Friday, January 31, 2025

नाम हा देवाचा अवतार!

नाम हा देवाचा अवतार!ध्रु.

जितकी नामे तितकी रूपे
महिमा परि नामाचा लोपे -
फोडावा नामाचा टाहो
प्रतीति मग येणार!१

कुवासनेते पळवुनि लावी
सद्भावाच्या वृक्षा रुजवी
भक्ता करि नामाची झारी
वर्षत अमृतधार!२

नामचि घेणे ना विस्मरणे
श्रद्धा नामी अचल ठेवणे
सूक्ष्म कारणा उपाय सूक्ष्मच
अमोघ तो ठरणार!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३१, (३१ जानेवारी) वर आधारित काव्य.

नाम हा भगवंताचा अवतार आहे. सुष्टांचे रक्षण व दुष्टांचा नाश करण्याकरिता मी अवतार घेतो असे भगवंतांनी गीतेत म्हटले आहे. दुष्टांकडून सुष्टांना त्रास होण्यातच भगवंताच्या अवताराची उत्पत्ती आहे. ज्यांचा छळ झाला असता भगवंताने अवतार घ्यावा ते सुष्टच नामशेष झाल्याकारणाने अवतार तरी कसा व्हावा? पूर्वी सद्वासना जिवंत होती, पण ती उघडपणे कृतीत आणणे कठीण होते. आता सद्वासनाच नाहीशी झाली आहे. म्हणजे पायाच ढासळला आहे, तेथे कृतीचा प्रश्नच उद्भवत नाही. आत्ताचा प्रश्न दुर्वासना जाऊन सद्वासना कशी उत्पन्न होईल हा आहे; म्हणजेच कार्य सूक्ष्मातले आहे. म्हणून जसा रोग, तसे औषध किंवा काट्याने काटा काढावा या न्यायाने उपाययोजना सूक्ष्मातीलच असली पाहिजे. वासना बदलण्याला वासनेइतका जबरदस्त इलाज पाहिजे व तो म्हणजे भगवंताचे नाम. सर्वांनी भगवंताच्या नामाचा टाहो फोडणे जरूर आहे. हे कार्य भगवंताने सगुण रूप धारण करून होणे कठीण आहे; ज्याअर्थी कारण सूक्ष्मातले आहे त्याअर्थी त्याचा इलाजही सूक्ष्मातीलच पाहिजे. म्हणूनच नामावताराची आज गरज आहे. प्रत्येक नामागणिक त्याचा अवतार आहे व त्याची कास धरणे हेच आमचे आजचे मुख्य कर्तव्य आहे.

Wednesday, January 29, 2025

नामसाधनाने जाई अभिमान!

नामसाधनाने जाई अभिमान!ध्रु.

देहबुद्धि जाते 
वृत्ति लीन होते 
नकळत गळते अवघे "मीपण"!१

नामाचे उदक 
अतिव पावक
अंतरंगालागी नाम संजीवन!२

नाम राम घेई
राम क्षेम देई 
भक्तिभावे व्हावे रामपदी लीन!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २८ (२८ जानेवारी) वर आधारित काव्य.

साधन अभिमान घालविण्याकरिता करायचे की वाढविण्याकरिता? अभिमान घालविण्याकरिता म्हणून जे साधन करायचे, त्या साधनाचाच जर तुम्ही अभिमान धरला तर तो तुमचा अभिमान जाईल कसा? आजपर्यंत जे नामस्मरण झाले ते परमात्म्यानेच तुमच्याकडून करवून घेतले व आता तुमच्या हिताकरिताच त्याच्या मनातून तुमच्याकडून करवून घेण्याचे नाही. तुमचे हित त्याला तुमच्यापेक्षा जास्त कळते. नामस्मरण करणारे असे तुम्ही कोण? जे काही होत आहे ते परमात्म्याच्या इच्छेनेच होत आहे. त्यात तुम्ही आपला मीपणा कशाला मिरविता? हा मीपणा, हे कर्तेपण, हे प्रपंचाच्या व परमार्थाच्या जबाबदारीचे ओझे, श्रीसद्गुरूचरणी अर्पण करून खुशाल आपल्या आनंदात मोकळेपणाने का राहात नाही? देहबुद्धी गेली म्हणजे तिच्याबरोबर सर्व कर्मे नष्ट होतात. देहबुद्धी आपल्याला भगवंताचा विसर पाडते. या देहबुद्धीवर आपण नामाच्या मंत्राचे पाणी शिंपडू या, म्हणजे तिची वाढ होणार नाही.

