ऋण शिरि संतांचे! केवढे ऋण हे संतांचे!ध्रु.
जे अनुभविले ते आचरिले
संतपदासी म्हणुनि पोचले
दुःख मिरविते सुख वेषातुन बोल प्रत्ययाचे!१
सुखाकडे मग पाठ फिरविली
रामभेटिची ओढ लागली
अनुभव घेउनी थोर पवाडे म्हटले नामाचे!२
नामच राम रामच नाम
जागृत ठेवा आत्माराम
सिद्ध करोनी हाती दिधले नाम ईश्वराचे!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १९५ (१३ जुलै) वर आधारित काव्य.
पुष्कळ गोष्टी वाईट आहेत हे आपल्या अनुभवाला येते परंतु त्या करण्याचे आपण टाळतो का? हाच तर आपल्यातला दोष आहे, थोर पुरुषांचे मात्र तसे नसते त्यांना जे अनुभवाने आले ते त्यांनी आचरणात आणून दाखविले. जगातील सुख हे खरे सुख नव्हे दुःखाने सुखाचा घेतलेला केवळ वेष आहे तो. परमेश्वर प्राप्तीतच खरे सुख आहे आणि त्या प्राप्तीचा अगदी सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचे नाम. नामाकरिता आपण नाम घेतो का? का मनात काही इच्छा, वासना ठेवून घेतो? कोणतीही वृत्ति मनात उठून न देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही. देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच. नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार, त्याशिवाय आपण जगूच शकत नाही अशी वृत्ति बाणल्यावर होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण.
No comments:
Post a Comment