोहरला

आकाशाचे छत्र शिरावर दूर दूर पसरे
आसऱ्यास जे येती कोणी घे जवळी सारे
मी सगळ्यांचा, सगळे माझे पाठ न का शिकला

ही धरती आधार देतसे सोसत राहे किती
अंगावरती भले विपत्ती येऊ द्याव्या किती
धीर न सोडी ठाम ठाक तू ती शिकवी तुजला

पाणी कैसे तहान शमवी ते तर झुळझुळते
जे जवळी ते जनांस द्यावे जीवन रसरसते
तू सगळ्यांशी वाग सारखा वृत्तीने मोकळा

कुणी निंदु दे कुणी वंदु दे सोड न माणुसकी
देवाशी रे ऐसी आहे सुंदर बांधिलकी
गीता ऐसे जगण्या शिकवी जो शिकला तरला

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

कशाला जगावे?





कशाला जगावे?

भगवंताने तुज पाठविले 'कार्य' करायाला
काय करू मी? कोण बनू मी? करी निर्णयाला!

'जोवर जीवन, हासत जगणे' शिकून घे मंत्र
फूल कसे वेलीवर डुलते शिकून घे तंत्र
सुगंध अपुला जगी उधळते सुखवी सकलाला

तू नच जगशी, श्रीहरि जगवी तो मोठी आई
हरि हरि जप रे तीच बालका आहे अंगाई
थकवा सरतो अनुसंधानी भजनी हरि भरला

तुझे कार्य ही श्रीहरि सेवा ते कसले कष्ट
जीवन आता ओझे नाही कर्मयज्ञ स्पष्ट
तव कर्माची पवित्र समिधा दे दे यज्ञाला

'मीपण' म्हणजे केवळ ओझे भिरकावुन दे ते
शिशुपण बरवे हृदया वाटे मनने ते मिळते
बाळ लाडका तू देवाचा ओळख अपणाला

तुझे कर्म ही सुंदर संधी देवाने दिधली
सफल होतसे आनंदयात्रा जर खेळीमेळी
उत्साहाने पार्थ कसा बघ कर्मा भिडलेला

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, October 2, 2017

प्रसाद पुष्पे - काळ; भगवंताचे रूप!

प्रसाद पुष्पे - काळ ; भगवंताचे रूप!

कालोsस्मि लोकक्षयकृत् प्रवृध्द:
असे भगवंतानेच म्हटले आहे.
अत्यंत चकित होऊन माडगूळकर विठ्ठलाला म्हणतात -

तूच घडविशी, तूच फोडिशी
कुरवाळिशी तू, तूच ताडशी
न कळे यातुन काय जोडशी
मुखी कुणाच्या पडते लोणी
कुणा मुखी अंगार!
विठ्ठला तू वेडा कुंभार!

काळ जात असतो का मनुष्य काळाकडे खेचला जात असतो?

कालगती अगदी अनाकलनीय आहे. त्याला नमस्कार करणे एवढेच आपल्या हाती आहे.

काळ दुःख विसरायलाही मदत करतो.

कालाय तस्मै नमः!

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

प्रसाद पुष्पे - २ ऑक्टोबर! गांधी जयंती!

प्रसाद पुष्पे - २ ऑक्टोबर! गांधी जयंती!

२ ऑक्टोबर! गांधी जयंतीचा दिवस! सत्य, अहिंसा, शांती या सद्भावांचा पुजारी! जगाने महात्मा म्हणून गौरवलेला माणूस!

विशेषत: दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांच्या हातून घडलेले कार्य अद्भुतच म्हणावे लागेल. सामान्य जनतेला निर्भय बनविले. खादीच्या प्रचारासाठी चरख्याचा प्रचार केला. सत्याचे प्रयोग केले आणि लिहिलेही.

"हिंदुस्थानची फाळणी" हे शल्य त्यांना शेवटपर्यंत आतून बाहेरून टोचतच राहिले. महाकाव्याच्या नायकाला शोभावे असे मरण त्यांना आले तेही प्रार्थना सभेला जात असताना!

पवित्र आचरण, सत्याचा आग्रह, स्त्रियांच्या आत्मबलाची जागृती, खेड्यात चला हा संदेश, शिक्षण पद्धतीबद्दल संशोधन, अनेक क्षेत्रात त्यांच्या चिंतनाची मौलिकता जाणवते.

आत्मशुद्धीसाठी त्यांनी केलेली उपोषणे त्यांच्या प्रमाणिकतेची साक्ष देतात.

दुर्दैव हे की गांधीजींसारखे महापुरुष त्यांच्या अनुयायांना कळलेच नाहीत.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Sunday, October 1, 2017

प्रसाद पुष्पे - त्रिगुणांचा हा खेळ चालला.

प्रसाद पुष्पे - त्रिगुणांचा हा खेळ चालला.

तमोगुणाचे वैशिष्ट्यच हे की माणूस मोहाने आंधळा होतो - विकारवश होऊन त्याचा अधःपात होतो. सगळे त्याची कीव करतात. जगात छी:थू होते.

मातीत खेळायचा स्वभाव जाता जात नाही. अंग आणि अंगाबरोबर मनही मलीन होते याची जाण नाही. किती पुटांवर पुटं चढतात.

ती जाण कोणी करून दिली तरच एखाद्या भाग्याच्या क्षणी पश्चात्ताप होऊन पुनर्जन्म व्हायचा.  वाल्याच्या जीवनात तो क्षण आला, खडतर तप केले आणि महाकवी वाल्मीकी बनला.

मध्ये तिष्ठन्ति राजसा:।

आपण बहुधा मधल्या दर्जाचे असू अशी समजूत करून घ्यायची आपण, आणि उर्ध्वम् गच्छंति सत्त्वस्था:।

नामस्मरण, सद्ग्रंथ श्रवण, ध्यान यांची गोडी मनाला लावून घ्यावी. अभिरुची चांगली होईल आणि चिखलात लोळणे नकळतच बंद होईल.

गीता वाचा, स्वतःची योग्यता जाणा, वाढवा. त्यातले विचार आत्मसात करा आणि श्रीकृष्णाचे खरेखुरे भक्त होऊन ध्येयासाठी सुखदुःखांचे आघात सहन करीत दिव्य जीवन जगा.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.