जे जे घडते ते समजावे, इच्छा भगवंताची!ध्रु.
रामाचे नित स्मरण असावे
देहांतरि मन नच गुंतावे
विषयांचे भय सरेल घडता कृपा रामचंद्राची!१
जिथे जिथे वावरते वृत्ती
तिथे तिथे देवाची वस्ती
शरण गेलिया श्रीरघुनाथा वार्ता नुरे भ्रमाची!२
रामाविण सुख कशात नाही
अनुभव कथिती असे प्रत्यही
मन गुंताया राघवचरणी धार धरा नामाची!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२९ (८ मे) वर आधारित काव्य.
शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काही तरी होतच राहते. दुरुस्त केलेल्या जोड्यातील एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे तसे, आजारामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे व त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत ही जाणीव ठेवून वृत्ति आवरण्याचा प्रयत्न करावा. परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो. आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत असावे. हे भगवंता, तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार. आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला, तुझ्या प्राप्ती शिवाय कशातही सुख नाही असे भासू लागले तरी वृत्ति आड आल्याशिवाय राहात नाही. हे भगवंता, माझे मन तुझ्या चरणी राहो असे कर.
No comments:
Post a Comment