Tuesday, December 30, 2014

ऐका कहाणी गीतेची : अध्याय चौथा - ज्ञानकर्मसन्यासयोग



अध्याय चौथा - ज्ञानकर्मसन्यासयोग

ऐकव गीते तुझी कहाणी, निर्मळ निर्मळ तुझी वाणी 
भगवंताच्या वाणीला धार अगदी विलक्षण 
ज्ञान ज्यातून प्रकट होते ओजस्वीच असे ते भाषण 
कर्मयोग अनुसरला तर सहज लाभे आत्मज्ञान
श्रद्धा हवी, संयम हवा, श्रोता हवा सावधान 
जन्मकर्म दिव्यच असते लोकोत्तर या पुरुषांचे 
रहस्य जाणत अवतारांचे ते तर मोठे भाग्याचे 
आत्मतत्त्वा धरुन चालता ढळत नाही तोल कधी 
भगवंताचे कर्मच असे बाधत नाही त्याला कधी 
मिळवायाचे काहीच नाही तरी कर्म करीत असतो 
जीवेभावे करता कर्मे उदाहरण ठेवून जातो
धर्मग्लानी जेव्हा होते, अधर्म थैमान घालत सुटतो
तेव्हा तेव्हा मीच पार्था येथे अवतार घेत असतो
मागचे पुढचे सगळे स्मरते पूर्वापार कर्मयोग 
परंतु पामर विसरून गेले गिळती त्यांना विषयभोग 
इंद्रियांचे व्हावे स्वामी मनावरती अंकुश हवा 
त्याची धाव जरी बाहेर निर्धारे त्या आत वळवा 
भोगात काय ठेवले बाबा, त्यागात आगळा आनंद आहे 
नकोत विद्या नकोत कला भक्त भक्तीत रंगत आहे
देहापासून देवाकडे जर पाहिजे घ्याया झेप 
वासना ठेव वासुदेवी सरेल जन्ममरण खेप 
वैराग्याचे ज्ञान मुरते, विवेक साधना बहीण भाऊ 
आनंदाचे लाडू आपण निरंतर खात जाऊ 
जुळले नाते आईचे, प्रेमाचे पुण्याईचे 
संवादाची घेत रुची, ऐका कहाणी गीतेची, ऐका कहाणी गीतेची



Sunday, December 28, 2014

ऐका कहाणी गीतेची : अध्याय तिसरा - कर्म योग



अध्याय तिसरा - कर्म योग 

ऐकव गीते तुझी कहाणी निर्मळ निर्मळ तुझी वाणी
अर्जुन मोठा खट्याळ होता कर्मच टाकू पहात होता 
लोभच सोडला फलाचा लेप न लागे कर्माचा 
’मी कर्ता’ हे विसरून जा आनंद आगळा मिळवत जा 
दिवा दिव्याने लागे जसा सत्कर्माचा खोल ठसा 
कर्म ऐसे सहज घडावे टक लावून बघत राहावे 
वाढे जैसी तन्मयता सुटतो बघ सगळा गुंता 
मना उलटता होते नाम कर्मही घडते ते निष्काम 
कर्मा दे भक्तीची जोड जीवन वाटे बघ बहु गोड 
अन्न जसे जगण्याकरिता कर्म तसे देहाकरिता 
अत्यावश्यक हे युद्ध धनंजया हो कटिबद्ध 
पराक्रमाची शर्थ करी आत्मोन्नति रे तुझ्या करी 
ऐकत जो गीतावचने त्याच्या भाग्या काय उणे? 
संग सोडूनी कर्म करी यज्ञ करी हे ध्यानी धरी 
जबाबदारी जो जाणे त्याला ना कधी पडे उणे 
विकास कर्माने करता नरजन्माला सार्थकता 
वडीलधारे जे करती इतर लोक ते अनुसरती 
आळसास का द्या थारा उद्योगाने पोट भरा 
कामक्रोधच शत्रु खरे शत्रुंजय त्या संहारे 
धर्मरक्षणा झुंजावे दैत्यांना निर्दालावे 
हातपाय नच गाळावे आत्मबला जोपासावे 
गीता मातांची माता ती कळते गाता गाता 
जुळले नाते आईचे प्रेमाचे पुण्याईचे 
संवादाची घेत रुची ऐका कहाणी गीतेची, ऐका कहाणी गीतेची 

ऐका कहाणी गीतेची : अध्याय दुसरा - सांख्य योग


अध्याय दुसरा - सांख्य योग

ऐकव गीते तुझी कहाणी निर्मळ निर्मळ तुझी वाणी
शिष्य तुझा मी पार्थ बोलला भगवंताला शरण गेला 
करू काय मी? प्रश्नच पडला कढत आसवे ढाळू लागला 
ज्याचा शोक करायला नको अर्जुन त्याचाच शोक करतो 
शिकवावे जर त्याला काही,         पांडित्याच्या बाता मारतो 
वस्त्र पुराणे जसे टाकणे जीर्ण शरीरा सोडून देणे
यात रडण्यासारखे काय नव्हे देह मी घोकत जाय
लढावेच लागते क्षत्रियाला या कर्माचा का कंटाळा? 
लढून जिंकता राज्य लाभते रणात मरता कीर्ती होते 
आत्म्याचा जो करी विचार तो ना केव्हाच बावरणार 
ऊठ अर्जुना निर्धार कर चापबाण तू हाती धर 
रणात लढणे धर्म तुझा नकोस शोधू मार्ग दुजा 
लाभहानि समान मान सुखदु:खांना समान मान 
ऐसी संधी येणार नाही शत्रूंना कर त्राहि त्राहि 
कर्म करावे तो अधिकार अरे फलाचा नको विचार 
कर्म टाळतो दळभद्री खांद्यावरती झोळी धरी 
यश येवो अपयश लाभो देह भले राहो जावो 
समत्व ज्याला हे जमले तो तर तरला योगबले 
भगवंताचा हा आवेश मोह घालवण्या नि:शेष 
ज्याची प्रज्ञा स्थिरावली महीवरी तो महाबली 
आत्म्यातच जो संतुष्ट त्याला ना कुठले कष्ट 
दु:ख न करते उद्विग्न सुखे न जाई हुरळून 
हवे नकोची ना बाधा सत्पुरुषाला त्या वंदा 
प्रसाद जर हृदयी भरला बुद्धी स्थिर तेथे अमला 
कृष्ण स्वये तैसा होता निर्वातीचा दीप जसा 
ऐकत राही धनंजय जमेल मजला मनोजय? 
पाठीवर मायेचा हात बघता बघता गीता पाठ 
मन सारे एकवटून ऐका कहाणी गीतेची, ऐका कहाणी गीतेची 

