जेथे नाही 'राम', तेथे कैचा आराम?ध्रु.
'मी नव्हे नव्हे' हो कोणी
तो रामच अंत:करणी
हे ठसण्या जपणे प्रभुनाम!१
लागता प्रेम नामाचे
आनंदे अंतरि नाचे
तो भक्तसखा हो श्रीराम!२
'मी नुरणे' पूर्णावस्था
लाभेल भाग्य वश होता
परि सोडु नये कधी नाम!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६५ (५ मार्च) वर आधारित काव्य.
ज्या प्रपंचात राम नाही त्या प्रपंचात आराम होणार नाही. एका म्यानात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे मी आणि भगवंत एका अंत:करणात राहू शकत नाहीत. संत हे भगवंताशी एकरूप झालेले असतात. नामाचे प्रेम लागले म्हणजे कर्तेपणाचा अभिमान कमी होतो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना "त्याच्या" इच्छेने व सत्तेने घडून येतात अशी जाणीव ज्याच्या अंत:करणात उमटली त्यांना भगवंताचे खरे अस्तित्व समजले. मी खरा नसून "तोच" खरा आहे हे सांगण्यासाठी जेथे मीच उरत नाही ती खरी पूर्णावस्था होय. नाम घेत असताना सदाचरण कधी सोडू नये. नीतीच्या मर्यादा कधी ओलांडू नयेत. निराश कधी बनू नये, देहाला उगीच कष्टवू नये, पण काही झाले तरी भगवंताचे नाम कधी सोडू नये.
No comments:
Post a Comment