गणपतीच्या लोकप्रियतेचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात; राष्ट्रसंघटनेसाठी त्याने खानेसुमारी केली. मोजले गेलेल्या लोकांचा समूह म्हणजे गण- ज्यांच्याजवळ काही गुण आहेत अशांचीच गणना व्हायची. अशा लोकांचा - गणांचा तो नायक झाला. शिस्त - श्रमविभागणी - सहकार हे गुण त्याने निर्माण केले. शासन आणि जनसामान्य यांच्यात जेव्हढा जिव्हाळा गजाननाने निर्माण केला तेवढा एखाद्यानेच केला असेल - ऐकू याच त्याची महती!
ॐ
गणपती जनप्रिय झालाऽ हो
विघ्नेश जनप्रिय झाला...!ध्रु.
आधी केले मग सांगितले
संघटनेचे जाळे विणले
जनतेत मिसळूनी गेला हो!१
देह ढगळ साधीच राहणी
ज्ञान खोल, बारीक पाहणी
हा वात्सल्याचा सागर हो!२
व्यक्ती व्यक्ती याने गणिली
परिस्थितीची पारख केली
गुण थोडा ही घे मिळता हो!३
स्वतंत्र प्रज्ञाधारी नेता
तो सुखकर्ता तो दुखहर्ता
जिव्हाळा निर्मी जगती हो!४
पराक्रमीही तरी संयमी
न्यायी निष्ठुर परंतु प्रेमी
गणराज्य रमे गुणगानी हो!५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गणेशदर्शन या गणपती वरील काव्या मधून)
केरवा, राग कर्नाटकी
No comments:
Post a Comment