Saturday, December 27, 2014

ऐका कहाणी गीतेची : अध्याय पहिला - अर्जुनविषादयोग



अध्याय पहिला 
अर्जुनविषादयोग 

ऐकव गीते तुझी कहाणी निर्मळ निर्मळ तुझी वाणी 
धनुर्धराला काय झाले ’धनुष्यबाण’ गळून पडले 
मोहन जवळ असतानाही ऐसे कैसे मोहे गिळले?
पंडु सुताचा ऐसा विषाद कधी कोणा झाला होता? 
महाभारती रणांगणावर नवलाचेही नवल घडले 
शस्त्रे टाकून धनंजयाने शांतीवरती प्रवचन झोडले
कृष्णावाचून श्रोता कोण? रथा सारथी दुसरा कोण? 
त्याने सर्व ऐकून घेतले, रोगनिदान मनात केले! 
बोललाच नाही एक अक्षर, पार्थाचा जीव खालीवर 
तोंड कोरडे, भोवळ आली, कंप सुटला देहाला 
जो युद्धाचा हेतू होता त्याचाच विसर पडलेला 
आचार्यांना आप्तांनाही रणात मारून मिळणार काय? 
त्रैलोक्याचे राज्य नको मज, शस्त्रत्यागा ना पर्याय
यावर काय बोलू तरी मी, वेडा सांगे तत्त्वज्ञान
विवेक ज्याला गेला सोडून, त्याचे सगळी सुटले भान 
तो जे बोले बोलू द्यावे, तो जे ओके ओकू द्यावे
झुंजेन मी घमेंड होती, नाही लढणार खोटी उक्ती 
एक विषण्ण, एक प्रसन्न, का ही ऐशी होते स्थिती? 
घसरणारा घसरत गेला, बोलून सगळे पुरता थकला 
आता पुढे होणार काय, कृष्ण काही सांगणार काय?
गीता सांगते या ना आत, चालणार्‍याला मिळते वाट 
ऐसे घेई विश्वासात, सर्वच गीता करूया पाठ 
जुळले नाते आईचे, मुलेबाळे आवडीची
संवादाची रुचि घेत, ऐका कहाणी गीतेची, ऐका कहाणी गीतेची 

Friday, December 26, 2014

ऐका कहाणी गीतेची

१९९९ मध्ये अण्णांनी म्हणजे श्रीराम बाळकृष्ण आठवले यांनी लिहिलेले हे लिखाण. याची छोटीसी पुस्तिका ही त्यांनी काढली होती आणि स्वतःच्या आवाजात त्यांनी घरच्या घरी ध्वनीमुद्रणही केले होते. ते क्रमश: ब्लॉगवर टाकायचा प्रयत्न करतो आहे..

ऐका कहाणी गीतेची

ऐका कहाणी गीतेची । ऐका कहाणी गीतेची ॥धृ॥
गोविंद जय जय । गोपाळ जय जय
माधव जय जय । मुकुंद जय जय
ज्ञान वितरते, भक्ती शिकवते, गाते महती कर्माची ॥१॥

अश्रू पुसते, गोड हसवते
निर्भय करते, जवळी घेते
नरदेहाची करुनि बासरी, फुंकर घाली सोऽहंची ॥२॥

जन्मा आला मरावयाचा
मरायचा तो पुन्हा यायचा
रडायचे ना, झुरायचे ना, दिंडी पुढेच न्यायाची ॥३॥

नका गोंधळु, वदे गोंधळी
ज्ञानांजन तो नयनी घाली
पुढचे सुचवी, सावध करवी, किमया गोपालकृष्णाची ॥४॥

तुण तुण तुण तुण वदे तुणतुणे
कडाडतो डफ, झांज झणझणे
फुरफुरताती कैसे बाहु, गाथा लिहवी शौर्याची ॥५॥

जो जो जैसा मला भजतसे
त्याला मी तैसा पावतसे
भक्ति वाढता वाढे शक्ती, युक्ति साधते मोक्षाची ॥६॥

घराघरातून पोचो गीता
कराकरातून विलसो गीता
तुडवित काटे तरीहि हासत वाट चालणे ध्येयाची ॥७॥

नित्यकर्म सवयीचे होता
आस फलाची निघून जाता
सहजसमाधी देते साधून शाल पांघरे मायेची ॥८॥

नादमधुरता प्रासादिकता
प्रसन्न गायक, प्रसन्न श्रोता
कृष्णार्जुनसंवादापुढती साखरही लाजायाची ॥९॥

ऐसे मंथन सुंदर झाले
नवनीतहि मग वरती आले
ज्ञानबा तुकया टिळक विनोबा सेवित गोडी गीतेची ॥१०॥

कारागारी रहस्य लिहिले
गीताप्रवचन तिथे चालले
जे ज्याचे त्या करिता अर्पण तृप्त तृप्तता रामाची ॥११॥

****

Wednesday, November 5, 2014

श्री नृसिंह मंदिर आणि श्री नारद मंदिर मधील कार्यक्रमाची छायाचित्र

श्री नृसिंह मंदिर मधील छायाचित्र 

 श्री नृसिंह मंदिर मधील छायाचित्र



श्री नारद मंदिर मधील छायाचित्र  

Sunday, November 2, 2014

श्री नृसिंह मंदिरातील एका कार्यक्रमाचा फोटो.


