अभंग गीतेचे करिता गायन
मनात चंदन परिमळे!१
मिटता नयन प्रकटे माधव
गुरूंचे वैभव जाणवते!२
देहाचा संबंध क्षणात तुटतो
गोपाल भेटतो गुरूमुळे!३
ठायीच बसावे आपण निवांत
साधावा एकांत स्वरूपाशी!४
स्वतःच स्वतःशी करावा संवाद
भोगावा आल्हाद अनंताचा!५
नव्हेच देह मी घोकावे सतत
सोऽहं ध्यानी रत होऊनीया!६
सिंधूत बिंदु मी नाहीच वेगळा
श्रीकृष्ण सावळा झालो मीच!७
भय ते कशाचे साधता एकत्व
गळाले ममत्व नश्र्वराचे!८
आता ऐसे झाले हिंडावे कोठेही
जेवावे कोठेही विश्व घर!९
ध्येय ध्याता ध्यान संपली त्रिपुटी
देता बालगुटी कृष्णमाय!१०
मनाचा संतोष गीतेचे चिंतन
आत्म्याचे पोषण होत असे!११
होत आपोआप व्यक्तित्व विकास
बळावे विश्वास साधकाचा!१२
ईश्वराला नाही आदि किंवा अंत
शोधावे तयास अंतरंगी!१३
अव्यक्त ईश्वर ध्यानी हे घेऊन
प्रतीक मानून उपासावे!१४
गीताई देतसे कर्तव्य-निर्णय
जीव हो चिन्मय प्रसाद हा!१५
जन्म नि मरण अटळ सर्वांस
आत्म्याचा विनाश संभवेना!१६
गीताई पाजते ज्ञानाचे अमृत
साधक सुव्रत होत असे!१७
फलाशा सोडून कर्माचे सुमन
चरणी वाहून करू पूजा!१८
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९७६/७७
No comments:
Post a Comment