Thursday, April 30, 2026

भगवंताचे नाम जिथे, संत निवासा येती तिथे !

भगवंताचे नाम जिथे, 
संत निवासा येती तिथे!ध्रु.

नामस्मरणी मन रंगावे 
रामचरणी लीन व्हावे
शरण गेलिया रामाते!१

नारायण हो मनुजाचा-
मार्ग न चुकला जर त्याचा 
कृपा केलिया रघुनाथे!२

सृष्टि पहावी भगवत्कारी
मन ठेवावे तिच्यावरी 
श्रद्धने प्रचिती येते!३

भगवन्नामे संतसंगती-
करतलि येती चारी मुक्ती
पराशांति मन अनुभविते!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२१ (३० एप्रिल) वर आधारित काव्य.

Wednesday, April 29, 2026

डोळे असुनी आंधळे त्या संतच कोठे भेटेना!

डोळे असुनी आंधळे त्या संतच कोठे भेटेना!ध्रु.

अंतरी भावाची वाण 
जवळि ना थोडी ही जाण 
विषयकर्दमी लोळला त्या गंगाजलही पिववेना!१

अहंता सोडि नच ज्याते
तयाची झिंग चढत जाते 
सुटेना ज्यास आसक्ती तयांसी तोल गवसेना!२

असत् जे तेच उरि धरि‌ले
भ्रमाने सत् ही लाथाडिले
फेकिले दूर जर परिसा, लोहता खचित संपेना!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२० (२९ एप्रिल) वर आधारित काव्य.

कामवासना आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला विघातक आहेत.  एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण "स्व" देणार नाही, "स्व" देऊन "सर्व" ठेवले तरी चालेल पण "सर्व" घेऊन "स्व" ठेवला तर मात्र ते चालणार नाही. म्हणजेच "मी देतो" ही भावना राहिली, तर सर्वच देणे वाया जाते.  संतांचा संतपणा दिसत नाही, याचे कारण आमच्यात तळमळ नाही. सत्ययुगात जो राम होता तोच आजही आहे, पण माझा भावच कमी झाला त्याला काय करावे? जो भगवंताचा झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले व त्यालाच खरे समाधान मिळाले.

Tuesday, April 28, 2026

संत हवासा वाटावा, देव तयांतचि भेटावा!

संत हवासा वाटावा, 
देव तयांतचि भेटावा!ध्रु. 

वाट चुकली तर संगे येतो 
बोट पकडुनी तो चालवितो
तो करुणाघन बरसावा!१

विषय सुटावा, शिव गाठावा 
भेद मिटावा, भ्रमहि फिटावा 
हृदयासनि बसण्या यावा!२

उक्ति कळावी, कृती घडावी
संत अनाथा मार्गी लावी 
तळमळ लागो या जीवा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११९ (२८ एप्रिल) वर आधारित काव्य.

विषयाची आवड कमी होऊन खरी तळमळ लागली म्हणजे संत भेटतो. असंताची आवड नाहीशी होईल तेव्हाच संत हवासा वाटेल.  विषय आपल्याला त्रास देतात पण ते सोडावे कसे हे समजत नाही.  जंगलात सापडलेल्या माणसाप्रमाणे आपले झाले आहे. आपली वाट चुकली आहे असे ज्याला वाटेल तोच जंगलातून बाहेर जाण्याची वाट विचारतो. कर्ममार्ग सांभाळताना "कर्ता मी नव्हे" हे सांभाळणे जरूर आहे. स्वतःला कसे विसरावे हे कळण्यासाठीच संतांना शरण जावे. ज्याचे अंत:करण शुद्ध आहे तो स्वतः तर आनंदी असतोच, पण त्यामुळे भोवतालचे वातावरणही आनंदाचे बनते.

Sunday, April 26, 2026

संते महत्कार्य केले भगवंता सगुणी आणिले!

संते महत्कार्य केले
भगवंता सगुणी आणिले!ध्रु.

प्रेम आले साधनी 
राम भरला लोचनी 
जणु पुण्य फळा आले!१

"राम कर्ता" बोधिले 
"राम दाता" वर्णिले 
भिन्नत्वचि विलया नेले!२

रुचि आली सेवेसी
वसला देव हृदयदेशी
सद्गुरु प्रसाद अनुभविले!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११७ (२६ एप्रिल) वर आधारित काव्य.