श्री नृसिंह मंदिरातील एका कार्यक्रमाचा फोटो.  या कार्यक्रमाच्या वेळी बहुतेक ज्येष्ठांचे सत्कार करण्यात आलेले असावेत.  फॊटो मध्ये ज्येष्ठांमध्ये अण्णांचे शिक्षक ग. गो. फडके,  गोपीनाथ तळवलकर तसेच अंबुताई गद्रे दिसत आहेत.  

श्री नारद मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमाचा फोटो.


श्री नारद मंदिर येथील कार्यक्रमाचा फोटो.  मागे माई देवधर आणि अण्णा देवधर ही आहेत.

नवी पेठ विठ्ठल मंदिर येथील कार्यक्रमाचा फोटो..


अण्णांचा नवी पेठ विठ्ठल मंदिरात कार्यक्रम झाला होता.  साल बहुतेक १९८५ च्या आसपास असावे.   मागे आई, माई देवधर आणि तबल्याला अण्णा देवधर.  कार्यक्रम बहुतेक गीता कळते गाता चा असावा.

Friday, August 29, 2014

गणेश चतुर्थी


गणेश चतुर्थी

सर्वे विघ्ना विनश्यन्तु
सर्वे जानन्तु जीवनम् ।
मोदं ददानं हेरम्बम्
गणेशं प्रार्थयामहे ॥

अर्थ :  सर्व विघ्ने नष्ट होऊ देत.  जीवनाचे महत्त्व सगळ्यांच्या ध्यानी येऊ दे. मोदाचे - आनंदाचे वितरण करणार्‍या हेरंबाला - श्री गणेशाला आम्ही अशी प्रार्थना करतो.

Sunday, August 10, 2014

संस्कृत भाषा गौरव

संस्कृत भाषा गौरव 


प्रमोदनाय संस्कृतम्
प्रकाशनाय संस्कृतम् ।
प्रबोधनाय संस्कृतम्
समाष्टिरूप संस्कृतम् ।।

अर्थ : अत्यंत उदात्त आनंद देण्यासाठी संस्कृत भाषा आहे.  अंधार आहे तेथे प्रकाश पाडण्यासाठी संस्कृत आहे.  थोर थोर तत्वे उमगण्यासाठी संस्कृत आहे.  किंबहुना व्यक्ती व्यक्ती एकत्र आणून संघरूप होण्यासाठीच संस्कृत भाषा आहे.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

Friday, August 1, 2014

गाउ या टिळकांचे गुणगान


सान थोर या, राव रंक या
अवघे जन या या
गाउ या टिळकांचे गुणगान ॥ध्रु॥

भारतभूच्या उजळ ललाटी
’तिलक’ शोभला अक्षयकीर्ती
रत्नागिरीच्या खाणीमधुनी
झळके रत्न महान ॥१॥

’गंगाधर’ विद्यांचे आगर
’पार्वती’चेही तप दारुणतर
रविराजाच्या कृपाप्रसादे
पुत्रहि तेजोमान ॥२॥

सह्याद्रीच्या गिरिकुहरातुन
घुमे ’केसरी’चे घनगर्जन
राष्ट्राची जागली ’अस्मिता’
उफाळला अभिमान ॥३॥

मंडालेच्या सुदूर विजनी
स्थितप्रज्ञ रत गहनचिंतनी
कर्मयोगि हा लिहून गेला
गीताभाष्य महान ॥४॥

जन्मसिद्ध हक्कास्तव झटला
’स्वराज्य’ व्हावे ध्यास घेतला
यज्ञाची धगधगती ज्वाळा
उजळवि नभोवितान ॥५॥
गाउ या टिळकांचे गुणगान !

Wednesday, June 18, 2014

आनन्दी भव

आनन्दी भव

स्मितहास्य मुखे यस्य
तस्य मित्रं जगत् खलु
मधुरं भाषणं कृत्वा
आनन्दी भव सर्वदा

अर्थ :

ज्याच्या मुखावर नेहमी स्मित विलसते त्याची साऱ्या जगाशी मैत्री जुळते.  (तरी) तू मधुर भाषण करीत राहून नेहमीच आनंदाची उधळण करीत राहा.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१९८५ साली तरुण भारत मध्ये प्रकाशित झालेले हे सुभाषित.

Wednesday, May 28, 2014

स्वातंत्र्यवीर सावरकर - सुभाषित


समग्र जीवनं यस्य
यज्ञज्वालेव  तेजसं 
वीरं विनायकं स्मृत्वा 
स्फूर्तिं प्राप्नोतु भारतः ।। 

अर्थ : ज्यांचे संपूर्ण जीवन यज्ञाच्या ज्वालेप्रमाणे तेजोमय होते अशा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे स्मरण करून भारताला स्फूर्ती प्राप्त होऊ दे. 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

Sunday, May 18, 2014

ती काँग्रेस दिसेल पुन्हा?


२२ डिसेंबर १९८५ रोजी तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झालेले हे सुभाषित.  हे सुभाषित तेव्हा कोणत्या संदर्भात लिहिले होते माहित नाही पण आत्ताच्या निवडणुकांच्या निकालानंतर माझ्या वाचण्यात आले म्हणून येथे परत देत आहे 

ती काँग्रेस दिसेल पुन्हा? 

