Tuesday, March 3, 2026

प्रपंच ऐसा करावा!

परमार्थाच्या आड न ये जो 
प्रपंच ऐसा करावा!ध्रु.

परमार्थाचा मुख्य धंदा
प्रपंच केवळ जोडधंदा
गुंतु नये मन प्रपंचात कधि 
राघव तया विसावा!१

व्यवहाराते सांभाळावे 
आहारी ना त्याच्या जावे
सुखदुःखांच्या झंजावाती 
राघव ना विसरावा!२

प्रपंच ना कधि कोणा सुटला
भक्ताते परि राम भेटला 
आकुंचितता ताप देतसे 
संश सोडुनी द्यावा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६३ (३ मार्च) वर आधारित काव्य 

प्रत्येक माणसाने परमार्थ हा मुख्य धंदा ठेवून प्रपंच हा जोडधंदा म्हणून करावा; म्हणजेच प्रपंचात होणाऱ्या लाभहानीचा परिणाम भगवंताचे अनुसंधानावर होऊ देऊ नये. परमार्थाचे आड प्रपंच न येईल अशा युक्तीने वागावे. भाजीला जसे मीठ लागते तसे परमार्थाला प्रपंच लागतो. मीठ नसेल तर भाजी अळणी लागते पण मीठ जास्त झाले तर भाजी खाववत नाही, त्याचप्रमाणे प्रपंच आणि परमार्थ यांचा संबंध आहे. प्रपंचात व्यवहार जतन करावा खरा, पण तो काही सर्वस्व नव्हे. प्रपंच पाहिजे आणि दुःख नको असे म्हणणे वेडेपणाचे आहे. नुसता प्रपंच तापदायक नाही नाही तर आकुंचित प्रपंच हा तापदायक आहे. आपण ज्याप्रमाणे आपल्या या खिशातील पैसे त्या खिशामध्ये ठेवतो, त्याचप्रमाणे प्रपंचातील आपले मन आपण काढून भगवंताकडे लावावे तसे करण्यात समाधान आहे.

No comments:

Post a Comment