संत वैद्य घालवीती भवरोगबाधा!
नामस्मरणाचा उपाय हा साधा!ध्रु.
नामस्मरणाचा उपाय हा साधा!ध्रु.
कृपावंत थोर
सद्गुरु उदार
स्वये माय होती दीना अनाथा!१
संतसंग देती
नामी ठेवताती
पथ्य सांगताती सुखविण्या आर्ता!२
संत मायबाप
निवारिती ताप
वरदहस्त त्यांचा स्पर्शितसे माथा!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११० (१९ एप्रिल) वर आधारित काव्य.
वैद्याने सांगितलेले औषध व पथ्य एखाद्या मनुष्याने पाळले नाही तर त्यात त्या वैद्याचे काहीच नुकसान होत नसते त्याप्रमाणेच आपणास गुरु सांगत असतो, संत लोक जे आपणास करण्यास सांगतात त्यात त्यांना स्वतःला काही मिळवावयाचे नसते. त्यांचे ऐकल्याने आपलाच फायदा होत असतो. ते आपणास भवरोग झाला आहे असं सांगतात, व त्याकरिता संतसंग करा व नामात राहा म्हणून सांगत असतात. ते जे सांगतात ते स्वतः अनुभव घेऊनच सांगत असतात. संत तुकारामांनी आपल्या उपासनेची शपथ घेऊन सांगितले आहे की नामस्मरणासारखे सोपे साधन नाही. त्यांनी तुमच्या कल्याणाकरताच ते साधन सांगितले आहे; हे तुम्ही न कराल तर त्यात त्यांचे काहीच नुकसान नाही, नुकसान तुमचेच आहे.
No comments:
Post a Comment