भगवंताला सगुणामध्ये आणला हा संतांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे. संतांनी आपल्याला सांगितले की, ही दृश्य मूर्ती तुझी आहे, "तुला हव्या असणाऱ्या सर्व वस्तू देणारा भगवंत तोच आहे" ही जाणीव व  कल्पना आपल्या ठिकाणी वाढत गेली तर त्यामुळे "भगवंत दाता आहे" ही जाणीव उत्पन्न होईल. "भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझ्या सुखाचा आधार आहे, तो माझे कल्याण करणारा आहे," ही जाणीव झाली की, जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेनेच मिळाले ही भावना होऊन, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकेल. सर्व भोग भोगून काळजी नसणे हे उपासनेचे खरे बीज आहे. जगाचे खरे स्वरूप कळण्यास सगुण उपासनाच कारणीभूत आहे. आपण ज्या मूर्तीची उपासना करतो त्या मूर्तीमध्ये तेज वाढत असते.

Friday, April 24, 2026

दान एवढे द्यावे संता, आज्ञापालन व्हावे

दान एवढे द्यावे संता, आज्ञापालन व्हावे!ध्रु. 

तुम्ही भगवंताच्या मूर्ती 
तुम्ही ध्येयाची परिपूर्ती
श्रद्धाबळ अंतरात संता जोमाने वाढावे!१

हवेपण जधी कण ना उरले
दुःखाचे ते कारण सरले
अपुल्या चरणींची धूली मज संता झणी करावे!२

अपार आहे सद्गुरु महिमा
साधुसंत साक्षात् परमात्मा
अपुल्या स्मरणे यावा गहिवर मस्तक पदि टेकावे!३

 रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११५ (२४ एप्रिल) वर आधारित काव्य.

संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे.
मनाच्या विषादाला कारण एकच असावे की, भगवंताचा मी अजून झालो नाही. हवेपण नाहीसे झाले म्हणजे मग दुःखाचे कारणच राहात नाही. श्रद्धेने जे काम होते ते दुसऱ्या कोणत्याही तपश्चर्येने होत नाही. गुरु म्हणजे साक्षात् परमात्मा. त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या.

Wednesday, April 22, 2026

अपार सत्संगाचा महिमा!

अपार सत्संगाचा महिमा! 
अगाध सत्संगाचा महिमा!ध्रु.

ऐसे दुसरे साधन नाही 
भगवंताप्रत घेऊन जाई
प्रकाश नुरवी लेश तमा!१

संतांना या मरण कुठे 
जन्ममृत्युचे मूळ तुटे 
या महिम्यासी नच उपमा!२

ईश्वर आहे याची प्रचिती
या संतांची निरखा भक्ती
अनुभवाच यांचा प्रेमा!३

देहाचा मग विसर पडे
भगवंताचे स्मरण घडे
संतोषाची परिसीमा!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११३ (२२ एप्रिल) वर आधारित काव्य.

मनुष्य जन्मास येणे, संतांची भेट होणे, आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणे, या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत. म्हणूनच संतसमागमासारखा लाभ नाही असे म्हणतात. मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात. आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो. देहाच्या पलीकडे असणारे व कायमचे टिकणारे आणि देहाला विसरून व देवाला स्मरून जे मिळवायचे असे भगवंताचे सुख आहे ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे. संत आपल्याला सत्य स्वरूपाची ओळख करून देतात. संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोहोचतात. संगतीचा परिणाम जितका नकळत होतो, तितका कृतीचा होत नाही म्हणून सत्संगती धरावी.

Tuesday, April 21, 2026

त्यात समाधान थोर आहे

संताज्ञापालन, संतसमागम!
त्यात समाधान थोर आहे!ध्रु. 

देव कर्ता मानावे 
अभिमाना सांडावे 
आत्माराम तेणे क्षणी तोषताहे!१

नव्हे मी देहाचा
नव्हे मी मनाचा
विषयाची नावड सत्संग देताहे!२ 

देव असे भावात
देव वसे नामात
नामचिंतामणी भक्ता लाभलाहे!३

संत लाज राखे
संत भक्ति पोखे 
मधुर वचने प्रेम वर्षताहे!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११२ (२१ एप्रिल) वर आधारित काव्य.

समाधान एकपणात आहे, अद्वैतात आहे. मी कर्ता नसून देव कर्ता आहे असे मानावे. मी नाही कोणाचा हे बघावे. मी देहाचा व मनाचाही नाही. संत विषयाची आसक्ती कमी करतात; अशा संतास शरण जावे. देव भावात असतो; तो भाव शुद्ध व उच्च असावा. सत्समागम म्हणजेच सत्याचा समागम; संत सांगतील त्याप्रमाणे वागावे. भगवंताला विसरून भजन करू नका. जगाच्या लाजेला भिऊन भगवंतास अंतर देऊ नये. निर्विषय चित्त संतांनाच करता येते. नामाच्या योगानेच संत ओळखता येतात, जोडता येतात, आणि टिकविता येतात.

