Wednesday, February 19, 2025

मनी निरंतर भाव असू दे - रामाचा मी, रामाचा!

मनी निरंतर भाव असू दे -
रामाचा मी, रामाचा!ध्रु.

नाम स्मरा हो नाम स्मरा 
स्मरा स्मरा त्या रघुवीरा 
बोध असे हा संतांचा!१

भाव धरा हो भाव धरा 
अपुलासा तो राम करा 
अपार महिमा नामाचा!२

घट्ट धरावे नामासी
पोचविते रामापाशी 
धरा भरवसा नामाचा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ५० (१९ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

मी कोणीतरी आहे असे वाटण्यापेक्षा मी कोणाचा तरी आहे असे वाटणे हिताचे आहे. विषयात राहणे हा आडमार्ग आहे नामात राहणे हा सरळ मार्ग आहे. आपण भगवंताच्या नामात पडून राहावे, त्यात राहिले की कोणीतरी संत भेटतो व आपले काम करतो. संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते. आपण नाम घट्ट धरले तर सुखाने भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू. कोणत्याही नावाने हाक मारली तरी एकच भगवंत ओ देतो. खरेदीपत्रातील नामनिर्देशाने निरनिराळ्या गावी असलेल्या सर्व इस्टेटीची मालकी मिळते, तसे सर्वव्यापी असलेल्या देवाची प्राप्ती त्याच्या नामाने होते. खरोखर, नाम ही कधीही नाहीशी न होणारी इस्टेटच आहे.

No comments:

Post a Comment