भगवंत अर्जुनाला म्हणाले होते - प्रत्येक युगात मला असे अनंत अवतार घ्यावे लागले आहेत. मुक्तही व्यवहारात वागतच असतो पण अगदी अलिप्तपणे. परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी तो अगदी रमलेला असतो. कर्म म्हणजे काय? विकर्म कोणते? अकर्म कशाला म्हणावयाचे? अर्जुनाने जिज्ञासेने प्रश्नामागून प्रश्न विचारले. भगवंतांना अर्जुनाची ही जिज्ञासा फार फार आवडली ते समाधानाने म्हणाले -
++++++++
तुझि जिज्ञासा पार्था, मज आवडते, मज आवडते!ध्रु.
विश्व व्हावया ठरले कारण
' कर्म ' तयाते म्हणती बुधजन
कर्मि कुशलता आणायाते सदैव चालो धडपड येथे!१
निजवर्णाते निजाश्रमाते
अनुसरिता जे हातुनि घडते
' विकर्म ' जाणी तेच अर्जुना निष्ठापूर्वक आचरि ते!२
शास्त्र जयाला निषिद्ध ठरवी
साधकास जे निश्चित भुलवी
' अकर्म ' म्हणती तयास बुधजन तत्परतेने टाळी ते!३
चित्ताचा समतोल राखुनी
अलिप्त राही सदा जीवनी
व्हावे चित्ते जगद्रूप तू, सहज स्थिति ती लाभू दे!४
आत्मा स्थिर भास्कराप्रमाणे
देहकर्म जणु त्याची किरणे
' करतो मी ' हे मनी न आणी, प्रकृति सगळे खेळविते!५
ज्ञानरूप अग्नीची ज्वाला
सिद्ध जाळण्या फलासक्तिला
मनुष्यरूपे ब्रह्म तेधवा या भुवरती अवतरते!६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०१.०१.१९७३