Monday, April 20, 2026

संत सह‌वास भाग्य हेच थोर!

संत सह‌वास भाग्य हेच थोर!ध्रु.
 
तेणे रामरूप जाहलेसे मन 
अतां अम्हांलागी दिसे जग शून्य
संते मरणाचा संपविला घोर!१

देहबुद्धि गेली, भक्ति रुजविली
"मी तो परमात्मा" खूण पटविली
संते पिटाळिला दूर दूर चोर!२  

संते जोडियले श्वासासंगे नाम
मन घोकु लागे क्षणोक्षणी राम
देवा बांधण्याते दिला सोऽहं दोर!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १११ (२० एप्रिल) वर आधारित काव्य.

Saturday, April 18, 2026

उपजण्या अंतरि भक्ति, झडो झडो देहबुद्धि

उपजण्या अंतरि भक्ति, झडो झडो देहबुद्धि!ध्रु.
 
हात जोडिले श्रीरामा 
तूच धाव भक्तकामा 
तगमग शांतवी रे करि "राममय" वृत्ती!१

तुज नित्य आठवावे
देहालागी विसरावे
असे करी रामा काही तुझे ठायी जडो प्रीती!२

वृत्ति ज्याची राममय 
तोचि तोचि निरामय
संतसंग दे गा सदा मागणेच हे संप्रती!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०९ (१८ एप्रिल) वर आधारित काव्य.

परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे. भक्तीमार्गातील पहिली पायरी म्हटली म्हणजे मोबदल्यारहित, निष्काम, नि:स्वार्थी परमात्मस्मरण करणे; व शेवटची पायरी म्हणजे आपण स्वतःला विसरणे, देहबुद्धी विगलित होणे, ही होय. देहरक्षण परमात्मप्राप्ति करिता करावे. प्रेम व उपचार यांचा अन्योन्य संबंध असतो. या उपचाराने भगवंताशी संबंध वाढतो. संत विषयात देव पाहतात, पण आम्ही मात्र देवातसुद्धा विषय पाहतो. संतांची वृत्ती राममयच असते. परमार्थात मर्यादा एकच, आणि ती म्हणजे भगवंताच्या नामापासून विचलित न होणे.

Wednesday, April 15, 2026

सत्संगाचा लाभ मोठा! आनंदा ना तोटा!

सत्संगाचा लाभ मोठा! 
आनंदा ना तोटा!ध्रु.

मन द्रव्यांतरि गुंतत नाही 
ओढ हरीची लागुन राही 
गहिवर ये प्रभु स्मरता!१

सर्व गुणांचा सागर ईश्वर 
तो संतांचा बनतो किंकर 
अपार संत महत्ता!२ 

विकार विरती, विचार स्फुरती
हृदि पाजळती ज्ञानज्योती 
विश्व धवळले आता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०६ (१५ एप्रिल) वर आधारित काव्य.

सत्संगतीच्या योगे मन पैक्यावर गुंतून राहात नाही. जे सुख चिरकाल टिकणारे नाही ते घेऊन काय करायचे? पैक्यासारख्या निर्जीव वस्तूत आपले मन किती गुंतून राहते! पैशाचे नाव अर्थ, पण तो करतो मोठा अनर्थ. पैसा प्रपंचाला पुरेसा असावा! म्हणजे किती तर पेन्शन असेल तर त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला. आपल्याला अडचण नाही पडली, की आपली श्रीमंतीच आहे. पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र आग्रहाने करावा आणि नंतर होईल तसे होऊ द्यावे. आपण आतून निष्काम, निर्लोभ व निरिच्छ असावे. सत्संगती पासून सद्विचार व सद्वासना प्राप्त होतात. ज्याचे विचार चांगले तो मनुष्य खरा चांगला होय; व जिथे भगवंताचे अनुसंधान आहे तेथे राहणे हीच खरी सत्संगति होय.

Tuesday, April 14, 2026

ऋणी असावे यासाठी, संत जागे करताती

ऋणी असावे यासाठी, संत जागे करताती!ध्रु. 

