Sunday, May 16, 2021

चिरवियोगाने दिलेला धडा..

जे गेले ते पुन्हा न येते रडू नको तू झुरू नको
उरले त्याची घेई काळजी, जपणे जपणे सोडु नको!ध्रु.

रडशी तर पडशील एकटा, आरोग्यही ना राहील
उपासना कर शक्ती साठव हो जीवा उद्यमशील
चैतन्यास्तव एक क्षण स्मर, तास तास घालवू नको!१

जो गेला त्या दोष न द्यावा कारण तो तर देवाचा
जन्ममरण का असे हातचे पराधीन नर नित्याचा
श्रद्धेचे त्या श्राद्ध म्हणावे, उगाच भपका करू नको!२

अचानक कधी रांगेमध्ये तुझाही नंबर लागेल
करायचे हे राहुन गेले म्हणून कष्टी होशील
करुनि भले हो नामनिराळा मी केले हा गर्व नको!३

देवालाही दोष न द्यावा कर्म जसे फळ लाभतसे
एकाचेही दुसऱ्या जीवा सोसायाला लागतसे
प्रसंगास तू हो सामोरा रणातुनी पळ काढु नको!४

जीवन म्हणजे एक लढाई हजार जखमा होणार
विव्हळ थोडा पुन्हा हो खडा वीर असशि तू झुंजार
अभिमन्यू झाशीची राणी प्रताप यांचा भुलू नको!५

मरणही शिकवी जगावयाला अनुभवास ये माणुसकी
शेजारी ही धावुनि येती अनोळखा ही बंधुच की
हरि स्मरण कर पुन्हा पुन्हा तू व्यसनी कसल्या गुंतु नको!६

सोसायाचे चुकत नसे तर हासत हासत सोसावे
दुर्दैवाला ठरवी दुर्बळ जीवनगाणे तू गावे
स्वरूप आनंदाचा स्वामी होशी तू शंकाच नको!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
७.६.१९९९

No comments:

Post a Comment