Sunday, January 26, 2025

मागावे ते ऐसे मागणेच सरो अंतकाळी मात्र नाम मुखि उरो!

मागावे ते ऐसे मागणेच सरो
अंतकाळी मात्र नाम मुखि उरो!ध्रु.

तरीच जगावे, अंतकाळ साधे
नामस्मरणाने कलीही न बाधे
प्राणासम नाम अंतरात स्फुरो!१

नाम घेता प्रेम जडतसे नामी
आठवीता राम चित्त रमो रामी
नामप्रेम अंगी सर्वथैव मुरो!२

भक्ति हे साधन मूल ईश्वराचे
राम दृष्टिआड न व्हावा नाम घेइ वाचे
आसक्ति विषयी तीळमात्र नुरो!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २६, (२६ जानेवारी) वर आधारित काव्य.

अंतकाळी नामस्मरण होणे म्हणजेच अंतकाळ साधणे, व हा अंतकाळ साधत असल्यास आणखी जगून काय करायचे? व तो साधत नसल्यास आणखी जगून काय उपयोग? अंतकाळ साधण्यासाठीच जगावे. देवापाशी, "मला तू आपला म्हण, माझे मन तुझ्या चरणी अर्पण केले, आता मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न होवो" असे मागावे. परमेश्वर आपल्या मागेपुढे आहे असे अखंड मानावे. त्याचे स्मरण करणे म्हणजे, जे काही घडत आहे ते त्याच्याच इच्छेने घडत आहे असे समजणे, प्रपंच देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ व परमात्म्यावाचून आपल्यास कोणी नाही याचा दृढनिश्चय होणे याचे नाव ज्ञान.  नामाचा सहवास पुष्कळ करावा, म्हणजे विषयाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडते. भगवंतास दृष्टीआड होऊ न देणे हीच खरी भक्ति, हेच खरे अनुसंधान, हाच खरा परमार्थ व हेच आपले सर्वस्व आहे.

Saturday, January 25, 2025

रामाचे - रामाचे ऽऽ अनुसंधान राहू दे!

रामाचे - रामाचे ऽऽ
अनुसंधान राहू दे!ध्रु.
 
राम स्मरता 
भोग भोगता 
सुशांत होऊ दे!१

रामच कर्ता
तोच करविता 
दर्शन देऊ दे!२ 

राम कीर्तनी 
मुळास पाणी 
विकास साधू दे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२५.०१.१९७९ 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २५ (२५ जानेवारी) वर आधारित काव्य.

नामस्मरण हे प्रपंचाकरिता, म्हणजे तो चांगला व्हावा म्हणून नाही तर प्रपंचाची आसक्ती कमी करण्यासाठी आहे. आपल्याच कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागतात हे खरे, पण भोग आले की आपल्या मनाला चैन पडत नाही. म्हणून मनाला भगवंताच्या स्मरणात गुंतवून ठेवले असता आपले समाधान टिकते. आपल्या सध्याच्या अवस्थेमध्ये भगवंताच्या इच्छेने घडायचे ते घडते, असे मानणे किंवा भगवंत चांगले करील असा विश्वास ठेवून वागणे हेच सोपे जाईल. विषय कसा सुटेल? मन एकाग्र कसे होईल? हे न कळले तरी चालेल. सोडण्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा धरण्याच्या गोष्टीचा म्हणजे अनुसंधानाचा अभ्यास करावा. झाडाच्या मुळाला पाणी घातले की त्याच्या सर्व भागांना ते पोहोचते, तसे भगवंताचा विसर पडू न दिला तर सर्व काही होते. दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे, तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यास त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे.

Thursday, January 23, 2025

नामाचा तुज छंद लागला चाल पुढे पथि अडू नको!

जे झाले ते होउनि गेले
कुढू नको रे, रडू नको!
नामाचा तुज छंद लागला
चाल पुढे पथि अडू नको!ध्रु.

