Sunday, May 18, 2025

ध्यानि घ्यावे हे नराने वृत्ति कोठे गुंतते!

ध्यानि घ्यावे हे नराने
वृत्ति कोठे गुंतते!ध्रु.

ती स्थिरावो
शांत होवो
हाचि वर मन मागते!१

वृत्ति बदले
जगहि बदले
अंधता ही बाधते!२

राम स्मरणे
शरण जाणे
गूढ सगळे उकलते!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १३९ (१८ मे) वर आधारित काव्य.

माझा देह परमार्थाच्या आड येतो हे म्हणणे काही खरे नाही. मी सुखी कशाने होईन? हे आपण आपल्या कल्पनेनेच ठरवले, पण या जगात पूर्ण सुख व पूर्ण दुःख असं काही आहे का? जे खरं असेल किंवा खोटं असेल याची आपल्याला खात्री नाही, त्याबाबतीत आपण रिकाम्याच कल्पना करत बसतो. दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो, त्यावेळी त्यामध्ये पन्नास टक्के आपली कल्पना असते, आता उरले पन्नास टक्के, त्याबद्दल त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही ही वृत्ती असावी, म्हणजे संपले. आपली वृत्ति सारखी बदलत आहे आणि जगही सारखे बदलत आहे त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख किंवा अमुक परिस्थितीमुळे दुःख होते हे वाटणे खरे नव्हे, कारण सुखदुःख अस्थिर असते. भजन, पोथीवाचन वगैरे गोष्टी जर वृत्ती सुधारण्यासाठी न केल्या, तर ती नुसती करमणूक होते, त्यापासून खरा फायदा होत नाही. गाडी रोज काशीला जाते पण तिला काही काशीयात्रा घडत नाही, यात्रा घडते ती आत बसलेल्या लोकांना, त्याचप्रमाणे देहाने नुसता पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही, आपली वृत्ति भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे. वृत्ति स्थिर होणे, शांत होणे याचे नाव समाधान आणि भगवंताकडेच वृत्ति सारखी राहणे याचे नाव समाधि होय. भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्या स्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे यातच खरे समाधान शांति व सुख आहे.

Monday, May 12, 2025

दिसे कसा भगवान? आड जर येताहे अभिमान!

दिसे कसा भगवान?
आड जर येताहे अभिमान!ध्रु.

अभिमानाची वाढे हरळी
गढूळले मन, वृत्ती मळली
देहोऽहं ही भ्रांती करिते जिवालागी बेभान!१

प्रभुनामाची कास धरावी
भगवद्भजनी गोडी यावी
सोऽहं सोऽहं अनुभव येण्या गावे प्रभुगुणगान!२

कोणाविषयी द्वेष नसावा
सर्वांभूती राम दिसावा -
भगवंताचा विसर न व्हावा तारक भाव महान!३

रचयिता  : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १३३ (१२ मे) वर आधारित काव्य

वाचेने कोणाचे मन दुखवू नये, व देहाने परपीडा करू नये. दुसऱ्याचे दोष सांगणे हे हीनपणाचे लक्षण आहे. नेहमी सत्य व गोड बोलावे आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी. अभिमानाचे विष जेथे येते तेथे नामाची आठवण ठेवावी. मी रामाचा आहे असा अभिमान धरावा. नामाची कास धरावी. कोणाविषयीही वाईट विचार मनात आणू नये, त्यापासून आपलेच मन गढूळ होते. तुमचा विसर मला पडू देऊ नका, असे परमेश्वराला अनन्यतेने म्हणावे. तो तुमच्या सहाय्यास आल्यावाचून राहणार नाही.

Sunday, May 11, 2025

थोडे वाचावे परी ते कृतीत आणावे!

थोडे वाचावे परी ते कृतीत आणावे!ध्रु.

नको वदाया केवळ उक्ती 
कृती घडविते जगती प्रगती 
वेदांताचे मर्म आचरणि सहजपणे यावे!१

स्वतःस शिकवा जग सुधारले 
दुर्गुण विसरा जग सुखावले
कृतीविना जे बोल बुडबुडे जलात समजावे!२

कर्म घडू दे नको फलाशा 
सेवा करता सुटु दे आशा
कर्मफुलांनी पूजन करूनी धन्य धन्य व्हावे! 

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १३२ (११ मे) वर आधारित काव्य.

थोडेच वाचून समजून घ्यावे व ते कृतीत आणावे, नाही तर जन्मभर ज्ञान संपादनात वेळ जातो आणि कृती न झाल्याकारणाने पदरात काहीच पडत नाही. म्हणून नुसते वाचितच बसू नये. थोडेच वाचावे पण कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजावून घेण्याने प्रगती होत नसून ते कृतीत आणण्याने प्रगती होते. आपले आकुंचित मन विशाल करणे, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणे हेच खऱ्या वेदांताचे मर्म आहे.  जग सुधारायच्या नादी लागू नका; स्वतःला सुधारा की त्यामानाने जग सुधारेलच. वस्तु ही सुखाचे साधन असून आपण भ्रमाने तिलाच सुख-रूप मानतो. कर्मास सुरुवात करताना, फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होते; कर्म करीत असताना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते. कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त होते. म्हणून परमार्थामध्ये रोकडा व्यवहार आहे उधारीचा नाही असे सर्व संतांचे सांगणे आहे.

