लाभण्या समाधान चित्ता
स्मरावे रामा भगवंता!ध्रु.
स्मरावे रामा भगवंता!ध्रु.
स्मरायचे जर असेल देवा
परिस्थितीचा कुठला केवा
उकलण्या देहभावगुंता!१
देह जरी हा विकल जाहला
नामस्मरणा आड न आला
साक्ष ही देते श्रीगीता!२
परमार्थामधि द्रव्य अडथळा
स्वर्णमृगा त्या पामर भुलला
खरोखर श्रीरामच त्राता!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ५७ (२६ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.
मनुष्याची सर्व धडपड शाश्वत समाधान मिळवण्यासाठी चालू असते. ते समाधान फक्त भगवंताजवळ असल्याने त्या समाधानासाठी प्रत्येक माणसाला भगवंताची गरज आहे. देहाची अवस्था कोणतीही असली तरी, त्यामध्ये नामस्मरण करता येत नाही हे म्हणणे काही बरोबर नाही. प्रकृतीला कितीही क्षीणत्व आले तरी अंतकाळी भगवंताचे स्मरण करता येते असे भगवंताने गीतेत सांगितले आहे. तेव्हा प्रकृती आड येते असे म्हणणे कितपत संयुक्तिक ठरेल?आपल्याजवळ पैसा नसणे हे भगवंताच्या प्राप्तीच्या आड येते, हे म्हणणे बरोबर नाही. उलट पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो. सुख, समाधान हे पैशावर अवलंबून नाही. भगवंताची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर दया क्षमा व जिकडे तिकडे आनंदी वृत्ती ही असायची. त्याप्रमाणे पैसा आला, की त्याच्याबरोबर तळमळ, लोभ, असमाधान, ही यायचीच.