विषय त्यागता
रामी रमता
शांति लाभ तू सोडु नको!१

उठता, बसता
जाता, येता
नित्यनेम तू टाळु नको!२

नाम औषधी
नुरवी व्याधी
शंका कसली धरू नको!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०२.१९७९

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ५५ (२४ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

आपल्या हातून वारंवार चुका होतात असे श्रींना म्हटले तेव्हा श्री म्हणाले लहान मुलगा चालताना अडखळतो, पडतो किंवा बोबडे बोलतो त्याचे आई-बापास मोठे कौतुक वाटते. त्याप्रमाणे मला या तुमच्या चुकांचे कौतुक वाटते. तसेच चुका सावरण्याच्या तुमच्या प्रयत्नांचेही मला कौतुक वाटते. खरा भक्त कधीही दुःखी कष्टी असत नाही. नेहमी आपल्या समाधानात असतो. भक्तास कसलीही आस नसते त्यामुळे त्याला दुःख नसते. परमात्म्याची इच्छा हीच त्याची इच्छा असते. सगुणाची भक्ती करता करता त्याला मी चा विसर पडत जातो. मी नसून तूच आहेस ही भावना दृढ होत जाते. प्रापंचिकाने सगुण भक्तीने तरून जावे. देहबुद्धी असणाऱ्या माणसाला सगुणावाचून भक्ती करताच येत नाही. भगवंतांना आपण सांगावे की भगवंता तुझी कृपा मजवर असू दे, आणि कृपा म्हणजे तुझे स्मरण मला अखंड राहू दे. आपल्या हातून होणाऱ्या चुकांचे परिमार्जन नामच करू शकते. भगवंताचे नाम हे सर्व रोगांवर रामबाण औषधच आहे. नामाचे हे औषध सतत थेंब थेंब पोटात गेले पाहिजे. गुरुने एकदा सांगितले की तुझे मागचे सर्व गेले पुढे मात्र वाईट वागू नकोस तर शिष्याने ते श्रद्धेने खरे मानावे.

Wednesday, January 22, 2025

संसाराच्या सागरात घालू नामरूपी होडी!

संसाराच्या सागरात घालू नामरूपी होडी!ध्रु. 

नको भोगांची लालसा 
घेऊ विरक्तीचा वसा 
अहंकार छिद्र बुजवू करू तातडी तातडी!१ 

हाती विवेकाचे वल्हे 
संतसद्‌गुरूंनी दिले 
वेगे वल्हवू ही होडी जावयाचे पैलथडी!२

नामासाठी घेऊ नाम 
सखा एक आत्माराम
घेऊ देवाजीचे नाम आम्ही भाबडे नावाडी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २२, (२२ जानेवारी) वर आधारित काव्य.

आपण ऐहिक सुखाचे प्राप्ती करता नाम घेतो किंवा मी नाम घेतो ही अहंकाराची भावना बाळगतो. या उपाधीमुळे आपल्या प्रगतीला बरेच अडथळे येतात म्हणून नामाकरिताच नामस्मरण व तेही सद्गुरु आपल्याकडून करवून घेतात या भावनेने करावे. त्या योगाने अहंकार नष्ट होऊन शरणागती येईल.
शरणागतीला रामनाम हाच रामबाण उपाय आहे. भवसागर तरून जाण्यास नाम हेच साधन आहे. मनुष्यप्राणी भवसागरात गटांगळ्या खात आहे. समुद्रातून तरून जाण्यास जशी नाव, तसं भवसागरातून तरून जाण्याला भगवंताचे नाव आहे. फक्त संसाररूपी समुद्राचे पाणी नामरूपी नावेत येऊ देऊ नये. म्हणजेच कोणत्याही प्रापंचिक अडचणीमुळे नामात व्यत्यय येऊ देऊ नये. तसेच नामाचा उपयोग संसारातील अडचणी दूर होण्याकरताच व्हावा ही बुद्धी न ठेवता नामा करिताच नाम घ्यावे म्हणजे नावेत पाणी न शिरता सुखरूपपणे पैलतीराला म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचता येते. वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचे नाव घेतले तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही.

Tuesday, January 21, 2025

नामस्मरण करा घराचे सुंदर मंदिर करा

 ॐ 

नामस्मरण करा घराचे सुंदर मंदिर करा 
महाराज ही नामी शिकवण रामच आणा घरा!ध्रु.

