Monday, March 17, 2025

सोड प्रपंचाची चिंता, शरण जाय भगवंता!

सोड प्रपंचाची चिंता, शरण जाय भगवंता!ध्रु.

निजकर्तव्या पाळावे
घडी घडी नाम घ्यावे
उपासना हीच थोर आवडते अच्युता!१

चित्ति असो समाधान
सखा मान नारायण
तोच पाठिराखा भक्ता तोच एक त्राता!२

नामस्मरणी रंगावे
देहभान विसरावे
लेकुराची चिंता वाहे सदोदित माता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ७७ (१७ मार्च) वर आधारित काव्य.

सत्वगुणात भगवंत असतो, तेव्हा त्या मार्गाने जावे. सर्व कर्मे चांगल्या प्रकारे केली, तरी ती भगवंतार्पण बुद्धीने करावी. जे फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आले या भावनेने समाधान मानायला पहिल्यांदा आपण शिकावे. मागील आठवणींनी आणि उद्याच्या भीतीने आपण काळजी करीत बसतो. ही काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते. उद्याच्या काळजीने आजची भाकरी आपल्याला गोड लागत नाही याला काय करावे? यावर रामबाण असा एकच उपाय आहे, तो म्हणजे आजपासून आपण काळजी करण्याचे अजिबात सोडून देऊन, तेवढा वेळ भगवंताच्या नामस्मरणात घालविणे.  असले तर असू दे व नसले तर नसू दे, अशा मनाच्या अवस्थेत जो राहील त्यालाच काळजी सुटेल.

No comments:

Post a Comment