जिभेची खोड मोडल्याशिवाय जीभ ताब्यात येणारच नाही. जिभेचे लाड केले तर ती डोक्यावर बसलीच म्हणून समजावं!
बोलण्याच्या आधीच विचार व्हायला पाहिजे. बोलून मग विचारात पडण्यात काय अर्थ आहे? वाणीचा संयम न ठेवल्याने आपले शत्रू जे षड्विकार त्याचेच आपण पोषण करतो.
अहंकारापायी माणूस स्वतःच्या व कुटुंबाच्या स्वास्थ्याची राखरांगोळी करतो.
मी कोण हे कळण्यासाठी गुरूंच्याकडेच धाव घ्यायला पाहिजे. ज्ञान प्राप्त झाले पाहिजे.
**********
सुजनहो, हे ध्यानी घ्यावे
हवा जिभेवर ताबा अपुला
जो रसनांकित तो तो बुडला
रहस्य उमजावे!ध्रु.
काय खात मी, काय वदत मी
विचार आधी करू नेहमी
विवेक अपुला जीवनसाथी त्याचे ऐकावे!१
नव्हे देह मी हे बाणावे
सद्गुरुचरणी लीन असावे
चराचरा जो व्यापुनि उरतो तो मी समजावे!२
अरे जिभेचे नका बघू सुख
चला गड्यांनो व्हा अंतर्मुख
षड्विकार का आपण अपुल्या कृतिने पोसावे?३
कवी : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य)