प्रेम दिल्याने प्रेम वाढते अपुली कामे करू 
मना उलटता नाम होतसे अनुभव गाठी धरू 
समंजसपणा वर्षभर जणू दिपवाळी दसरा!१ 

जो जो भेटे राघव समजा पाहुणचार करू 
प्रेमे बसवू भोजनास त्या तृप्त तयाला करू 
अन्नदान तर यज्ञच छोटा आग्रहपूर्वक करा!२

ओवी वाचा श्लोक म्हणा हो वाणी सुधारेल 
नमस्कार सूर्यास घालता आरोग्य नांदेल 
प्रपंच अवघा श्रीरामाचा जाण जरा ही धरा!३ 

मी माझे चे फेकू ओझे गोपगडी होऊ 
सद्‌गुरु राम नि कृष्ण भाव हा जागृत नित ठेवू 
रामराज्य ये घरोघरी तर स्वप्नच साकारा!४ 

बाळ गणूचे निमित्त केवळ ब्रह्मच चैतन्य 
तुकामाय जे वदले त्याचा आशय जनमान्य
कवि श्रीरामा महाराज हो निजहृदयासि धरा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
०३.०६.१९९७
(गोंदवलेकर महाराजांवरील काव्यातील एक काव्य.)

Monday, January 20, 2025

रामा, ध्यास तुझा लागु दे!

रामा, ध्यास तुझा लागु दे!ध्रु.

तळमळ वाढो, वाढो भक्ती
हवी वाटु दे तुझीच प्राप्ती
वेड तुझे लागु दे!१

' मी रामाचा ' वदु दे वाचा
विसर पडू दे निज देहाचा
विश्वात्मक होउ दे!२

निवांत मजसी बसता यावे
मानस माझे विषयि विटावे
तव रंगी रंगु दे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २९९ (२५ ऑक्टोबर) वर आधारित काव्य.

ईश्वराची प्राप्ती व्हावी ही मनापासून तळमळ लागली पाहिजे. ज्यास अशी तळमळ लागली त्याचे निम्मे काम झाले. ज्याप्रमाणे मोठी इमारत बांधताना तिचा पाया अगोदर बळकट असावा लागतो, त्याप्रमाणे खरी तळमळ लागली म्हणजे पुढील कार्य होण्यास फार अडचण पडत नाही व हे होण्यास भाग्य लागते. आपण मनाने रामाचे आहोत असे ठरवून देहाने प्रपंच करावा म्हणजे प्रपंच न बिघडता उलट चांगला होतो.  माझ्याकडे इतके जण येतात पण एकाने तरी मला रामाची प्राप्ती करून द्या म्हणून विचारले आहे काय? मी आलो आहे, तो तुमचे विषय पुरविण्यास आलो आहे काय? समजा, एक जण चोरी करायला निघाला व वाटेत त्यास मारुतीचे देऊळ लागले. तेथे त्याने जाऊन मारुतीला नवस केला की मला जर आज चोरीत यश आले तर मी तुझे देवळावर सोन्याचा मुकुट चढवीन; तर आता सांगा त्या मारुतीने काय द्यावे? त्याने त्याच्या नवसास पावावे असे तुम्हाला वाटते काय? जर नाही, तर तुम्ही विषय मागितले व मी दिले नाहीत तर मला दोष का देता? आपणास नवस करायचा असेल तर असा करावा की ' मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे, म्हणजे समाधान राहील, व दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ नये. ' म्हणजे मग आपणास त्याचे होऊन राहता येईल.

Sunday, January 19, 2025

दोन अक्षरात कथा श्रीमहाराजांची नाम राम, राम नाम भूमिका तयांची!

ॐ 

दोन अक्षरात कथा श्रीमहाराजांची
नाम राम, राम नाम भूमिका तयांची!ध्रु.

नामास्तव अवतरले ब्रह्म भूवरी 
चैतन्यच रसरसले ते खरोखरी 
अन्नदान नित्य घडो प्रेरणा तयांची!१

नाम सदा स्मरत चला काळजी नको
जे घडले हितकर ते खंत ही नको
श्वास श्वास जपत नाम सत्यकथा त्यांची!२ 

खेडे बहु आवडते गरीब ही तसे 
शेती त्या आवडते राबणे तसे 
नाम अन्न, नाम उदक आवड त्यांची!३
 
घर मंदिर व्हावे हे बोध तयांचा 
नाम हेच राम खचित शोध तयांचा
क्षण न कधी दवडावा रीति तयांची! ४ 

गोंदवले नोंदवले खोल स्पष्टसे
प्रतिमा ती नामरूप अंतरी ठसे
समाधान फलश्रुती श्रवणभक्तिची!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१८.०८.१९९७
(गोंदवलेकर महाराजांवर आधारित काव्य)

Saturday, January 18, 2025

आत्मसुखाचा अनुभव देण्या अवतरली गीता!

