हे करुणामय भगवान्
मज नको नको अभिमान!ध्रु.
मज नको नको अभिमान!ध्रु.
सहज न दिसतो
कधी उसळतो
मग व्याकुळ पंचप्राण!१
चित्त मळतसे
हित न कळतसे
मज वाचव भगवान्!२
नुरो फलाशा
मज परमेशा
गाइन तव महिमान!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२६ (५ मे) वर आधारित काव्य.
खरोखर अभिमानासारखा परमार्थाचा दुसरा मोठा शत्रू नाही. तो दिसत नाही, आणि म्हणून तो केव्हा आणि कसा डोके वर काढील याचा पत्ताच लागणार नाही. चित्तशुद्धीच्या मार्गात मोठी धोंड कोणती असेल तर ती अभिमानाची आहे. त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरुला अनन्यभावे शरण जाऊन, अभिमानाच्या तावडीतून सोडविण्याबद्दल त्याची सतत प्रार्थना करणे हेच होय. विनाशी फलाशेने केलेले कोणतेही कार्य सुखाला नेत नाही असे म्हणावे लागते. याकरिताच भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही फळाची आशा न ठेवता कर्तव्यकर्म करीत राहणे हाच सुखाचा मार्ग आहे. भगवंताची भक्ती करता करता भगवत्प्राप्तीशिवाय इतर होणाऱ्या इच्छा काढून टाकण्याचा क्रम ठेवावा, म्हणजे कालांतराने भगवंताकरिताच भगवतप्राप्ती अशी भावना दृढ होत जाईल.
No comments:
Post a Comment