Tuesday, October 28, 2008

लक्ष्मीपूजन

१९८५ साली तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झालेले श्री बा आठवले यांचे लक्ष्मीपूजनावरील सुभाषित परत देत आहे

कराग्रे वसते लक्ष्मी:
सम्यक् जानासि मानव
आलस्यस्य बहिष्कार:
लक्ष्मीपूजा सुनिश्चिता

हे मानवा, लक्ष्मीचा वास तुझ्या कार्यकुशल बोटात आहे हे तू चांगले जाणतोसच तर मग आळसाला पिटाळून लावणे म्हणजेच लक्ष्मीचे पूजन करणे होय नाही का?

Sunday, October 26, 2008

शुभ दीपावली

लखलखती लाख दिवे
अंतरात भवताली
सद्विचार हो प्रेरक
तीच खरी दीपवाळी

Sunday, October 19, 2008

रामचंद्र गुणगान.

२००१ साली लिहिलेले आणि श्री शिधये यांनी प्रकाशित केलेले हे काव्य परत देत आहे दोन ओळींच्या प्रत्येक कडव्यात पहिली ओळ श्रीराम गुणवर्णन असून दूसरी ओळ जपमंत्र आहे एकदा हे काव्य वाचल्यावर एक माळ जप आपोआप होंतो काव्य गेय असून छोट्या वा मोठ्या समूहात एकत्रित गायल्याने आनंदपूर्ण जप सहज होंतो




















Wednesday, October 15, 2008

श्री गीतासार




ॐ श्री गीतासार 

जीवन ही रणभूमी आहे इथे लढावे लागे
नको मला संघर्ष म्हणुनी कसे कुणाचे भागे ?। १
स्वजन गुरुंना रणी बघुनी अर्जुनही गडबडला
यांना मारुनी कशास जगणे ? प्रश्न तयाला पडला । २
देह विनाशी धारण केले अविनाशी आत्म्याने
आत्मतत्त्व ओळखे असा नर गात नसे रडगाणे । ३
दृढनिश्चय जर नसला तर मग पुरता गोंधळ उडतो
निजकर्तव्या विसरून मानव शोकसागरी बुडतो । ४
कृष्णार्जुन हे जरी शेजारी अंतर फारच पडले
स्थितप्रज्ञ हरी, शांत पार्थ परी, पुष्प सुकुनी गेले ।५
यश येवो  वा लाभो अपयश कशास त्याची चिंता ?
कर्तव्याने घडतो मानव हेच सांगते गीता । ६
कर्तृत्वाचा भार शिरावर मनुष्य आपण घेतो
फलाशेत गुंतला असा तो दु:खी कष्टी बनतो । ७
ज्ञान आतले जगास दिसूदे  कर्माचरणातून
हरीकृपेची छाया भक्ता लागू न देते ऊन । ८
कर्मफलाचा त्याग देतसे मानवास विश्रांती
मी नच कर्ता जाण आतली समई मधली ज्योती । ९
इथॆ तिथे हरी, सदा सर्व हरी, अनुभूती श्रीमंती
हृदयमंदिरी भगवंताची सदैव असते वस्ती । १०
योगाभ्यासे आवरते मन हाव हावरी सरते
डोळे मिटुनी नेमे बसता शांती साधका वरते । ११
एकच आता ध्येय घ्या मने त्यासी समरस व्हावे
ध्याता ध्याता अमन मनाचे श्रीहरीने घडवावे । १२
उपभोगे नच शमे वासना जगात छी थु होई
विषयी विरक्ती मोठी प्राप्ती जवळी जर पुण्याई । १३
मन चंचल ते द्यावे बांधून अलगद त्या पवनाला
नामाचा मधु नाद जाणवे ध्यानी ज्याला त्याला । १४
आत्म्याचे नित भान जयाला मोह न शिवतो त्याला
सूत्री एका मणी गुंफले विश्वात्मक तो झाला । १५
नव्हे देह मी, मन बुद्धी न मी, भय कोणाचे आता
नित्य नव्याने होते प्रगती कृतीत स्वाभाविकता । १६
उत्पत्ती स्थिती प्रलयही यांचे स्थान एक भगवंत
हर्ष न जन्मे, शोक न मरणे, मी ही अनादी अनंत । १७
सागरात तो हिमालयी तो वटवृक्षही तो आहे
नद्यात गंगा, पशूत केसरी, पांडवी अर्जुन आहे । १८
विश्वरुप पाहण्या अर्जुना कृष्णे दिधली दृष्टी
हरवून बसला पार्थ स्वतःला सोसवे न त्या दीप्ती । १९
शरीर म्हणजे क्षेत्र तयातच परमात्मा हो प्रकट
शांत आर्जवी जना हवासा विषयी नसावे लिप्त । २०
नसे कुठे तो, नसे कधी तो, अखिल चराचर तोच
अंतर्बाह्यही व्यापून उरला श्रीनारायण तोच । २१
सूक्ष्मत्वाने अलिप्त आत्मा गुणातीत तो मुक्त
ज्ञान खेळते कृतीकृतीतून विभक्त नसतो भक्त । २२
सुख दुःखी सम होता येते शांतही होता येते
हरिपाठी जो स्थिरावला त्या अवघे हरिमय होते । २३
अश्वत्थासम जीवन रचना समजून उमजून घ्यावी
प्रसन्न भावातून सदोदित हरिलीला देखावी  । २४
गाता गाता गीता कळते गीता स्वभावही तो बदले
रजोतमाला वेसण बसता सात्त्विक वृत्ति उमले । २५
धुंद मोगरा कैसा फुलला गंध आगळा आला
प्रभातकाळी कसा अचानक माधव सदनी शिरला । २६
विवेक आणिक विचार बांधव त्याग सोबती तिसरा
साधकास तर सत्संगाने नित्य दिवाळी दसरा । २७
कुरुक्षेत्र जे धर्मक्षेत्र ते  जरी वाटते व्हावे
कर्तव्याचे पालन देवा या हातून घडवावे । २८
हरी वाजवतो गीता मुरली उंचावरती  नेतो
उदात्त उन्नत होता मानस अर्जुन माधव होतो । २९
स्वरुपानाथांनी या सदना क्षणात पावस केले
मांडीवरती घेऊन वदनी घासही प्रेमे दिधले । ३०
पडता पडता उचलून घेते बालकास गीताई
मधुर स्वरांनी गाऊन गाणी अंजन घाली आई । ३१
हरिदिनी अवचित ये आकारा श्रीकृष्णाची मूर्ती
उठता बसता गीता गाता सहवासाने तृप्ती । ३२
ईशबुद्धीने घडता कर्मे दिव्यपदा नर जाई
श्रीरामाची सरे खिन्नता प्रसन्नमुख तो होई । ३३