त्यांची तळमळ 
क्षाळितसे मळ 
चुकल्या पथिका मधुर बोलुनी पथावरी आणती!१

त्यांच्या लीला 
जग तरण्याला 
स्वार्थाचा लवलेश न चित्ती ते तर शुद्धमती!२

अनुभव बोले
हृदयी ठसले
संतांच्या आज्ञेचे पालन देही दे मुक्ती!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०५ (१४ एप्रिल) वर आधारित काव्य.

संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो; म्हणून चांगल्या विचाराच्या माणसांची संगत धरावी. आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला, परंतु संतांनी आपल्याला जागे केले. ते ज्या लीला करतात त्या जगाच्या कल्याणासाठी असतात. ते स्वस्थ बसलेले दिसले तरी जगाचे कल्याण करीतच असतात. ज्या संतांचा ग्रंथ आपण वाचतो, त्यांच्या कृपेवाचून तो नीट समजणार नाही. ज्याच्यावर त्यांची कृपा आहे, त्याला काही विद्वत्ता नसताना देखील त्या ग्रंथाचा बरोबर अर्थ अगदी स्वाभाविकपणे कळेल. संतांची आज्ञा पालन करणे म्हणजे संतसेवाच होय. सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनविणे हा खरा सत्समागम आहे.
आपल्याला जीवनांतील ध्येयाचा विसर पडल्यामुळे संत आपल्याला जागे करतात.

Monday, April 13, 2026

देह सावलीप्रमाणे हे, ज्ञान संतांना

देह सावलीप्रमाणे हे, ज्ञान संतांना!ध्रु. 

व्यवहारापुरती 
तयांसी असते देहस्मृती
विकार म्हणुनी कधि न बाधती संतांचिया मना!१

जगाहुनी भिन्न-
तयांसी भक्ति हेंच अन्न 
भक्ति भोजनी, भक्ति प्राशनी, भक्ति पुरे श्वसना!२

लोकांती, एकांती
बिघडत ना शांती
वेदांताचे मर्म खरोखर ठावे या सज्जना!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०४ (१३ एप्रिल) वर आधारित काव्य.

साधुसंत देहास सावलीप्रमाणे मानतात. सावलीला दुःख झाले म्हणून रडणे मूर्खपणाचे आहे; म्हणूनच संतांच्या मनावर सुखदुःखाचा परिणाम होत नाही. संतांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृती असते. संत एकांतात जातात याचे कारण असे की लोकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात व एकांतात भेटणारे निराळे असतात. लोकांतात संतांची शांती बिघडते असे मुळीच नाही, पण एकांतात भेटणाऱ्यांना लोकांतात भेटता येत नाही, म्हणून ते एकांतात जातात. संतांच्या वचनाचा ओढून ताणून अर्थ करू नये, त्याचा सरळ अर्थ घ्यावा. संतांचे ज्ञानच असे असते की त्यांना वेदांताचे मर्म आपोआप कळते.

Sunday, April 12, 2026

साधावी गुरुसेवा, होण्यासी भगवद्भक्ती

साधावी गुरुसेवा, होण्यासी भगवद्भक्ती!ध्रु. 

भगवंताची मूर्ती दिसली 
तीच मानली गुरुमाउली 
गुर्वाज्ञेचे पालन होता संपणार आसक्ती!१

जिज्ञासा जर तीव्र जाहली
प्रगतीसाठी वाटच खुलली
जोपासावी निष्ठा शिष्या तीच महत्तम शक्ती!२

खोल तळाशी जाता जाता
विचारमौक्तिक हाती येता 
अभ्यासी रंगावे - ध्येयाची होण्या प्राप्ती!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०३ (१२ एप्रिल) वर आधारित काव्य.

भगवंताची मूर्ती पहावी व तीच आपली गुरुमाऊली मानावी. संताजवळ राहावे व भक्तीचे साधन करावे.  भगवंताची भक्ती व्हायला गुरुसेवा हे एक मुख्य साधन आहे. अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही, पण संत समागम प्रारब्धाने होतो. संतांना जिज्ञासा मूळचीच असते, आपल्याला ती नाही म्हणून ती उत्पन्न करणे भाग आहे.  काही केल्याशिवायत सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय म्हणजे सत्संगती होय.

Saturday, April 11, 2026

साधने न साधते जे, सत्संगे साधते

साधने न साधते जे, सत्संगे साधते!ध्रु. 

