॥ जय जय रघुवीर समर्थ ।।
धरुनि लेखणी रंगवले हे प्रापंचिक जगणे!
रामाचा जर विसर मनाला दुःखच दे ठाणे!१
विसरे जो तो जन्म जिवाचा वासनेत झाला
ती सुखदुःखा कारण तैसी पुढच्या जन्माला!२
न ये बोलता शैशवातही कौतुकात हाल
भूक न जाणुनि मुके घेत कुणी कुस्करती गाल!३
खेळ मधे सोडावा लागे तडफडतो जीव
बालमनाची जाण कुणाला सुकतो राजीव!४
धडपड जरि ही सुखार्थ चाले कष्टा नच गणना
थोडेसे यश अपयश पुष्कळ बहुतांची दैना!५
कामातुर त्या ना भय लज्जा देह सर्व काही
स्त्रीला भुलला मायपित्यांना विसरुन तो जाई!६
मूल नसे तरि चिंता आहे, कुणा मुले फार
न ये पोसता तरी वाढते आहे लेंढार!७
धन मेळविण्या घर सोडुनिया परदेशी गेला
मायापाशच पुन्हा आणवी घरच्या भेटीला!८
कितीहि राबा, रक्तहि ओका विश्रांती नसते
पाठीवरती हात फिरवण्या आई नच उरते!९
जोवर पैसा तोवर बैसा, शक्ति हवी देही
वृद्धपणा ये चाल करुनिया उपाय ना काही!१०
रामाविण नच कोणी माझे उशिरा हे कळले
जन्मभरी ना त्याला स्मरले मन लज्जित झाले!११
दक्ष न राही जीवनात तर धिंड अशी निघते
सावध जीवा झडकरि हो रे स्मर रघुनाथाते!१२
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२६.०१.१९९५