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।









Tuesday, October 14, 2008

कोजागिरी पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अण्णांनी म्हणजे माझ्या वडीलांनी म्हणजे श्रीराम बाळकृष्ण आठवले यांनी १९८५ मध्ये लिहिलेले व तरुण भारत मध्ये प्रकाशित झालेले संस्कृत सुभाषित परत देत आहे


शरदः पौर्णिमा रम्या
सुखदा मोदवर्धिनी
काव्य पानं, दुग्ध पानं
सुधापानात् प्रमोदकम्

अर्थ

शरद ऋतुची पौर्णिमा अत्यंत सुखदायक, आनंद वाढविणारी॰ मित्र मैत्रिणींच्या मेळाव्यात केले जाणारे दुग्धपान अणि काव्यरसपान अमृतपानालाही मागे सारिल.



Tuesday, October 7, 2008

विजयादशमी

विजयादशमी निमित्त अण्णांनी म्हणजे माझ्या वडीलांनी १९८४ मध्ये लिहिलेले व तरुण भारत मध्ये प्रकाशित झालेले संस्कृत सुभाषित परत देत आहे

पूर्वग्रहान् परित्यज्य
स्मृत्वा सिंह पराक्रमम्
धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे
विजयी भव भारत

अर्थ
मी दुबळा, मी निशस्त्र असले मन खचविणारे पूर्वग्रह झटकून टाक॰ पूर्वजांचा सिंहपराक्रम आठव॰ शस्त्रविद्या आत्मसात कर आणि जीवनाच्या सर्वच क्षेत्रात हे भारता तू विजयीच हो असा विजयादशमी भारताला संदेश देते॰







Wednesday, October 1, 2008

हरिगीतापाठ फलश्रुति

॥श्रीकृष्ण॥ 
फलश्रुती 

हरिगीतापाठ नित्य गाता गाता 
बोले कृष्णमाता भाविकाशी । १
एकेक अध्याय कळू लागे थोडा 
भावार्थाचा पेढा गोड लागे । २
निरोगी ती काया निरोगी ते मन
साधू लागे ध्यान साधकाला । ३ 
स्वकर्म करावे नित्य जीवेभावे
गोविंदा अर्पावे वाटतसे । ४ 
मीच तो अर्जुन मीच तो माधव 
ऐसा ऐक्यभाव वाढू लागे । ५
वाचावा हा पाठ लिहावा हा पाठ 
विवरावा पाठ देवळात । ६
देह हे देऊळ आत्मा हा गोपाळ 
नाम घेता काळ अनुकुल । ७
भावसाक्षरता भाषणी मृदुता 
अंतरी शांतता सर्वकाळ । ८ 
स्वरुपानंदांनी घेतलीसे सेवा 
दिला गोड मेवा स्वानंदाचा । ९ 
कृतज्ञ श्रीराम जोडूनीया हात 
वळे आत आत सावकाश । १० 


हरिगीतापाठ अध्याय १८


हरिगीतापाठ अध्याय १७


हरिगीतापाठ अध्याय १६


हरिगीतापाठ अध्याय १५


हरिगीतापाठ अध्याय १४


हरिगीतापाठ अध्याय १३


हरिगीतापाठ अध्याय १२


हरिगीतापाठ अध्याय ११