नियमाने घेता नाम, येते पाठोपाठ प्रेम!ध्रु.
'मुखी नाम कसे येई ?' प्रश्न विचारावा चित्ता
मूल आणि प्रेमपान्हा ये न वेगळे करता
भावभरल्या भक्तासी भगवंत देती क्षेम!१
स्वरी आर्तता आणावी जशी मयूराची केका
हाक जाऊन पोचावी निमिषार्धी देवलोका
त्वरे धावणे वाटेल दयाघनास स्वधर्म!२
जेथे नाम तेथे प्रेम जेथे प्रेम तेथे नाम
जेथे राम तेथे भक्त जेथे भक्त तेथे राम
सारा जन्मच होईल नाम घेता सुखधाम!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०७.०१.१९७४
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ७ (७ जानेवारी) वर आधारित काव्य.
नामात प्रेम कसे येईल? असा प्रश्न करण्याऐवजी मुखी नाम कसे येईल? असा प्रश्न करणे बरोबर होईल. मुखी नाम येण्याला वास्तविक आडकाठी कोणाची आहे? तर दुसरी कोणाची नसून आपली स्वतःचीच आहे. वास्तविक एकदा नाम घेण्याचे ठरवून सुरुवात केली की झाले. नाम घेणे हे आपले काम आहे, त्याचे पाठोपाठ येणे हा प्रेमाचा धर्मच आहे. नाम व त्याचे प्रेम ही एकमेकांना सोडून राहू शकत नाहीत. नामात प्रेम का येत नाही? त्याचे उत्तर नाम घेत नाही म्हणून. म्हणजे एखाद्या आईला पोटी जन्माला आलेल्या मुलाबद्दल जसा कळवळा असतो तसा नामाबद्दल आपल्या ठिकाणी कळवळा नसतो. आपण नाम किती आस्थेने घेतो हा प्रश्न स्वतःला विचारणे जरूर आहे. एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झाले तर त्याच्या बाबतीत तिची जी स्थिती होते ती नामाचे बाबतीत आपली होणे जरूर आहे.
No comments:
Post a Comment