Tuesday, August 1, 2017

प्रसाद पुष्पे - उद्योगी तो सदा सुखी.

प्रसाद पुष्पे - उद्योगी तो सदा सुखी.

कंटाळा!
जगण्याचा कंटाळा आला म्हणणारा ही जगत असतोच. अंगात वर्षानुवर्षे जो आळस साठून राहिला ना तोच कंटाळा शब्दाने प्रकट होतो.
कशाचा कंटाळा येतो आपल्याला? पहाटे उठावेसेच वाटत नाही, देवाची पूजा करावीशी वाटत नाही, डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य अप्रिय वाटते. हा कंटाळा आपला चेहरा त्रासिक बनवतो.

आळोखे पिळोखे देणे, जांभया देत सुटणे, काहीतरी चाळा म्हणून मग विविध व्यसनं.  म्हणून म्हणतो 'कंटाळा' हा शब्द टाळा.

ज्याचा आपल्याला कंटाळा तेच काम प्रेमाने उत्साहाने, श्रद्धेने करू लागायचे. परिश्रम करायचे, घाम गाळायचा. भुकेहून दोन घास कमीच खायचे. नाम घ्यायचे, संत साहित्य थोडे तरी वाचायचे आणि संधी मिळेल तेव्हा सत्संग साधायचा. मनाचे दास नाही व्हायचे आपण. लहान मोठे मोह जिंकायला लागायचे.

'उद्योग' शब्द केवढा अर्थपूर्ण!

समर्थ रामदास भारतभर पायी हिंडले. देश पाहिला, स्थिती जाणली. मारुती स्थापून बलोपासना दिली, जीवनात 'राम' आणला.

संत तुकाराम! भंडारा डोंगरावर गेले. ध्यान साधना घडली. अभंगवाणी स्फुरली.

विविध ग्रंथ अभ्यासुया, पचवू या, जमेल तितके आचरणात आणू या.
नियमित व्यायाम करू या! चांगल्या उपक्रमांमधे व्यस्त राहुया!

कंटाळा शब्द हा टाळा, उद्योगी तो सदा सुखी
प्रयत्ने घडला राम, अर्धांगी जानकी सखी

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment