Saturday, June 14, 2025

काळजीमुक्त जीवनाचे मंत्र

इछाशक्ती बळकट बनवी, 
फोल काळजी करू नको 
दे भिरकावुन काळजी चिंता, 
आज हातचा गमवु नको 

प्रभातसमयी करी प्रार्थना, 
शुभचिंतन तू सोडू नको 
जखम जाहली, हसत सोसली, 
काम हातचे टाकू नको 

ओत मनाचे कागदावरी 
भलेबुरे ते कसे असो
चिंता गेल्या पूर्ण लयाला 
दयाघना विसरणे नको

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
२६.११.२००४

(दै. सकाळ २५.११.२००४ गुरुवार मधील, दादा जे. पी. वासवानी यांच्या खालील सदरावर आधारित काव्य)

काळजीमुक्त जीवनाचे दहा मंत्र

१. काळजी करण्यातील फोलपणा लक्षात घ्या.
२. चिंता न करण्याइतकी इच्छाशक्ती तयार करा.
३. काळजी, चिंता दूर फेका.
४. एका दिवशी एकच दिवस जगा. 
५. दिवसाची सुरुवात प्रार्थनेने करा.
६. जीवनाची चांगली बाजू पहा.
७. प्रतिकूल परिस्थितीतही हसत रहा.
८. स्वतःला कामात गुंतवून ठेवा.
९. वाटणारी काळजी, चिंता एका कागदावर लिहून ती एका पेटीत टाका. आठवड्यातून ठराविक दिवशी ती पेटी उघडा. त्यातील बहुसंख्य चिंता तुम्ही काहीही न करता दूर झाल्याचे लक्षात येईल.
१०. देवाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवा.

"कृष्ण, कृष्ण" बोलो!

"कृष्ण, कृष्ण" बोलो! ध्रु.

मनमंदिर में बैठे कबसे 
दर्शन को हैं अति अति तरसे 
तुम गीता गालो।१ 

क्या करना है? कैसे करना?
न रहे कुछभी क्षुद्र वासना 
वासुदेव चुन लो।२ 

आसन सुस्थिर हो जाएगा 
वदन सुमन सा खिल पाएगा
अनुभूति ले लो।३

पार्थ बनोगे सार्थ सुनोगे
कार्य करोगे, फल छोड़ोगे 
कृष्ण स्वयं बन लो।४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१ अगस्त २००४ रविवार

Wednesday, June 4, 2025

भाग्यवंत तो..

भाग्यवंत तो राहि जयासी
भगवंताचे अनुसंधान!ध्रु.

देहबुद्धिचे मूळ वासना
द्वंद्व निर्मिते मनी वासना
ती निपटाया नाम जणू की रघुनाथाचा आहे बाण!१

प्रपंच जरि नेकीने केला
अभिमानाने बंधन ठरला
बंधन सुटण्या, शस्त्र एकले, भक्ती म्हणती तया सुजाण!२

जन्मा कारण अंति जी मती
राम असावा वचनी चित्ती
भगवद् भक्ती तनी मुरण्याते सोऽहं सोऽहं पूरक ज्ञान!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५६ (४ जून) वर आधारित काव्य.

आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो.  प्रपंचात आम्ही काही पाप करीत नाही, मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला? असे काही जण विचारतात.  प्रपंच सचोटीचा जरी असला तरी त्यात अभिमान असेल तर नाही तो परमार्थ होणार. जो विषयांना चिकटून राहतो त्याला त्यांचे सुखदुःख सोसणेच भाग असते. राम कर्ता म्हटल्याशिवाय, किंवा अभिमान सोडल्याशिवाय परमार्थ नाही साधणार. मी देही म्हणू लागलो यात अभिमान आला. देहबुद्धीला कारण म्हणजे वासना. वासना हे सर्वांचे मूळ आहे. जो त्या वासनेला मारतो तोच परमार्थाला लायक होतो. भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ति स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे.

Saturday, May 31, 2025

तुला शरण आलो रामा तुझाच मी झालो!

तुला शरण आलो रामा
तुझाच मी झालो!ध्रु.

देह विसराया, 
निर्गुणात जाया
सहवास लाभण्यास 
नाम घेत आलो!१

धरूनिया करी, 
देहातीत करी
विसर पाड वासनांचा 
काकुळती आलो!२

नामरुची दे दे
संतसंग दे दे
तुझा लाभ हाच ध्यास
नामी गुंतलेलो!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५२ (३१ मे) वर आधारित काव्य.

