शिवाजी उत्सव हा दुसरा राष्ट्रीय उत्सव टिळकांनी सुरु करून दिला. तो केवळ रायगडावरच न राहता खेडोपाडी पसरला. त्यातून असंख्यांना स्फूर्ती मिळाली. आत्मविश्वास निर्माण झाला. भारतीयांच्या माना अभिमानाने ताठ झाल्या!
-----------------------------------------
रायगडा जाऊ, स्मृतींनी धन्य धन्य होऊ!
शिवभूपा ध्याऊ, शिवाचे उज्ज्वल यश गाऊ!
या भूमीवर स्वराज्य होते
कर्तृत्वाचे पुण्यस्थल ते
दे स्फूर्ती दे भवानी माते!
दिशा दिशा घुमवू - शिवाचे उज्ज्वल यश गाऊ!
समाधीवरी हवीच छत्री
चैतन्याची ही गंगोत्री
अवघे जण तीर्थाचे यात्री
गत वैभव मिळवू - शिवाचे उज्ज्वल यश गाऊ!
तन मोहरले, मन गहिवरले
रायगडाला हासू फुटले
स्वप्न दिव्य नेत्रांत तरळले
या नेत्री पाहू - शिवाचे उज्ज्वल यश गाऊ!
जळी - स्थळी - काष्ठी - पाषाणी
जय स्वराज्य, जय शिव ही वाणी
पुन्हा रंगले शाहिर कवनी
चैतन्ये न्हाऊ - शिवाचे उज्ज्वल यश गाऊ!
उत्सवात या व्यापक दृष्टी
जाति-पंथ जन भुलुनी जाती
स्वराज्य संपादनास स्फूर्ती
येथुनीच घेऊ - शिवाचे उज्ज्वल यश गाऊ!
वाटे जणु शिवकाल पातला
रोम रोम तनि फुलुनी आला
मनगटातला जोर वाढला
पूर्व दिव्य जर, दिव्य अनागत सामर्थ्ये निर्मू
शिवाचे उज्ज्वल यश गाऊ!
रचयिता - श्रीराम बाळकृष्ण आठवले
१.२.१९६८