प्रसारिता राष्ट्रस्य भावना 
मोक्षाकांक्षा यया वर्धिता 
त्यागशालिनी ऐक्यवर्धिनी 
कदा दृश्यते 'राष्ट्रसभा' सा ?

अर्थ 

हिंदुस्तान एक राष्ट्र आहे अशी भावना जोपासणारी, राष्ट्राच्या संपूर्ण स्वातंत्र्याची आकांक्षा जनमानसात जागविणारी, त्यागी आणि ऐक्य प्रस्थापित करणारी कॉंग्रेस कधी बरे दिसेल?
 

Sunday, May 4, 2014

शंकराचार्य वंदना

वैशाख शुद्ध पंचमी (शंकराचार्य जयंती) निमित्त १९८४ साली तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झालेले हे सुभाषित :

शंकराचार्य वंदना

शंकराचार्य वन्देऽहम्
ज्ञानभास्कर ज्ञानद
वेदधर्मस्त्वया देव
तेजस्वी सपदि कृतः ॥

अर्थ : हे ज्ञानसूर्या, ज्ञान देणार्‍या शंकराचार्या, वैदिक धर्माला अत्यंत लवकर आपण तेजस्वी केलेत - म्हणून हे वेदमहर्षे वेददेवा, मी तुम्हाला वंदन करतो.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

Thursday, May 1, 2014

महाराष्ट्र राज्य दिन


१९८५ मध्ये महाराष्ट्र राज्य दिनानिमित्त तरुण भारत मध्ये माझ्या वडीलांनी म्हणजे श्रीराम बाळकृष्ण आठवले यांनी लिहिलेले हे सुभाषित.


इयं सन्तभूमिस्तथा युद्धभूमि:
इयं नाट्यभूमिस्तथा धान्यभूमि:
महाराष्ट्रनाम्ना प्रसिद्धा प्रशाला
इयं खड़्गहस्तो भवेत् प्रार्थना ॥

अर्थ : आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.  येथे वेळोवेळी युद्धे झालीत.  ही जशी नाट्यभूमी आहे तशीच कृषीभूमी सुद्धा आहेच.  एक प्रकारे जीवनातील विविध अंगांचे अध्यापन करणारी ही प्रसिद्ध प्रशालाच.  आपले महाराष्ट्र राज्य आता भारतभूमीचा खड्गहस्त होऊ दे हीच प्रार्थना.


Sunday, April 27, 2014

श्री स्‍वामी स्‍वरूपानंद (पावस) भक्तिस्‍तोत्र





श्री स्‍वामी स्‍वरूपानंद भक्तिस्‍तोत्र   

ॐ नमो जी गजानना
माझी पुरवा कामना
करावयासी सद्गुरु स्‍तवना
प्रज्ञाबल मज पुरवावे ।। १ ।।

श्रीशारदे हंसवाहिनी
मीपण अवघें सांडोनी
अंग लोटले तव चरणी
लळे आगळे तू पुरवी ।। २ ।।

नमन गुरुवरा आदिनाथा
तुझा महिमा वर्णू जातां
आदरे लवितो मम माथा
मौनचि झालें तुज स्‍तविणे ।। ३ ।।

सोऽहं सोऽहं स्‍मरतां स्‍मरतां
वाटे कैवल्‍य आले हाता
बैसल्‍या ठायी डोळे मिटतां
चित्‍सुखसागर उचंबळे ।।  ४ ।।

संतसमागम साधावा
अहंपणा ना बाधावा
बोध होऊं दे हाचि जिवा
नित्‍यानंदचि तो शिव मी ।। ५ ।।

स्‍वामी अंतरि यावे हो
गंधित जीवन व्‍हावे हो
मनमंदिर उजळावे हो
असंख्‍य दीपज्‍योतींनी ।। ६ ।।

जय स्‍वरूप जय आनंद
कृष्‍ण विष्‍णु हरि गोविंद
नाम उमलवी अरविंद
गुरुवर्या मम चित्‍ताचे ।।  ७ ।।

ॐ नमो जी गुरुराया
चरणी वाहियली काया
चित्‍त लागले नाचाया
दर्शनाचिया स्‍मरणाने ।। ८ ।।

शैत्‍य स्‍पर्शनी चंद्राचे
दयार्द्र बघणे सद्गुरुचे
मार्दव हृदयी मातेचे
असे कुठेही दिसेचि ना ।। ९ ।।

सजीव प्रतिमा आवडली
नामाधारे हृदि ठसली
सोऽहं स्‍मरता मृदु हसली
उसळत लहरींवर लहरी ।। १० ।।

रामकृष्‍ण हरी ! रामकृष्‍ण हरी !
येता कानी ही वैखरी
सहज उलगडे ज्ञानेश्‍वरी
कृतज्ञ अश्रू झरताती ।। ११ ।।

परमार्थाची जी नांदी
पावस झाले आळंदी
तिने रमविता सोऽहं बोधी
ज्ञानाई स्‍वामी विलसे ।। १२।।

मृदु सबाह्य नवनीत
तैसे स्‍वामी तुमचे चित्‍त
केली निर्हेतुक प्रीत
आचरिलात परमार्थ ।। १३ ।।

अगा सद्गुरो कैवल्‍यधामा
उच्‍चारिता तुझिया नामा
मानसी मोहरत मधुरिमा
सात्त्विक कोमल भावांचा ।। १४ ।।

भगवंतचि हे प्राप्‍तव्‍य
तयास भजणे कर्तव्‍य
आत्‍मा आहे मन्‍तव्‍य
ऐसी बुद्धि द्यावी हो ।। १५।।

‘खरा मी कोण’ शोधावे
आपण आपणां बोधावे
तत्‍त्‍वचिंतनी रंगावे
सौख्‍य याहूनि कोणते ।। १६ ।।

