Friday, April 2, 2021

एकोबा ठरला विजयी वीर निमिषात..

जनार्दन स्वामी ध्यानात दंग झाले होते. एवढ्यात देवगिरीच्या किल्ल्यावर शत्रूकडून जोरदार हल्ला झाला. तेव्हा एकनाथांनी मोठ्या शौर्याने ते आक्रमण मोडून काढले व अत्यंत निरहंकारीपणाने गुरुसेवा केली.
त्या शौर्याची ही गाथा
---------------------------------------------------------------------


परचक्र पातले अवचित किल्ल्यावरती
गुरु मग्न तेधवा समाधीमधी असती
डगमगला नाही परि सिंहाचा छावा
त्यापुढे क्षुद्र हो वनहत्ती मेळावा...
हातात घेउनी खड्ग लढे जोसात
एकोबा ठरला विजयी वीर निमिषात!

अवसान केवढे, झेप तयाची मोठी
संहारक शस्त्रे निष्प्रभ ठरली पुढती
गुरुकार्य करावे हेच बालका ठावे
निज पराक्रमाने गानिमांते निपटावे
क्षात्रत्च उतरले कुठून अंगागात..
एकोबा ठरला विजयी वीर निमिषात!

ही स्फूर्ति लाभली गुरूपासुनी मजला
पुण्येच तयाच्या कुणि न वधाया धजला
चैतन्य ईश्वरी सकलांते नाचविते
इच्छेविण त्याच्या पान मुळी ना हलते
नम्रता शोभावी नरा गुणाधिक्यात..
एकोबा ठरला विजयी वीर निमिषात!

जे आपण केले गर्व न त्याचा मिरवी
गुरुस्नेह-पताका निष्ठेने तो उभवी 
ही अनासक्ति लाजवी खचित कमलाला
गुरुभक्ति तोषवी हृदयीच्या श्रीहरिला
ऐसा न लाभणे शिष्य लाख शिष्यात...
एकोबा ठरला अद्वितीय निमिषात!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
ऑक्टोबर १९७२
केरवा (चाल पोवाड्याची)

No comments:

Post a Comment