Sunday, September 24, 2023

माझे काही नाही येथे

ईश्वरनिष्ठा नसेल तर जीवनवेल सुकेल!

मन स्वस्थ असेल तरच शांत झोप लागेल. गाढ झोप येण्यासाठी कर्मे चोख व्हायला हवीत. 
श्रद्धेवाचून आपले जीवन उदास आणि दैन्यवाणं. 
परमेश्वर फार कृपाळू आहे तसाच तो न्यायनिष्ठुर पण आहे. एकदा देवाबद्दल प्रेम वाटू लागले की तो सर्व विश्वात भरून राहिला आहे, असा भाव होतो. जो जगन्नियंता आहे; तो आपले चांगले केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास पाहिजे.

******

माझे काही नाही येथे, 
माझे काही नाही!ध्रु. 

श्रीहरि सारे करवुनि घेतो 
दूर राहतो कौतुक बघतो 
ईश्वरनिष्ठा हे संजीवन शक्ती पुरवत राही!१ 

शरीर आहे ठेव तयाची 
ज्याची त्याला परत द्यायची 
नाम दाखवी राम आतला शीणभाग तो जाई!२

मी रामाचा रामहि माझा 
पहिला पाढा घोकायाचा 
गणित बरोबर तरीच सुटते ताळा करुनी पाही!३ 

कवी : श्रीराम बाळकृष्ण आठवले (माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य)

No comments:

Post a Comment