सोऽहं भावी जो रमला
तो प्रभुलागी आवडला
आत्‍मारामचि तो झाला
अद्वयानंद अनुभविता ।। १७ ।।

मन हे धावत बाहेरी
विषया भुलते वरी वरी
स्‍वरूप कृष्‍णा घ्‍या बासरी
आत तयासी वळवा हो ।। १८ ।।

सोऽहं साधना रुचो मना
मिळो प्रेरणा उन्‍नयना
आणिक कसलीहि कामना
नसो नसो या दासाची ।। १९ ।।

स्‍वामी आंतरिक सहवास
उद्धरी सकल जीवांस
सोऽहं चा दृढ अभ्‍यास
करवुनि घ्‍यावा गुरुदेवा ।। २० ।।

आपुला देव आपुल्‍यापाशी
हेचि बिंबावे निजमानसी
आणि काही न लगे मजसी
हेतु एवढा पुरवावा ।। २१ ।।

सोऽहं भावचि तनुधारी
भक्‍तजनांचा कैवारी
चालती बोलती ज्ञानेश्‍वरी
पावसेत बसली होती ।। २२ ।।

प्रेमळ मू‍र्ती अजुनि दिसे
आसनस्‍थ ती हासतसे
कसल्‍या अबोध उल्‍हासे
स्‍मरणे डोळे डबडबले ।। २३ ।।

कनकचंपकाचा वर्ण
टपोर पाणीदार नयन
पूर्णचंद्रासम सुहास्‍य वदन
स्‍मरतां गहिवर येत असे ।। २४ ।।

आपले पाहणे प्रेममय
आपले बोलणे दयामय
आपला स्‍पर्श स्‍नेहमय
सगळे काही सुख देई ।। २५ ।।

श्‍वासोच्‍छ्वासी यावे हो
सहवासासी द्यावे हो
निर्मल मानस व्‍हावे हो
आसनस्‍थ तेथे व्‍हावे ।। २६ ।।

सोऽहं सुंदर केरसुणी
दिलीत आम्‍हा लागूनी
धूळ मनीची झटकूनी
निर्मळ होऊ गुरुराया ।। २७ ।।

स्‍वामी करिता आपले स्‍मरण
होतसे तात्‍काळ देह विस्‍मरण
विकल्‍पास नुरते स्‍थान
उरतो केवळ आनंद ।। २८ ।।

स्‍वामी आपले कृतार्थ जीवन
उपासिता सद्गुरु चरण
तेचि घडविल मार्गदर्शन
भक्तिपथावर मी जाता ।। २९ ।।

सद्गुरु असता पाठीशी
खंत कासया तू करिशी ?
रात्रंदिन जप नामासी
आतुनि कोणी हे वदले ।। ३० ।।

नाम जोडिले श्‍वासाशी
अंतरि हसला हृषिकेशी
अमित जोडल्‍या सुखराशी
गुरुकृपेचा प्रत्‍यय हा ।। ३१ ।।

‘स्‍वामी, स्‍वामी’ मुखे म्‍हणा
सुवर्णनगरीचा राणा
धावत ये गीताकथना
सावध सावध वर्तावे ।। ३२ ।।

अरूप जरि मज स्‍वरूप तू
निर्गुण जरि मज सगुणचि तू
ये विषयी न मनी किंतू
अनुभविले साक्षात्‍कारा ।। ३३ ।।

‘मी’ म्‍हणजे हा देह नव्‍हे
‘मी’ म्‍हणजे ‘मन, बुद्धि’ नव्‍हे
‘मी, मी’ ऐसे वदताहे
ते तर सगळे ‘तोचि’ असे ।। ३४ ।।

‘सद्गुरु, सद्गुरु’ मी म्‍हणता
मानस अवघे परिमळता
शासोच्‍छवासी सुरेलता
अष्‍टभाव सात्त्विक स्‍फुरले ।। ३५ ।।

झरझर झरती अश्रुसरी
स्‍पंदन सोहं स्‍फुरे उरी
अनुभव जरि हा निमिषभरी
सार्थक झाले जन्‍माचे ।। ३६ ।।

दत्‍त- अंश तव रूपात
वावरला या जगतात
आनंदाची बरसात
स्‍वरूपमेघा त्‍वा केली ।। ३७ ।।

सद्वस्‍तु त्‍वा दाखविली
खूण अंतरी बाणविली
सोऽहं दिधली गुरुकिल्‍ली
वानू काय तुझा महिमा ? ।। ३८ ।।

काम क्रोध गेला कचरा
भक्‍तीचा झुळझुळे झरा
शीतल गंधित ये वारा
गेले मानस कैलासी ।। ३९ ।।

तुजसम कैवारी न कुणी
गुरुवर्या या तिन्‍ही भुवनी
सुवर्णवर्णांची स्‍मरणी
नाम घेत मी फिरवितसे ।। ४० ।।

‘प्रियंवदां’ च्‍या वंशात
प्रसन्‍न फुलला पारिजात
गंध दरवळे जगतात
तुझिया पावन चरिताचा ।। ४१ ।।

‘रामचंद्र’ हे तव नाम
नामांतहि वसला साम
कर्तव्‍याचे ते धाम
सार्थनाम तू झालासी ।। ४२ ।।

शैशवि शिवमंदिर रुचले
एकांतासी स्‍थान भले
चरणांनी नकळत नेले
सोऽहं ध्‍यानी रमावया ।। ४३ ।।

सुधामाधुरी वचनात
मार्दव अतिशय चित्‍तात
भाव आगळा भजनात
प्रसादचिन्‍हे ही सगळी ।। ४४ ।।

उदार सद्गुरु गणनाथ
अंजन घाली नयनांत
स्‍नेहल त्‍यांच्‍या छायेत
लाभे अवीट आनंद ।। ४५ ।।