हरि: ॐ तत् सत्
 

आत्मसुखाचा अनुभव देण्या अवतरली गीता!ध्रु.

अपुल्या ठायीं अनुभव घेणे 
अनुभव घेतो हेहि विसरणे
सिद्धांताशी साधुनि देण्या सहजी समरसता!१

शब्दाविण संवाद करावा 
स्वानंदाचा अनुभव घ्यावा
स्वरूपस्थिती असते कैशी बोधितसे गीता!२

परमानंदु भोगत राही 
इंद्रियांस तर वार्ता नाही 
जीभ चाखते जणु अपुली चव भोगित अद्वैता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
२८/१२/१९७३

खालील ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे मधील प्रवचन क्रमांक ५ वर आधारित काव्य.

हे शब्देवीण संवादिजे। 
इंद्रियां नेणतां भोगिजे।
बोला आदि झोंबिजे । प्रमेयासी ॥१:५८

Tuesday, January 14, 2025

जय जगदंबे माते। करि करुणा गे माते!

।। जय माताजी ।।

जगदंबा ! सगळ्यांची आई ! भक्ताने तिची मानसपूजा आरंभिली ! "जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते "तिच्याच पदी अर्पिलें-
जगदंबेचे लेकरू म्हणत आहे -

++++++++

जय जगदंबे माते। करि करुणा गे माते!ध्रु.

सुवर्णमंडप सजला इथला
रत्नखचित आसन घे तुजला
आसनस्थ हो, मानसपूजा स्वीकारी माते!१

स्नान घातले उष्ण जलाने 
तुज लेवविली विविध भूषणे
कुंकुमलेपन केले सुंदर स्मितवद‌ने माते!२ 

केस धुपवुनी वेणी घातली 
चंदनचर्चित काया सजली 
छत्र, चामरे, दर्पण तुजला अर्पियली माते!३ 

त्रिभुवनजननी कृपा असू दे 
शिरि मायेचे छत्र असू दे 
नामस्मरणी रात्रंदिन मज रंगू दे माते!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०४.१२.१९७३

Thursday, January 9, 2025

नाम घ्यायाचे! नाम घ्यायाचे!

नाम घ्यायाचे! नाम घ्यायाचे!
नाम घ्यायाचे! नाम घ्यायाचे!ध्रु.

विकल्प उठले
बरेच झाले
काय त्यात भ्यायाचे!१

नाम घेतले
चित्त क्षाळले
सार्थक जगि आल्याचे!२

विकार जाई
विवेक येई
स्वागत करु या त्याचे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०९.०१.१९७९

गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक ९ (९ जानेवारी) वर आधारित काव्य.

मनुष्य नाम घेऊ लागला की विकल्पांना असह्य होते, आणि आता हा नाम घेऊ लागला, आता आपली धडगत नाही, अशा धास्तीने त्यांची चळवळ चालू होते, आणि मनुष्याला नामापासून परावृत्त करण्याचा ते प्रयत्न करतात. विकल्प हे अती सूक्ष्म आहेत. त्यांचे उच्चाटन करायला त्यांच्यापर्यंत पोहोचणारा आणि तितकाच सूक्ष्म असा उपाय पाहिजे. तो उपाय म्हणजे भगवंताचे नाम.  
नाम घेऊ लागल्यावर विकल्प येऊ लागले तर गांगरून न जाता, हे सुचिन्ह आहे असे समजून, विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्‍ली मिळाली अशा जाणिवेने, जास्त आस्थेने नाम घेण्याचा निश्‍चय करावा. विकल्प जाऊन भगवंताचे संकल्प उठू लागले की आपले काम झाले. आपण रस्त्याने चाललो की नको ती माणसे भेटायचीच; पण आपण आपले चालणे चालू ठेवावे. तसे, विकल्प आले तरी आपण आपले नाम सोडू नये. नामच शंकांचे निरसन करेल व विकल्पांनाही हळूहळू पायबंद घालील.

Wednesday, January 8, 2025

नियमाने घेता नाम, येते पाठोपाठ प्रेम!

