तुला शरण आलो रामा
तुझाच मी झालो!ध्रु.
तुझाच मी झालो!ध्रु.
देह विसराया,
निर्गुणात जाया
सहवास लाभण्यास
नाम घेत आलो!१
धरूनिया करी,
देहातीत करी
विसर पाड वासनांचा
काकुळती आलो!२
नामरुची दे दे
संतसंग दे दे
तुझा लाभ हाच ध्यास
नामी गुंतलेलो!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५२ (३१ मे) वर आधारित काव्य.
मी जे जे करतो ते ते भगवंताकरता करतो असे जो म्हणतो तो खरा व उत्तम भक्त होय. भगवंतप्राप्ती शिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे हे भक्ताचे लक्षण आहे. जो काळ भगवत्स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो. गुरुआज्ञा प्रमाणाचे बीज निर्गुणातच आहे हे लक्षात ठेवावे. देहातीत व्हायला गुरुआज्ञेप्रमाणे वागणे यापरते दुसरे काय आहे? भगवंत माझा असे म्हणावे, म्हणजे देहाचा विसर पडतो. कर्तेपण तुम्ही आपल्याकडे घेतलेत तर सुखदुःख भोगावे लागेल. स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे. कृती करणाऱ्याचाच वेदांत खरा असतो. भगवंताला शरण जावे व त्याचे होऊन राहावे यातच सर्व धर्मांचे व शास्त्रांचे सार आहे.