अण्णांनी लिहिलेली पहिली कविता
त्यांनी लिहिलेली ही कवितेमागची भूमिका
दि. १४ जानेवारी १९५५ रोजी कै. सौ. आजींना तिलांजली देण्यासाठी ओंकारेश्वराला गेलो. तेथे आजोबांची दुर्दैवी अवस्था पाहून मला भडभडून आले. त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी ही पहिली कविता लिहिली.
अश्रुमालिका नित्य अर्पितो, रडुनि ठायि ठायी
या जगतामधि मजला प्रेमे, कोण धरिल हृदयी १
कितीक वर्षे होतो आपण, परस्परांशी हृदये भिडवून
परंतु येता तुफान वारा, कुठे तू नि मीहि २
जीवन अजि हे उदास गमते, मार्गी दिसती असंख्य काटे
पथ हा दुर्गम कसा आक्रमु, भय मोठे वाटे ३
पुढे लाडके जाउ नको तू, मलाहि वाटे यावे तिकडे
परंतु तुझ्या नि माझ्यामध्ये, धुके दाट साचे ४
मम देहाची जीर्ण लक्तरे, जातिल गळुनि दोन दिसांनी
आणिक तुजला भेटायाला, येईन मीहि त्वरे ५
- २४ जानेवारी १९५५