Thursday, April 26, 2012

अण्णांनी लिहिलेली पहिली कविता - बाष्पांजलि


अण्णांनी लिहिलेली पहिली कविता

त्यांनी लिहिलेली ही कवितेमागची भूमिका

दि. १४ जानेवारी १९५५ रोजी कै. सौ. आजींना तिलांजली देण्यासाठी ओंकारेश्वराला गेलो.  तेथे आजोबांची दुर्दैवी अवस्था पाहून मला भडभडून आले. त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी ही पहिली कविता लिहिली.

अश्रुमालिका नित्य अर्पितो, रडुनि ठायि ठायी
या जगतामधि मजला प्रेमे, कोण धरिल हृदयी
कितीक वर्षे होतो आपण, परस्परांशी हृदये भिडवून
परंतु येता तुफान वारा, कुठे तू नि मीहि
जीवन अजि हे उदास गमते, मार्गी दिसती असंख्य काटे
पथ हा दुर्गम कसा आक्रमु, भय मोठे वाटे
पुढे लाडके जाउ नको तू, मलाहि वाटे यावे तिकडे
परंतु तुझ्या नि माझ्यामध्ये, धुके दाट साचे
मम देहाची जीर्ण लक्तरे, जातिल गळुनि दोन दिसांनी
आणिक तुजला भेटायाला, येईन मीहि त्वरे

- २४ जानेवारी १९५५

Sunday, April 22, 2012

गीता कृपा द्वादशी


गीता कृपा द्वादशी

मला लढायचे नाही अर्जुनाचा वेडा हट्ट 
पार्थसारथी सोडेना धरी मनगट घट्ट
तुला लढावे लागेल तुझा स्वभाव शूराचा
धर चापबाण हाती पाठिराखा हो धर्माचा
साधुसंतांना रक्षाया दुर्जनांना दंडाया
घडी धर्माची घालाया आलो पार्था धरेवर
काय करी अवतार जर नसे सहकार
घेई आधी पुढाकार तोच आदर्श होणार
कंसवध नव्हे हिंसा भक्त करती प्रशंसा
तुला घेणे हाच वसा मला तुझाच भरवसा
मन येण्या थार्‍यावर खाली नेटाने बसावे
अंतरात रमावर त्याचे दर्शन सेवावे
बुद्धी अचला निर्मला फळ गोड साधनेचे
संतसाहित्याचे वेच शेलकेच कही वेचे
           ज्याला ध्यानाची आवड   त्याच्या बुद्धीलागी धार
मन बुद्धी एकाकार त्याचा जय निरंतर
देव दाखवा दाखवा नाही कोठे विचारावा 
अंतरातला जो ठेवा कसा करंट्याला ठावा ९
विश्वरूप सूक्ष्मरूप सौंम्यरूप उग्ररूप
सारे सारे एकरूप ज्ञाने जो तो सुखरूप १०
देव भावाचा भुकेला दीनाघरी धावलेला 
पुंडलीका भेटीसाठी विठू विटेवर ठेला ११
कर्तव्यातला ओलावा छावेमधाला गारवा 
सोऽहं घुमतसे पावा अनुभव स्वये घ्यावा १२

Sunday, April 1, 2012

नित्यं रामकथां पठेत् |


आज रामनवमी, रामजन्म, त्यानिमित्त माझ्या वडीलांनी लिहिलेली हे सुभाषित येथे देत आहे.

चरितं रघुनाथस्य
स्फूर्तिदं ज्ञानदं तथा ।
आत्मानं सुखिनं कर्तुम्
नित्यं रामकथां पठेत् ॥

अर्थ
श्रीरामचन्द्रांचे एकंदर चरित्रच स्फुर्तिदायक आणि ज्ञान देणारे आहे. जर आत्मसुख हवे असेल तर मनुष्याने नेहमीच रामकथा वाचनात ठेवावी.