तोषवी जे अंतरंगा प्रेम ते लाभेल का?
भक्त मी होईन का?ध्रु.
तृषित होउनि धावलो, परि प्यास नाही भागली
जे अशाश्वत तेच भुलवी फजिति ऐसी जाहली
आंधळा डोळे असूनी दृष्टि ती लाभेल का?१
ध्येय ऐसे पाहिजे जे उंच नेते मानवा
तेच साधन जे जिवासी भेटवीते त्या शिवा
कळुनिया कल्याण मजसी प्रगतिपथि राहीन का?२
भ्रांति फिटु दे, मोह सुटु दे चित्त भजनी रंगु दे
आवडीने रामनामा भक्तिभावे गाऊ दे
देह ना मी देव तो मी अनुभवा येईल का?३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०३.१९७४
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ८४ (२४ मार्च वर आधारित काव्य)
मनुष्यजन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. मनुष्यप्राण्याला भगवंताचे प्रेम स्वाभाविक का बरे असू नये? आमचे ध्येय असे असले पाहिजे की त्यातून आम्हाला शाश्वत आनंद मिळवता आला पाहिजे. प्रपंचातील नाना तऱ्हेच्या गोष्टी आम्हाला सुख देतील असे वाटत असते व त्या मिळवण्यासाठी आम्ही अहर्निश झटत असतो. त्या वस्तूत मला समाधान मिळेल ही आमची कल्पना नाहीशी व्हावयास पाहिजे. प्रपंचाची आस जोपर्यंत आम्हाला आहे तोवर भगवंताचे दास आम्हाला होता येणार नाही.