ऐसे आला उमलून
कुणी छेडिली मधु धून?
श्रावणि सुखवित जे ऊन
सुखद सुखद तैसे गमला ।। ४६ ।।

ज्ञानमाउली हृदि वसली
प्रतिभावेली टवटवली
सुमनांवर सुमने ढाळी
कवित्‍व परिमल दरवळला ।। ४७ ।।

गुरुने केले नि:संग
प्रसन्‍न झाला श्रीरंग
रोम रोम फुलले अंग
निजांतरी गुज जाणवले ।। ४८ ।।

शांतिसुखाचा वर्षाव
गुरुकृपेचा नवलाव
दु:खालागी नच वाव
परमार्थाच्‍या क्षेत्री या ।। ४९ ।।

अपूर्व अनुभव मरणाचा
पाश तोडितो देहाचा
कळले ‘मी तर देवाचा’
जीवनौघ सारा बदले ।। ५० ।।

जगदंबेच्‍या प्रियकुमरा
ज्ञानराज हे योगिवरा
शतशत नमने स्‍वीकारा
चरणी मस्‍तक ठेवियले ।। ५१ ।।

गौरवर्ण ती पदकमले
नयन तयांवरती खिळले
प्रेमाश्रू मज नावरले
ब्रह्म पाहिले तेच तिथे ।। ५२ ।।

काय उणे श्रीगुरुचरणी?
तुष्‍ट जाहलो असे मनी
देहभान गेले सरूनी
उद्धरलो मी उद्धरलो ।। ५३ ।।

अंतरोत ना हे चरण
पदोपदी त्‍यांचे स्‍मरण
हेच हेच सद्गुरुभजन
जन्‍मचि हा सेवेसाठी ।। ५४ ।।

मुसावलेल्‍या सौंदर्या
कविवर्या सद्गुरुवर्या
मूर्तिमंत हे कैवल्‍या
सांग कसे संबोधावे ।। ५५ ।।

वरदहस्‍त जो वर झाला
अभयद शांतिद तो ठरला
स्‍मृतिचित्रांची मग माला
मनास माझ्या मोहविते ।। ५६ ।।

चित्‍त रंगले हरिपायी
मी-तूपण उरले नाही
हरि नांदे सर्वां ठायी
मन मौनावे स्‍वानंदे ।। ५७ ।।

समाधान नित हृदयात
सोऽहं ये आचारात
आपण जगला हरिपाठ
हरिरूपासी ध्‍याताना ।। ५८ ।।

विश्‍व पावसी पाहियले
सोऽहं सहजचि अस्‍तवले
अभिन्‍नत्‍व हरिशी झाले
हरि अवघा मग परिपूर्ण ।। ५९ ।।

ज्ञानज्‍योती पाजळली
भ्रांति भवाची सारियली
विदेहस्थिती आपणिली
देही दाखविला देव ।। ६० ।।

संत-सद्गुरुंची वाणी
पाठीवर कर फिरवूनी
अज्ञासी बनवी ज्ञानी
कौतुकास या पार नसे ।। ६१ ।।

सत्‍कर्मी मज रति वाढो
पुन:पुन्‍हा सत्‍संग घडो
सोऽहं चा मज छंद जडो
हेचि मागणे गुरुराया ।। ६२ ।।

ध्‍याना आपण बैसविता
अंगुलि धरूनि चालविता
भजनी आवड वाढविता
लळे आगळे पुरवीता ।। ६३ ।।

स्‍वरूपनाथ माझे आई
मजला ठाव दे ग पायी
अधिक मागणे काही नाही
हीच विनवणी दासाची ।। ६४ ।।

विरक्‍त देही ते संत
हेत विठ्ठली ते संत
नाम नित मुखी ते संत
श्रीस्‍वामीजी संत तसे ।। ६५ ।।

पुनर्जन्‍म श्रीस्‍वामींचा
महिमा सोऽहं भावाचा
अंत देहसंबंधाचा
तीर्थराज झाले स्‍वामी ।। ६६ ।।

शुचिर्भूतता श्रीस्‍वामी
अलिप्‍तपण ते श्रीस्‍वामी
शांतीचे गृह श्रीस्‍वामी
मोगराच की हा फुलला ।। ६७ ।।

जन्‍ममरणवार्ता सरली
स्‍वामी झाले शशिमौली
पावनगंगा झुळझुळली
स्‍वामींच्‍या साहित्‍याची ।। ६८ ।।

स्‍वरूपकीर्तन मज रुचते
स्‍वरूपदर्शन घडण्‍याते
सोडि न स्‍वरूप-नामाते
नामापाठी तू येसी ।। ६९ ।।

भक्तिभाव हा दृढ व्‍हावा
हीच प्रार्थना गुरुदेवा
परब्रह्म तू विमलत्‍वा
स्‍तोत्रांचा पुरवी स्रोत ।। ७० ।।

तुजला भावे आळविता
उमलुनि आली ही कविता
रंगुनि जावे मी गाता
वेडा झालो या छंदे ।। ७१ ।।

झटे वासरू धेनूला
माय चाटते वत्‍साला
गुरु-शिष्‍यांच्‍या स्‍नेहाला
महामूर येवो पूर ।। ७२ ।।

आत्‍मारामा तोषावे
भजनी तुझिया रंगावे
अद्वयत्‍व ना खंडावे
देवभक्‍त द्वैता बघता ।। ७३ ।।

इथे गायचे कुणी कुणा ?
अनुभविताना एकपणा
गुरुकृपेने मी न उणा
संतोषाच्‍या साम्राज्‍यी ।। ७४ ।।

सोऽहं भावे नटव मला
प्रेमजलाने क्षाळि मला
आत्‍मा अतीव आतुरला
गुरुमाउली घे अंकी ।। ७५ ।।

