आपलेपणा संसाराचा ईश्वराकडे वळवा-
रामा भजने आळवा! ध्रु.
"मीपण" विसरा, विश्वी पसरा
कुणी न दुसरा, राम सोयरा!
प्रभु निजकर्मी पहावा!१
स्वार्थ साधता, प्रेम आटते
लोभ टाकिता, सौख्य लाभते -
त्यागी देव दिसावा!२
भगवंताविण अपुले नडते,
सहवासा त्या मन धडपडते-
हृदयी राम वसावा!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ७४ (१४ मार्च) वर आधारित काव्य.
प्रेम हे लहानपणापासून सर्वांना उपजत येत असते. एकदा आपले मानले की आपोआप प्रेम निर्माण होते. परमार्थ हा काही प्रपंचापासून वेगळा नाही. स्वार्थाच्या प्रेमापासून सुख कसे लागेल? प्रपंचात आपण कर्तव्य बुद्धीने वर्तावे. प्रत्येक गोष्ट घडायला योग्य वेळकाळ यायला लागतो, तेव्हा कर्तव्यबुद्धीने वागून काय ते करा, आणि भगवंता हा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे म्हणा, म्हणजे आपोआप भगवंताचे प्रेम लागेल. प्रपंचातील जे आपलेपण आहे ते भगवंताकडे वळवा. घरातल्या मंडळींवर निस्वार्थ बुद्धीने प्रेम करायला शिका, म्हणजे परमार्थ आपोआप साधेल व आपलेपणा भगवंताकडे वळवल्यामुळे भगवंतावर प्रेम जडेल याकरता काही वेगळे करणे नको. हा आपलेपणा निर्माण होण्यासाठी भगवंतावाचून आपले नडते ही भावना झाली पाहिजे. याकरिता आपण त्याच्या अखंड सहवासात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याच्या नामस्मरणानेच ही गोष्ट सहज शक्य आहे.