संत राहतात देही
परी ते विदेही 
अहर्निश चित्तावरी राज्य त्यांचे चालते!१

संतवचन परिसावे 
तसे तसे आचरावे
विषय याचना त्यांपाशी जराही न साजते!२

'राम कर्ता' मानतात 
भूती देव पाहतात
संत्संगी साधकासी आत्मज्ञान होते!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०२ (११ एप्रिल) वर आधारित काव्य.

संतांनी जगातील राज्य मिळवली नाहीत, पण त्यांनी स्वतःवर राज्य केले. संतांचे वचन पूर्णपणे समजून ऐकत जावे.  आपल्या आणि संतांच्या कर्मामध्ये फरक आहे.  ' राम कर्ता ' या भावनेने त्यांनी कर्म केले, आपण आपलेपणाने ते करतो, म्हणून आपल्याला कर्म बंधनकारक बनते.  जो विषयाचे प्रेम देईल तो खरा संत नव्हे. साधनांनी जे साधत नाही ते संतांचे सहवासात राहिल्याने साधते. आपण ज्या संताकडे जातो त्याला विषयाचे प्रेम असत नाही, इतकेच नव्हे तर त्याच्या माणसाने विषयांमध्ये मग्न राहिले असता त्याच्या हृदयाला पीळ पडतो.  आपण विषयमग्न असलेले पाहून संतांना वाईट वाटते. जिज्ञासू शिष्य भेटला तर संताना आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते.

Friday, April 10, 2026

कैसे वर्तावे या जगती

सज्जन सांगती कैसे वर्तावे या जगती!ध्रु.

बंधनास कारण 
मनाची ठेवण
सुखदुःख देइ न दुसरा असो द्यावे चित्ती!१

राबावे अखंड
जाळुनी पाखंड 
फलाशा न बाळगावी तीच थोर भक्ती!२ 

उगम जसा रामी 
विलय तसा रामी 
रामार्पण होण्याची ही सांगतात रीती!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०१ (१० एप्रिल) वर आधारित काव्य.

बंधनास खरे कारण परिस्थिती नसून आपल्याच मनाची ठेवण हे आहे. जाणिवेने जैसे घ्यावे। तैसे मनाने सुखदुःख भोगावे। अखंड राखावे अनुसंधान। येणे कर्म होईल सहज रामार्पण। प्रयत्नेविण राहो नये। फळाची आशा ठेवू नये। भगवंताला विसरू नये।

Thursday, April 9, 2026

तुम्ही संत थोर कृपावंत

तुम्ही संत थोर कृपावंत!ध्रु.

मनाचे खंबीर 
सागर गंभीर 
फुलविता जगती वसंत!१

धीर पुरविता
पाठिशी राहता
वानू कैसे सद्‌गुण अनंत!२

आळस असेना 
फलाशा शिवेना 
महीवरी तुम्ही भगवंत!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०० (९ एप्रिल) वर आधारित काव्य.

संत आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतात, परंतु आपला अभिमान आपल्या आड येतो व आपण संतांना नावे ठेवतो.  जगाचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी जो सुखदुःखाच्या जाळ्यात सापडला नाही, त्याच्याकडे जावे. संत कर्म करूनही त्याच्या फळाच्या आशेने लिप्त होत नाहीत.

Monday, April 6, 2026

संत भगवंत चालते - बोलते

संत भगवंत चालते - बोलते!ध्रु.

भय घालविती 
नाम वदविती
घास कैवल्याचे भरविती हाते!१

संतसमागम 
लाभ हा परम
अंतरीची ज्योत जगा उजळीते!२

त्यांची पदसेवा 
अनमोल ठेवा 
संतकृपा भक्ता मार्गासी लावते!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९७ (६ एप्रिल) वर आधारित काव्य.

व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही, त्याला नाही परमार्थ करता येणार. निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू. संतांचा समागम करावा म्हणजे आपण मार्गास लागतो. संत हे देहाचे रोग बरे करीत नसून, त्या रोगाची भीति नाहीशी करतात.  संत हे चालते बोलते देवच आहेत. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे, हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय.  हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे कार्य होय.

Sunday, April 5, 2026

संतसंगे दोष नासताती

संतसंगे दोष नासताती!ध्रु.
 
नामाची आवड 
विषयी नावड  
संत हाती मोक्षसुख देती!१

पळविती पाप 
निवारिती ताप 
संत मेघ होउनि वर्षताती!२

संतवाणी गोड 
अमृताची जोड
संत स्वये निर्भयत्व देती !३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९६ (५ एप्रिल) वर आधारित काव्य.

