Friday, December 20, 2024

तोचि खरा आनंद ! सुजनहो, तोचि खरा आनंद!

तोचि खरा आनंद ! सुजनहो, तोचि खरा आनंद!ध्रु.

रामा गावे, रामा ध्यावे 
गाता गाता रामचि व्हावे 
स्मरावा घडीघडी स्वानंद!१

दुःख न निघते कधी जयातुन 
हास्य सुमन ये नकळत उमलुन
निरुपाधिक आनंद! २

आत्मचिंतने लाभे शांती 
ध्यानधारणा ही विश्रांती 
जरी लागला छंद !३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २१९ (६ ऑगस्ट) वर आधारित काव्य.

प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते, कारण त्यास आनंद हवा असतो, आणि हा आनंद भगवंतरूपातच आहे. स्वानंद स्मरणाव्यतिरिक्त जे स्फुरण, तोच विषय समजावा. ज्याने मनुष्य जास्त आनंदी होतो ती खरी सुधारणा होय. विषयापासून होणारा आनंद तो विषय भोगीत असेतोपर्यंतच टिकतो. आनंदाला जे मारक आहे ते न करणे म्हणजे वैराग्य, व आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचे नाव विवेक होय. हास्य हे आनंदाचे व्यक्त रूप आहे. विषयाचा आनंद परावलंबी असतो, तर भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो. कोणती वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद, तेच परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे. थोडक्यात आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधान होय. मनुष्य जगतो आनंदासाठी, पण करतो मात्र दुःख. उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो, पण ते सुख फार क्वचितच मिळते. परमात्म्याच्या दर्शनाचा आनंद साधनांचे कष्ट विसरायला लावतो. जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो, त्याला आनंद खास मिळतो. घेणारा मी जेव्हा देणारा होईल त्यावेळेस स्वतःला खरा आनंद होईल.

No comments:

Post a Comment