अद्वैती व्‍यापार कुठे ?
विना श्रवण सोऽहं श्रवितें
असे कोण परि दुसरे ते ?
तो मी ! तो मी !  ज्ञान उरे ।। ७६ ।।

तन्‍मयता तव कणभर दे
तत्त्वचिंतनी आवड दे
मुक्‍त गगनि मज विहरू दे
पुरवी बळ या पंखाना ।।  ७७ ।।

देह भले मातीस मिळो
कधी न माझे चित्‍त मळो
अहंभाव संपूर्ण गळो
तूचि वाहणे मम चिंता ।। ७८ ।।

मी-माझे हे मावळु दे
तू तुझे हे उगवू दे
तुझिया शब्‍दी गुंफू दे
भावसुमांची मज माला ।। ७९ ।।

अनन्‍य करि मज गुरुमाय
नित्‍य दिसावे तव पाय
चंदनसम झिजु दे काय
कोड जिवाचे तू पुरवी ।।  ८० ।।

धवल वसन तू गुरुराया
सहजासनि स्थिर तव काया
प्रसन्‍न मन तव नित सदया
मूर्ति स्थिरावी हृदयात ।। ८१ ।।

आनंदाचे निधान तू
ध्‍येय-ध्‍याता-ध्‍यानहि तू
हेहि वदविता केवळ तू
जळला कापुर, गंध उरे ।। ८२ ।।

गीतेने तुज स्‍तन्‍य दिले
ज्ञान दिले, अमरत्‍व दिले
स्थितप्रज्ञ तुजसी केले
गीतातत्त्वचि समूर्त तू ।। ८३ ।।

भावार्थासह जी गीता
आवडिने गाता गाता
मुखदुर्बळ बनतो वक्‍ता
वेडे गाणे मग स्‍फुरते ।। ८४ ।।

नित्‍यपाठ तव वाङमूर्ति
मनास निरवित शांती ती
तव उपकारा नसे मिती
तुजसम दाता तूचि खरा ।। ८५ ।।

ज्ञानेशाच्‍या अवतारा
मधुर मधुर अमृतधारा
पिलालागि झाला चारा
संजीवन दिधले दिधले ।। ८६ ।।

रामकृष्ण सम तू दिसशी
परमहंस तू मज गमसी
साधक बसता ध्‍यानासी
दोन्‍ही एकचि जाणवले ।। ८७ ।।

तुझ्या खडावा हृदयि धरू
तुझ्या गुणांचे गान करू
तुला अहर्निश स्‍मरू स्‍मरू
योगिराज परमानंदा ।। ८८ ।।

गुरुकृपा हो जयावरी
कृतार्थ झाला क्षितीवरी
सद्गुरु तत्त्वासी विवरी
सावधान ते परिसावे ।। ८९ ।।

तुझ्या कराने मी लिहितो
तुझ्या मनाने अनुभवितो
तुझ्या स्‍वरांनी आळवितो
भक्तिगीत सद्गुरुराया ।। ९० ।।

अमृतमय जीवन झाले
जधि गुरुंनी अंकित केले
आनंदाने मन धाले
भक्तिरंग चढता राहो ।। ९१ ।।

‘पातुं वसति’ पावस ते
यतिवर झाले ज्‍या वदते
माहेरचि ते सकलातें
पुण्‍यक्षेत्री वारी घडे ।। ९२ ।।

श्रींची खोली गाभारा
थारा नुरवी संसारा
सोऽहं भावचि खराखुरा
आसनस्‍थ झाला, दिसतो ।। ९३ ।।

अनाथपण ते सं‍पविले
गुरुनाथांनी आपणिले
साधन स्‍वयेचि दाखविले
वेड लाविले त्‍या नादे ।। ९४।।

परमहंस भाग्‍ये दिसला
ज्ञानदेव तर अवतरला
कृतज्ञ साधक गहिवरला
लोळण घे पदि पुन:पुन्‍हा ।। ९५ ।।

देहातीत श्रीस्‍वामी
अनाम तरि वसती नामी
येती भक्‍तांच्‍या धामी
भावभरे त्‍या आळविता ।। ९६ ।।

चित्ताची नित प्रसन्‍नता
भगवंती पुरती निष्‍ठा
दे संरक्षण निजभक्‍ता
अनुभव हा श्रीस्‍वामींचा ।। ९७ ।।

गादीवर लविता माथा
स्‍पर्शभास सुखवी चित्‍ता
शब्‍दहि घुटमळती आता
परेत वैखरी विरलीसे ।। ९८ ।।

आत्‍मा नसतो शास्‍त्रात
आत्‍मा नाही मंदिरात
आत्‍मा आहे श्‍वासातीत
गुरुकृपेने हे कळले ।। ९९ ।।

सोऽहं चिंतन जधि चाले
हृदयस्‍थे दर्शन दिधले
पदोपदी भक्‍ती उमले
स्‍तोत्र होउनी ये रूपा ।। १०० ।।

‘नित्‍य काय’ हे जाणावे
अनित्‍य मोहा टाळावे
अनन्‍यभावा राखावे
शिकवण आचरणी यावी ।। १०१ ।।

सोऽहं तत्त्वा मुरवावे
अमानित्‍व अंगी यावे
जनी-विजनि तुज चिंतावे
‘तथास्‍तु’ वद सद्गुरुराया ।। १०२ ।।

भक्‍त भाबडा श्रीराम
आळवितो मंगलनाम
तयास कर तू निष्‍काम
गुरुवर्या हे प्रार्थितसे ।। १०३ ।।

स्‍तोत्र तुझे हे नित गावे
विदेहत्‍व देही यावे
‘मी-तू पण’ विलया जावे
कृपा करी रे, कृपा करी ।। १०४ ।।

देहबुद्धि ही लोपावी
आत्‍मबुद्धि उदया यावी
उत्‍कटता भक्‍तीत हवी
एवढाचि वर मजसी दे ।। १०५ ।।

