राम माझा, मी रामाचा
छंद जडला मज नामाचा!ध्रु.
छंद जडला मज नामाचा!ध्रु.
स्मरण हेच पुण्य, विसर हेच पाप
विस्मरणे पोळतील खचित त्रिविध ताप
राम हा स्वामी मनाचा!१
संकटे आली तरीही तीहि रूपे राघवाची
यानिमित्ते पर्वणी ये रामनामाच्या जपाची
ध्यास लागो राघवाचा!२
कर्म करिता गुंतवीते, तत्फलाची हीन आशा
प्रभु दुरावे, मन झुरावे हे निमंत्रण सर्वनाशा
तनमने मी राघवाचा!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५० (२९ मे) वर आधारित काव्य.
भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीच गरज नसते. तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो मी निर्दोष होईन तेव्हाच लोक मला तसे दिसतील. आपल्या सर्व अवगुणांना कारण म्हणजे "मी रामाला विसरलो" हेच आहे. परमात्म्याचा विसर पडतो हेच खरे पाप. कोणतेही कर्म करताना फळाची आशा धरली तर ते घातक होते. ज्याने भगवंत जवळ आणला जातो तेच चांगले कृत्य. कोणत्याही स्थितीत वृत्ती कायम राखणे, हेच योगाचे सार आहे. प्रत्येक कृतीत मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवावी. संकटेही आपल्या कर्माचेच फळ असतात. संकटांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली, तर ती आपल्याला समाधान देते. असमाधान हा रोग सर्वांचा एकच आहे व भगवंताचे स्मरण हे औषधही सर्वांना एकच आहे; आणि समाधान हा गुणही सर्वांचा तोच आहे.
No comments:
Post a Comment