पूर्वी होते, आज आहे, पुढेहि राहिल नाम
चिरंतन भगवंताचे नाम!ध्रु.
चिरंतन भगवंताचे नाम!ध्रु.
रूप विनाशी, हे अविनाशी
नामांतरि सौख्याच्या राशी
शक्ती निरंतर राही वितरत भगवंताचे नाम!१
अस्तित्वाने नाम जाणवे
नैराश्याते दूर घालवे
अनेकात एकत्व आणते भगवंताचे नाम!२
रूपाहुनि हे आहे बरवे
प्राणप्रणाने नाम जपावे
प्रलय जाहला तरीहि राहिल भगवंताचे नाम!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील, प्रवचन क्रमांक ४३ (१२ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.
नाम हे रूपापेक्षा निश्चित श्रेष्ठ आहे; त्यामुळे रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तरी नाम सोडू नये.
टेकडीवरून आजूबाजूला पाहात असताना झाडे, वेली, घरे, बागा, माणसे, पक्षी, पाण्याचे तलाव इ. सर्व वस्तूंचे ज्ञान झाल्यावर पुन्हा त्यांचे एकीकरण होऊन, ‘ही सृष्टीची शोभा आहे’ असे ज्ञान आपल्याला होते. म्हणजे अनेकांत एकत्व शोधणे हेच मानवी ज्ञानाचे लक्षण आहे.
ॐकारांतून सर्व सृष्टी उगम पावली. ॐकार हे परमात्म्याचेच स्वरूप आहे. अर्थात्, नाम म्हणजे सत् होय. म्हणूनच नाम हे सृष्टीच्या आरंभी होते, ते सध्या आहेच, आणि सृष्टीचा लय झाला तरी ते शिल्लक राहणारच.
No comments:
Post a Comment