सत्पुरुषाच्या संगतीत आपले पाप शोषून घेतले जाते आणि पुन्हा तो सत्पुरुष स्वतः शुद्ध तो शुद्धच राहतो. विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते. वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी. संत आपल्या हिताचे सांगतात, पण आपले मन विषयात वावरत असल्याने त्यांचे बोलणे आपल्या मनात पूर्णपणे ठसत नाही.  ज्यास भगवंताचे अधिष्ठान आहे त्याचे कडक बोलणेसुद्धा कोणास लागणार नाही. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे, कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही.

Saturday, April 4, 2026

तोचि संत

सृष्टि राम रूप शिष्य रामरूप
विश्व राम ज्यास तोचि संत!१

देह‌बुद्धि नाही आत्मबुद्धि आहे 
निवांत जो राही तोचि संत!२

दुःख मूळ जाणे सोऽहंभाव बाणे 
खणखणीत नाणे तोचि संत!३

पा‌हुनिया आर्त कळवळे मनात
येतसे धावत तोचि संत!४

दुरित जळावे तिमिर हटावे 
आणवी प्रभात तोचि संत!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९५ (४ एप्रिल) वर आधारित काव्य.

आपले शहाणपण बाजूला ठेवून जो संतास शरण जातो तोच खरा साधक. संत हे पहिल्याने आपल्यातीलच होते, परंतु अनुसंधानाच्या मार्गाने ते वर गेले. आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच आपला शोध करीत आपल्याकडे चालत येतील. संताला कर्म मागेपुढे करता येते पण ते टाळता येत नाही.

Friday, April 3, 2026

प्रभात काली "माधवनाथा" ध्याना बसवावे

प्रभात काली "माधवनाथा" ध्याना बसवावे 
अंतरि आपण भवती आपण सदा जाणवावे!ध्रु.

स्वामी माझ्या मस्तकि राहो सदा वरद हात 
मनास वळवा माझ्या नकळत तुम्ही आत आत 
मन पवनाशी 'नाथा' आपण अलगद जोडावे!१

इंद्रिये न ती मुळीच वैरी बालमंडळी ती 
सत्संगाने श्रवणाने ती अंकित जणु होती 
मना सज्जना सन्मार्गावर आपण आणावे!२

ओवी ओवी वाचत जाता कानी ये वाणी 
प्रवचन स्फुरते आतुन नकळत जरि मी अज्ञानी 
अनुग्रहाने मना माझिया आपण बदलावे!३ 

नित्य नवा दिन गुरुभेटीचा नवाच आनंद 
सांजसकाळी मनास रमवी माझा गोविंद 
'राम कृष्ण हरि' नामामृत मी सदैव सेवावे!४

पाठीवरुनी हात फिरावा प्रेमे निरखावे 
बोलला न जरि संवादाचे सुख मी भोगावे 
स्वरूप आनंदाचे दर्शन नित मज घडवावे!५ 

'अनुसंधानी संतत ठेवा' दुजे नको काही 
मनास माझ्या अभ्यासाचा ध्यास जडुन राही 
गावे भावे मी डोलावे - शांत स्वस्थ व्हावे!६ 

असो कुठेही असो कसाही स्वामी हृदयात 
तेच आतुनी पुढची पुढची दाखवती वाट 
साधनेतल्या आनंदाच्या गावाला जावे!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३०.०९.१९८९

अरे साधका ऊठ तू जाग आता

अरे साधका ऊठ तू जाग आता
तुला जागवी सद्‌गुरुनाथ त्राता
स्वरूपी रमावे, स्वरूपास ध्यावे
प्रभाते मनी माधवा आठवावे!१

तुझ्या अंतरी तो कधी बैसलासे
प्रतीक्षा करी, मूक तो जाह‌लासे
वरी मौन नेत्रांस झाकूनि घ्यावे
प्रभाते मनी माधवा आठवावे!२

जिवाची शिवाशी अशी भेट व्हावी 
विदेहीपणे सर्व काया निवावी
कसा चालला आत सोऽहं स्वभावे 
प्रभाते मनी माधवा आठवावे!३

करी साधना तू मदालस्य सोड
तुझी बंधने तूच जाणूनि तोड 
विवेके विचारे तदाकार व्हावे
प्रभाते मनी माधवा आठवावे!४

जरा हास प्रेमे जरा गोड बोल
तुला पाहता येत आप्तांस डोल 
जना आपलेसे करी प्रेमभावे 
प्रभाते मनी माधवा आठवावे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
स्वामी माधवनाथ यांना केलेली प्रार्थना
१७.०७.१९९३