मी जे जे करतो ते ते भगवंताकरता करतो असे जो म्हणतो तो खरा व उत्तम भक्त होय. भगवंतप्राप्ती शिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे हे भक्ताचे लक्षण आहे. जो काळ भगवत्स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो. गुरुआज्ञा प्रमाणाचे बीज निर्गुणातच आहे हे लक्षात ठेवावे. देहातीत व्हायला गुरुआज्ञेप्रमाणे वागणे यापरते दुसरे काय आहे? भगवंत माझा असे म्हणावे, म्हणजे देहाचा विसर पडतो. कर्तेपण तुम्ही आपल्याकडे घेतलेत तर सुखदुःख भोगावे लागेल. स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे. कृती करणाऱ्याचाच वेदांत खरा असतो. भगवंताला शरण जावे व त्याचे होऊन राहावे यातच सर्व धर्मांचे व शास्त्रांचे सार आहे.

Friday, May 30, 2025

सर्व विसरोनी राम आठवावा!

सर्व विसरोनी राम आठवावा!ध्रु.

अकर्तेपणाने आचरिणे कर्म
तेणे खचित होत आपुलासा राम
भागल्या जिवासी नाम हा विसावा!१

प्रपंचाचा ध्यास कशास जिवास?
आस नव्हे आहे कंठालागि फास
प्रारब्धावरी देह हा टाकावा!२

मनापासुनी हो आठवीता राम
रुचतसे देवा साधन निष्काम
घडोघडी हाचि विवेक करावा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५१ (३० मे) वर आधारित काव्य.

Thursday, May 29, 2025

छंद जडला मज नामाचा!

राम माझा, मी रामाचा
छंद जडला मज नामाचा!ध्रु.

स्मरण हेच पुण्य, विसर हेच पाप
विस्मरणे पोळतील खचित त्रिविध ताप
राम हा स्वामी मनाचा!१

संकटे आली तरीही तीहि रूपे राघवाची
यानिमित्ते पर्वणी ये रामनामाच्या जपाची
ध्यास लागो राघवाचा!२

कर्म करिता गुंतवीते, तत्फलाची हीन आशा
प्रभु दुरावे, मन झुरावे हे निमंत्रण सर्वनाशा
तनमने मी राघवाचा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५० (२९ मे) वर आधारित काव्य.

भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीच गरज नसते. तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो मी निर्दोष होईन तेव्हाच लोक मला तसे दिसतील. आपल्या सर्व अवगुणांना कारण म्हणजे "मी रामाला विसरलो" हेच आहे. परमात्म्याचा विसर पडतो हेच खरे पाप. कोणतेही कर्म करताना फळाची आशा धरली तर ते घातक होते. ज्याने भगवंत जवळ आणला जातो तेच चांगले कृत्य. कोणत्याही स्थितीत वृत्ती कायम राखणे, हेच योगाचे सार आहे. प्रत्येक कृतीत मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवावी. संकटेही आपल्या कर्माचेच फळ असतात. संकटांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली, तर ती आपल्याला समाधान देते. असमाधान हा रोग सर्वांचा एकच आहे व भगवंताचे स्मरण हे औषधही सर्वांना एकच आहे; आणि समाधान हा गुणही सर्वांचा तोच आहे.

Saturday, May 24, 2025

भगवंताचे नाम घ्यावे, श्रीरामाचे नाम!

भगवंताचे नाम घ्यावे, श्रीरामाचे नाम!ध्रु.

जिव्हा दिधली जी देवाने
ती लागावी रामकारणे
प्रभुनामांतरि सुधामाधुरी -
नाम सदा सुखाधाम!१

देहावरती प्रेम केवढे
का नामा मग आढेवेढे?
नामाकरिता नाम जपावे -
राहुनिया निष्काम!२

समाधान नामांतरि आहे
राम नाम होउनिया राहे
विकल्प सगळे जातिल विलया -
हसता अंतरि राम!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १४५ (२४ मे) वर आधारित काव्य.

आपल्याला जिव्हा दिली आहे ती जर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त वापरली तर ते चांगले होईल काय? आपल्याला जिव्हा दिली आहे तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरिता करा. जसे तुम्ही देहावर प्रेम करता तसे तरी नामावर ठेवा. अश्रद्धा उत्पन्न झाल्यास आपले पापच आड येते असे समजा व त्यावेळेस नामस्मरण करीत जा. नाम व्यवहाराकरिता उपयोगात आणू नका. नामस्मरण नामा करताच करीत जा, म्हणजेच खरा आनंद तुम्हास मिळेल. खरे समाधान तुम्हाला नामातच मिळेल. भगवंताचे नाम हे स्वयंभू व स्वाभाविक आहे. विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली म्हणजे भगवंताचे नाम होय.