नियमाने घेता नाम, येते पाठोपाठ प्रेम!ध्रु.

'मुखी नाम कसे येई ?' प्रश्न विचारावा चित्ता 
मूल आणि प्रेमपान्हा ये न वेगळे करता 
भावभरल्या भक्तासी भगवंत देती क्षेम!१

स्वरी आर्तता आणावी जशी मयूराची केका
हाक जाऊन पोचावी निमिषार्धी देवलोका 
त्वरे धावणे वाटेल दयाघनास स्वधर्म!२

जेथे नाम तेथे प्रेम जेथे प्रेम तेथे नाम
जेथे राम तेथे भक्त जेथे भक्त तेथे राम 
सारा जन्मच होईल नाम घेता सुखधाम!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०७.०१.१९७४

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ७ (७ जानेवारी) वर आधारित काव्य.

नामात प्रेम कसे येईल? असा प्रश्न करण्याऐवजी मुखी नाम कसे येईल? असा प्रश्न करणे बरोबर होईल. मुखी नाम येण्याला वास्तविक आडकाठी कोणाची आहे? तर दुसरी कोणाची नसून आपली स्वतःचीच आहे. वास्तविक एकदा नाम घेण्याचे ठरवून सुरुवात केली की झाले. नाम घेणे हे आपले काम आहे, त्याचे पाठोपाठ येणे हा प्रेमाचा धर्मच आहे. नाम व त्याचे प्रेम ही एकमेकांना सोडून राहू शकत नाहीत. नामात प्रेम का येत नाही? त्याचे उत्तर नाम घेत नाही म्हणून. म्हणजे एखाद्या आईला पोटी जन्माला आलेल्या मुलाबद्दल जसा कळवळा असतो तसा नामाबद्दल आपल्या ठिकाणी कळवळा नसतो. आपण नाम किती आस्थेने घेतो हा प्रश्न स्वतःला विचारणे जरूर आहे. एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झाले तर त्याच्या बाबतीत तिची जी स्थिती होते ती नामाचे बाबतीत आपली होणे जरूर आहे.

Monday, January 6, 2025

नाम आळवीता तोषताहे राम! आत्माराम!

रूपाआधी नाम, रूपा अंति नाम 
नाम आळवीता तोषताहे राम! आत्माराम!ध्रु.

रूपाचे ते ध्यान राहो वा न राहो
नामाच्या उच्चारे फोडायचा टाहो
म्हणू राम राम! स्मरू रामनाम!१

नामस्मरणाचा अट्टाहास ठेवा
साधकासि नाम अनमोल ठेवा
अरूपासी रूप देत असे नाम!२

रूपास व्यापते, मना शांतवीते
भाव फुलवीते - भाविका भारते
रत्न रामनाम! रत्न रामनाम!३

रचयिता :  श्रीराम बाळकृष्ण आठवले 
०६.०१.१९७४

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६ (६ जानेवारी) वर आधारित काव्य.

नाम घेत असता रूपाचे ध्यान आवश्यक आहे का? वास्तविक नाम आणि रूप ही भिन्न नाहीतच. नाम तेचि रूप, रूप तेचि नाम, नाम रूप भिन्न नाही नाही! नाम हे रूपाच्या आधीही आहे व नंतरही उरते. नाम रूपाला व्यापून असते. रूप अस्तित्वात येण्यापूर्वी नाम होते. व रूप गेल्यानंतरही नाम आज शिल्लक आहे. तेव्हा नाम घेणे हे मुख्य आहे. नाम घेत असताना रूपाचे स्मरण सूक्ष्म रूपाने असते. ध्यानी येत नाही म्हणून अडून बसू नये. भगवंताचे रूप तरी निश्चित कुठे आहे? एक राम काळा तर एक राम गोरा असतो.  एक राम लहान तर एक मोठा असतो.  एक राम उग्र तर एक सौम्य असतो. पण सर्व रूपे एका रामाचीच असतात. भगवंत स्वतः अरूप आहे; म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्याचे असते. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये ध्यान केले तरी चालते.

Sunday, January 5, 2025

रामनामाविना राम भेटेच ना!

रामनामाविना राम भेटेच ना!
राम भेटेच ना!ध्रु.

