ध्यानि घ्यावे हे नराने
वृत्ति कोठे गुंतते!ध्रु.
वृत्ति कोठे गुंतते!ध्रु.
ती स्थिरावो
शांत होवो
हाचि वर मन मागते!१
वृत्ति बदले
जगहि बदले
अंधता ही बाधते!२
राम स्मरणे
शरण जाणे
गूढ सगळे उकलते!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १३९ (१८ मे) वर आधारित काव्य.
माझा देह परमार्थाच्या आड येतो हे म्हणणे काही खरे नाही. मी सुखी कशाने होईन? हे आपण आपल्या कल्पनेनेच ठरवले, पण या जगात पूर्ण सुख व पूर्ण दुःख असं काही आहे का? जे खरं असेल किंवा खोटं असेल याची आपल्याला खात्री नाही, त्याबाबतीत आपण रिकाम्याच कल्पना करत बसतो. दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो, त्यावेळी त्यामध्ये पन्नास टक्के आपली कल्पना असते, आता उरले पन्नास टक्के, त्याबद्दल त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही ही वृत्ती असावी, म्हणजे संपले. आपली वृत्ति सारखी बदलत आहे आणि जगही सारखे बदलत आहे त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख किंवा अमुक परिस्थितीमुळे दुःख होते हे वाटणे खरे नव्हे, कारण सुखदुःख अस्थिर असते. भजन, पोथीवाचन वगैरे गोष्टी जर वृत्ती सुधारण्यासाठी न केल्या, तर ती नुसती करमणूक होते, त्यापासून खरा फायदा होत नाही. गाडी रोज काशीला जाते पण तिला काही काशीयात्रा घडत नाही, यात्रा घडते ती आत बसलेल्या लोकांना, त्याचप्रमाणे देहाने नुसता पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही, आपली वृत्ति भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे. वृत्ति स्थिर होणे, शांत होणे याचे नाव समाधान आणि भगवंताकडेच वृत्ति सारखी राहणे याचे नाव समाधि होय. भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्या स्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे यातच खरे समाधान शांति व सुख आहे.