Monday, March 20, 2023

पार्थ भगीरथ ठरला भाग्ये गंगाधर भारत साचा

उगम पावली गीतागंगा मुखातुनी भगवंताच्या
पार्थ भगीरथ ठरला भाग्ये गंगाधर भारत साचा!ध्रु.

थोडी थोडी गावी गीता, कृष्ण, कृष्ण म्हणता म्हणता
जीवनमृत्यू यांची जोडी ये ध्यानी चिंतन घडता
सोऽहं, तो मी - तो मी पाढा म्हणावयाचा नित्याचा!१

भाग्य उदेले गीता स्फुरली रणांगणावर साक्षात
श्रीहरि सांगे निवास अपुला श्रीभक्ताच्या हृदयात
उदात्त उन्नत व्हावे मानस ध्यास एवढा पार्थाचा!२

ओघे आले कर्म करावे तो तर स्वाभाविक धर्म 
यज्ञयोग्यता त्या कर्माला कर्म असे जे निष्काम
फली नसे परि कर्मावरती अधिकारच प्रत्येकाचा!३

गीता सोपी असे कळे ती गाताना ही अनुभूती
सांत्वन करते, मार्गि आणते, मायमाउली प्रेमळ ती
गीता दे संदेश जगाला आत्म्याच्या अमरत्वाचा!४

भयभीताला निर्भय करते, पेजबुड्याला रणवीर
रुधिरी न्हाला तरी न ढळला तो जाणावा खंबीर
सुखदुःखी सम होता येते ग्रंथ साच अनुभूतीचा!५

गीतेचा सहवास घडे ज्या त्याच्या भाग्या नसे तुला
स्वभावास औषध श्रीगीता, अर्जुन कर्तव्या सजला
धर्म तिथे जय संजय सांगे चेला जो श्रीव्यासांचा!६

युगमागुनी युगे लोटली अवीट गोडी गीतेची 
सांगड येते घालायाला धर्माशी व्यवहाराची
मी माझे मावळता सहजच सर्वोदय जगि होण्याचा!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०८.०९.२००४

No comments:

Post a Comment