प्रपंच कैसा आहे कळते 
भगवंताची प्राप्ती होते 
साद नच घालता माय धावेच ना!१

नामासम आधार न दुसरा 
नामाधारे व्याधी विसरा 
ध्यास नच लागता सिद्धि लाभेच ना!२

नाम आपुला स्वभाव व्हावा 
रामनाम श्रांतास विसावा 
नामस्मरणाविना देव गवसेच ना!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१२.०१.१९७४

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२ (१२ जानेवारी) वर आधारित काव्य.

राम राम म्हटल्या शिवाय राम भेटणे शक्य नाही. व्यवहारातही हाच आपला अनुभव आहे. बाकी सर्व केले पण नाम नाही घेतले तर काही उपयोग होत नाही. म्हणून नाम घेणे जरूर आहे. नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी. अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात. ते नाम मंगलात मंगल व अत्यंत पवित्र आहे. भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे; एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी. भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरूरी आहे; नंतर भगवंतावाचून आपल्याला दुसरा आधार नाही म्हणून नाम घ्यायला पाहिजे आणि शेवटी भगवंताच्या दर्शनानंतर नाम सवयीने आपोआप येते. जो नामस्मरण करील व अनुसंधान ठेवील त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल. नामाकरिता नाम घ्या की त्यात राम आहे हे कळेल. नाम घेत असता, जे घडेल ते चांगले व आपल्या कल्याणाचे आहे असा भरवसा ठेवावा. जसे इमारतीच्या पायालाही दगड व कळसालाही दगडच असतो, तसेच साधकांना व सिद्धांनाही नाम हेच साधन आहे. आपले जीवन देवाच्या हाती आहे व देव नामाच्या स्वाधीन आहे हे पक्के लक्षात ठेवा.

Saturday, January 4, 2025

नाम कसे घ्यावे..

कसेहि घ्या - कुठेहि घ्या
कितीहि घ्या नाम!ध्रु.

इंद्रिये मना -
मन मग पवना
जोडत आत्माराम!१

स्वयेच गावे
अन् ऐकावे
मधुर मधुर नाम!२

उठता बसता
जाता येता
घ्या हो अविराम!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
०४.०१.१९७९

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ४ (४ जानेवारी) वर आधारित काव्य.

नाम कसे चालेल हे ध्येय ठेवावे; व त्याला मदत होईल व्यत्यय येणार नाही अशा तऱ्हेची कोणतीही बैठक असावी. बैठकीला फार महत्त्व देऊ नये. नामस्मरणात खंड न होईल हे ध्येय ठेवून त्याला अनुकूल अशी ज्याच्या त्याच्या प्रकृतीधर्माप्रमाणे कोणतीही बैठक ठेवावी. वास्तविक नाम कसे घेऊ हे विचारणे म्हणजे पेढा कसा खाऊ म्हणून विचारण्यासारखे आहे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो, तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच करते. नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडील. म्हणून कसेही करून नाम घ्यावे.

Wednesday, January 1, 2025

नाम देवाजीचे नाव!

नाम देवाजीचे नाव!ध्रु.

नाम साध्य नि साधन
नाम सगुण निर्गुण
भवसागर तरण्या नाव!१

नाम जोडी जीव शिव
नाम लेणे हो कोरीव
नाम दृढ करी भाव!२

नाम आनंद साधन
नामाअंगी देवपण
देत रामाचरणी ठाव!३

याचा आरंभ सगुणी
याचा शेवट निर्गुणी
भक्तीचे दुसरे नाव!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०१.०१.१९७४

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १ (१ जानेवारी) वर आधारित काव्य.

नाम म्हणजे भगवंताचे नाव. देवाच्या कोणत्याही नावात फरक नाही. नाम हा जीव आणि शिव यांमधील दुवा आहे. नाम हे साध्य आहे व साधनही आहे. नाम सगुण आहे आणि निर्गुणही आहे. नामाचा आरंभ सगुणात आहे व शेवट निर्गुणात आहे. नाम हा सत्संगाचा पाया आहे व कळसही आहे. नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे. देवाचे देवपण त्याच्या नामात आहे. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे. आपली देहबुद्धी जसजशी कमी होईल तसतसे ते नाम व्यापक व अर्थगर्भ बनत जाते, आणि शेवटी नाम हे परमात्मस्वरूपच आहे असा अनुभव येतो. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तु म्हणजे भगवंताचे नाव पाहिजे. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. नामात एका आनंदा शिवाय दुसरे काही नाही.