नाथ सांप्रदायी आम्‍ही
रत व्‍हावे सोहं ध्‍यानी
जिवास ठावहि नुरवोनी
अनुयायीपण राखावे ।। १०६ ।।

दुजेपणासी वाव नसे
सद्गुरुमूर्ति हृदी विलसे
अज्ञानाचे तम निरसे
केवळ एका किरणाने ।। १०७ ।।

‘गुरुचि देव’ या भावासी
भावे धरूनी हृदयासी
वंदुनि सद्गुरुचरणांसी
स्‍तोत्रगान हे संपवितो ।। १०८ ।।

।। हरि: ॐ तत् सत् ।।

कवि : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, April 14, 2014

तुला शोधणे पुढची वाट




तुला शोधणे पुढची वाट 

खेळ चाललासे द्वंद्वाचा 
अवघड आहे जीवनघाट
नकोस जाऊ तरी बावरुन 
तुला शोधणे पुढची वाट । ध्रु 

चढ जर आता उतरण पुढती 
दुःख जर आता सौख्यच पुढती 
सामर्थ्याने अंतर काट । १

भले बुरे ते दोन्ही कळते 
आतुन कोणी तुला शिकवते 
काळोखातुन फुटे पहाट । २

असो अमिरी असो फकीरी 
सदा रहावे निरहंकारी 
सद्भावाचा मिरवी थाट । ३ 

तू सगळ्यांशी वाग सारखा 
गंगेच्या त्या जळासारखा 
समाधान ये घेऊन ताट । ४ 

जैसे द्यावे तैसे घ्यावे 
का कोणाचे मन दुखवावे 
सावध राही व्यवहारात । ५ 

देहामधला देव पहावा 
क्षणात संपे तरी दुरावा 
यशोबीज ते विश्वासात ।६

दोन पावले एक चालणे 
दोन डोळुले एक पाहणे 
घे जीवा सगळ्यांची साथ । ७ 

द्वंद्व भासते तरी ते नसते 
ऐक्य चिंतनी हळू उमलते 
सार तेवढे घे ध्यानात । ८

कल्पना : ज.  कृ.  देवधर (गिझरवाले )
काव्यरुप  -  श्रीराम बाळकृष्ण आठवले 

Wednesday, March 19, 2014

शिवजयंती

जनयति जननी यं दुष्ट निर्दालनाय
गमयति यः कालं मातृभूमोचनाय 
न गणयति विघ्नान् सूर्यवंशी प्रतापी
स जयति शिवभूपो भारते सर्वकाले ।।
 

अर्थ

मातेने जणु काही दुष्टांच्या विनाशासाठीच ज्यांना जन्म दिला,  ज्यांनी मातृभूमीच्या मुक्ततेसाठी उभे आयुष्य खर्ची घातले, सूर्यवंशात उत्पन्न झालेल्या अत्यंत पराक्रमी अशा ज्यांनी विघ्नांची पर्वा  बाळगली नाही ते शिवराय भारतात सदैव विजयी आहेत.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

Saturday, January 25, 2014

मतदान - पवित्र कर्तव्य

मतदान - पवित्र कर्तव्य

लोकसत्ता रक्षणीया
पवित्रम् जनशिक्षणम्
विवेकेन विचारेण
मतदानं करोम्यहम् ॥

अर्थ : केव्हाही लोकसत्तेचे रक्षण व्हायलाच हवे.  त्यासाठी निवडणूक ही लोकशिक्षणाची सुंदर संधी आहे.  राज्यकर्ता निवडण्यासाठी मी विवेकाने आणि विचाराने़च मतदान करीन.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

Sunday, January 19, 2014

"मागणे श्री गणेशाला" कवि आणि स्वर : श्रीराम बाळकृष्ण आठवले

हे गणपती स्तोत्र माझ्या वडीलांनी लिहिलेले आणि त्यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित केलेले.  हे स्तोत्र त्यांच्या नित्य पठणात होते.

मागणे श्रीगणेशाला
   मंगलमूर्ती गजानना रे प्रभात समयी उठवावे
   सिद्धिविनायक हेरंबा देहशुद्धिला  प्रेरावे
   हे विद्याधर मोरया शुचिर्भूत मी नित व्हावे
   श्री गणनाथा आचार्या अथर्वशीर्ष ही मज यावे
   गणाधीश तू दासाचा सांघिकपण अंगी यावे
   सिंदुरचर्चित हे बाप्पा सूर्योपासक बनवावे
   मोदकप्रिय हे शिवकुमरा अन्नब्रह्म हे ठसवावे
   हे लंबोदर विघ्नहरा मन माझे सुस्थिर व्हावे
   अनादि तैसा अनंत तू इथे तिथे दर्शन द्यावे
   चिंतामणि तू परमेशा आत मला बघता यावे
   शिवकुमरा हे शुभंकरा कार्य विधायक घडवावे
   समाजपुरुषा हे देवा मी माझे विलया जावे
   श्रोता वक्ता लेखक तू सार वेचता मज यावे
   ब्रह्मरसाचा मोदक दे उदात्त उन्नत मन व्हावे
   विवेकशुंडा कशी हले सूक्ष्मदृष्टीचे भान हवे
   लंबोदर पीतांबर हे संघटनेचे सूत्र हवे
   हे सुखकर्त्या ओंकारा सोसाया सामर्थ्य हवे
   भालचंद्र हे योगींद्रा अवघड ते सोपे व्हावे
   एकदंत हे वरदात्या जिज्ञासूपण पुरवावे
   मनरमणा हे महोत्कटा विश्वात्मक मज बनवावे
   राम वाहतो या दूर्वा अध्यात्मी रमता यावे
   ।।मंगलमूर्ती मोरया।
  रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले