Friday, March 6, 2026

जा पवना जा वेगे

आणि शिवनेरीवर एका शुभदिनी, फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१, १९ फेब्रुवारी १६३० चौघडा झडू लागला. जो तो उत्कंठेने दुसऱ्यास विचारी, "अहो काय झालं? काय झालं?"
तितक्याच उल्हसित स्वरात उत्तर येई  "मुलगा! मुलगा झाला आपल्या लाडक्या जिजाऊला! 

या पुत्रजन्मसोहळ्याचं वर्णन काय करावं? जणू काही नव्या गोकुळीं नवा कृष्णच जन्माला आला!

ही शुभवार्ता साऱ्या जणांना कळविण्याची गडावरील स्त्रियांची कोण घाई? त्यांनी ते काम पवनावरच सोपविले.

पवन दूताला त्या सांगू लागल्या!

जा पवना जा वेगे मिरव जनी शुभ वार्ता
शिवनेरी घेत जन्म शुभयोगे शककर्ता ॥ ध्रु.॥

सरली नैराश्य निशा उजळल्यात दाही दिशा
पूर्व क्षितिजि येत अरुण, देत अभय शिवभक्ता ॥१॥

दिवस खचित सोन्याचा घुमत गजर वाद्यांचा
अवतरला काय कृष्ण दंडण्यास परसत्ता ॥२॥

सह्याचल थरथरला गहिवरला मनि हसला
पाहण्यास मुखचंद्रा आतुरली उत्सुकता ॥३॥

वळत वळत बाळमुठी लव हसला जगजेठी
श्रीशिवाईचा प्रसाद उचलुनि घे वत्सलता ॥४॥

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, March 5, 2026

जेथे नाही 'राम', तेथे कैचा आराम?

जेथे नाही 'राम', तेथे कैचा आराम?ध्रु.

'मी नव्हे नव्हे' हो कोणी
तो रामच अंत:करणी 
हे ठसण्या जपणे प्रभुनाम!१

लागता प्रेम नामाचे 
आनंदे अंतरि नाचे 
तो भक्तसखा हो श्रीराम!२

'मी नुरणे' पूर्णावस्था 
लाभेल भाग्य वश होता 
परि सोडु नये कधी नाम!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६५ (५ मार्च) वर आधारित काव्य.

ज्या प्रपंचात राम नाही त्या प्रपंचात आराम होणार नाही. एका म्यानात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे मी आणि भगवंत एका अंत:करणात राहू शकत नाहीत. संत हे भगवंताशी एकरूप झालेले असतात. नामाचे प्रेम लागले म्हणजे कर्तेपणाचा अभिमान कमी होतो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना "त्याच्या" इच्छेने व सत्तेने घडून येतात अशी जाणीव ज्याच्या अंत:करणात उमटली त्यांना भगवंताचे खरे अस्तित्व समजले. मी खरा नसून "तोच" खरा आहे हे सांगण्यासाठी जेथे मीच उरत नाही ती खरी पूर्णावस्था होय. नाम घेत असताना सदाचरण कधी सोडू नये. नीतीच्या मर्यादा कधी ओलांडू नयेत. निराश कधी बनू नये, देहाला उगीच कष्टवू नये, पण काही झाले तरी भगवंताचे नाम कधी सोडू नये.

Tuesday, March 3, 2026

प्रपंच ऐसा करावा!

परमार्थाच्या आड न ये जो 
प्रपंच ऐसा करावा!ध्रु.

परमार्थाचा मुख्य धंदा
प्रपंच केवळ जोडधंदा
गुंतु नये मन प्रपंचात कधि 
राघव तया विसावा!१

व्यवहाराते सांभाळावे 
आहारी ना त्याच्या जावे
सुखदुःखांच्या झंजावाती 
राघव ना विसरावा!२

प्रपंच ना कधि कोणा सुटला
भक्ताते परि राम भेटला 
आकुंचितता ताप देतसे 
संश सोडुनी द्यावा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६३ (३ मार्च) वर आधारित काव्य 

प्रत्येक माणसाने परमार्थ हा मुख्य धंदा ठेवून प्रपंच हा जोडधंदा म्हणून करावा; म्हणजेच प्रपंचात होणाऱ्या लाभहानीचा परिणाम भगवंताचे अनुसंधानावर होऊ देऊ नये. परमार्थाचे आड प्रपंच न येईल अशा युक्तीने वागावे. भाजीला जसे मीठ लागते तसे परमार्थाला प्रपंच लागतो. मीठ नसेल तर भाजी अळणी लागते पण मीठ जास्त झाले तर भाजी खाववत नाही, त्याचप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ यांचा संबंध आहे. प्रपंचात व्यवहार जतन करावा खरा, पण तो काही सर्वस्व नव्हे. प्रपंच पाहिजे आणि दुःख नको असे म्हणणे वेडेपणाचे आहे. नुसता प्रपंच तापदायक नाही नाही तर आकुंचित प्रपंच हा तापदायक आहे. आपण ज्याप्रमाणे आपल्या या खिशातील पैसे त्या खिशामध्ये ठेवतो, त्याचप्रमाणे प्रपंचातील आपले मन आपण काढून भगवंताकडे लावावे तसे करण्यात समाधान आहे.