रायगडावर दूध घालायला हिरा गवळण यायची. हिरकणी तिचं नाव. आपल्या लेकराला पाळण्यात ठेवून लगबगीनं वर दूध घालून ती परतणार होती.
एवढ्यात ती गडावर असतानाच तोफेचे आवाज झाले. गडावरचे दरवाजे बंद झाले. ती भयाभया हिंडली.
आणि सापडली एक बिकट वाट सापडली. अत्यंत उतरणीची वाट! तिची पावलं झपाझप पडू लागली. काटेकुटे, कडेकपाऱ्या यांना न जुमानता ती घरी पोहोचली.
दुसऱ्या दिवशी तिला महाराजांपुढे गडावर आणून हजर करण्यात आले.
तिच्या धैर्याबद्दल महाराजांनी त्या माउलीचा गौरव केला.
--------------------------------
तान्हे राहियले घरी जरी आल्ये गडावरी
माजे काहूर मनात ऊर धडकते भारी।।
अशा कातरवेळेला कटी दुधाची कासंडी
बाळ दुधावाचुनीया आक्रंदुनी विश्व कोंडी
झाले तोफांचे आवाज दारे झाली मला बंद
मन माझे हो बेबंद तया तान्हुल्याचा छंद
शिवा मी रे माय त्याची आण तुला माउलीची
जळाविना तडफड होते कैसी मासोळीची
गेल्ये कशीही घरासी कोणी आडवू धजेना
माझ्या वाहत्या पान्ह्याला कशी रोखू आकळेना
माझ्या घराच्या वाटेला झाले काटेकुटे फुले
किती अवघड कडे माझ्यासाठी झाले झोले
देव माझा पाठीराखा तया घातली मी आण
भेट घडली पिलाशी नुरे सुखलागी वाण
शिवा देई सजा काही नसे मला त्याची तमा
परी माऊली होऊनी करीन मी तुला क्षमा
वच ऐकुनी मातेचे मुखी बोल उमटेना
शिवा पाय धरी तिचे तिज मिळे दुजा तान्हा
आज कलीयुगामाजी झाली अमर कहाणी
धन्य धन्य बाळ तीचे, धन्य धन्य हिरकणी
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment