Tuesday, April 1, 2025

साधुसंतांची संगत, करी चित्तास उन्नत!

साधुसंतांची संगत, करी चित्तास उन्नत!ध्रु.

ज्याशी घडते संगत
त्याचे गुण अंगी येत
असू द्यावे नाम मुखी, तेच करील सोबत!१

अन्न ऐसेचि सेवावे
भक्ती अंतरी बळावे
संतसदनीचे अन्न याचसाठी सेवितात!२

संतसंगे लाभ होतो
देव आटोक्यात येतो
मग रामाशी घडते नित्य अंगत पंगत!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९२ (१ एप्रिल) वर आधारित हे काव्य.

मनुष्याच्या आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते. संतसंगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे ती पूर्व पुण्याईमुळे लाभते. ज्याच्याशी आपण संगत धरावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहतो. अन्नाने वासना बनते, म्हणून संतांच्या घरचे अन्न आपण मागून घेऊन खावे. संतांच्या देहाची संगती सगळ्यांनाच लाभते असे नाही. सत्पुरुषांची संगत ही उत्तम होय. सत्संगतीपासून सद्‍वासना आणि सद्विचार ही शिकायची असतात. नामाची संगत हीच सर्वात उत्तम सत्संगत होय.

No comments:

Post a Comment