Saturday, May 10, 2025

देह रामाचा, मन रामाचे आठी प्रहरी वद वद वाचे!

देह रामाचा, मन रामाचे
आठी प्रहरी वद वद वाचे!ध्रु.

भगवंताची उपासना
दूर करिते यातना
येता जाता उठता बसता -
नाम घ्यावे राघवाचे!१

शीण आला जरि तना
जोर करिती वासना
वादळा शमवावयासी -
ध्यान करणे राघवाचे!२

होणारे ते चुकत नाही
तदिच्छेने घडत राही
भक्ति याविण वेगळी ना -
चरण स्मरणे राघवाचे!३

राम देता राम घेता
राम आहे भोवता 
त्याविना जगती न कोणी -
होउनी निःशंक नाचे!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १३१ (१० मे) वर आधारित काव्य.

Thursday, May 8, 2025

जे जे घडते ते समजावे, इच्छा भगवंताची!

जे जे घडते ते समजावे, इच्छा भगवंताची!ध्रु.

रामाचे नित स्मरण असावे
देहांतरि मन नच गुंतावे
विषयांचे भय सरेल घडता कृपा रामचंद्राची!१

जिथे जिथे वावरते वृत्ती
तिथे तिथे देवाची वस्ती
शरण गेलिया श्रीरघुनाथा वार्ता नुरे भ्रमाची!२

रामाविण सुख कशात नाही
अनुभव कथिती असे प्रत्यही
मन गुंताया राघवचरणी धार धरा नामाची!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२९ (८ मे) वर आधारित काव्य.

शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काही तरी होतच राहते. दुरुस्त केलेल्या जोड्यातील एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे तसे, आजारामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे व त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत ही जाणीव ठेवून वृत्ति आवरण्याचा प्रयत्न करावा. परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो. आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत असावे. हे भगवंता, तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार. आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला, तुझ्या प्राप्ती शिवाय कशातही सुख नाही असे भासू लागले तरी वृत्ति आड आल्याशिवाय राहात नाही. हे भगवंता, माझे मन तुझ्या चरणी राहो असे कर.

Wednesday, May 7, 2025

देव आणि भक्त यात आड येत मान

काय ऐसे जवळी, ज्याचा अभिमान?
देव आणि भक्त यात आड येत मान!ध्रु.

देहबुद्धि नाचवीते 
देहबुद्धि भ्रमवीते 
देह नव्हे आपण याचे उरे कुठे भान?१

म्हणो जग भला, भला 
म्हणो दे वा वेडा खुळा 
देवाचरणी वहावा मान - अपमान!२

देव कर्ता करविता 
देव एकच चालवीता 
गुरुकृपा देते शिष्या विवेकाचे दान!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२८ (७ मे) वर आधारित काव्य.

मानाला कारण अभिमान होय. हा अभिमानच भगवंताच्या व आपल्यामध्ये आड येतो. खरे पाहता अभिमान बाळगण्यास आपल्याजवळ असे आहे तरी काय शक्ती? की पैसा? की कीर्ती? जगात आपल्यापेक्षा कितीतरी लोक मोठे आहेत.   हा अभिमान ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. याला अगदी मूळ कारण देहबुद्धि ही देहबुद्धि नाहीशी झाली पाहिजे. चांगले, वाईट मान अपमान सर्व देवाला अर्पण करावा. ही देहबुद्धि, हा अभिमान जायला सद्गुरुचे होऊन राहावे. निदान बळजबरीने तरी, मी त्यांचा आहे असे म्हणावे. सद्गुरु तुम्हाला नकळत तुमचा अभिमान दूर करतील. ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे, अशांचे ऐकण्यात विशेष आहे. सगुणोपासना आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ती करीत नाही; फारच सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही; आणि फुकट काय जेवायला घालायचे म्हणून तो अन्नदान करीत नाही. असा मनुष्य फुकटच जायचा. देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथाच्या वाचनाची गरज आहे. देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे, हा देहबुद्धीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा कोणता उपाय असणार?

Friday, May 2, 2025

प्राणमोल द्यावे गावे - ॐ राम कृष्ण हरि!

 ॐ

प्राणमोल द्यावे गावे -
ॐ राम कृष्ण हरि! 
ॐ राम कृष्ण हरि!ध्रु.

विकार जे दंगा करती 
पुरी पुरी फजिती करती 
चला करू गुरुचा धावा 
ॐ राम कृष्ण हरि!१

विसंगती जेथे तेथे 
मनी येत भलते सलते 
चित्तशुद्धि होण्या गाऊ 
ॐ राम कृष्ण हरि!२

वस्त्र वासनांचे फिटू दे, 
अहंसर्पिणी ती मरु दे 
ममत्व ते सरण्या गाऊ 
ॐ राम कृष्ण हरि!३

सहा अक्षरी हे नाम 
सफल करी मंगल काम 
प्रेमदीप शिकवी जप हा 
ॐ राम कृष्ण हरि!४

दत्त अंश स्वामी माझे 
विश्वरूप स्वामी माझे 
शिरोधार्य आदेशच हा 
ॐ राम कृष्ण हरि! ५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१९ जानेवारी १९९४