प्रपंच अपुरा, समाधान तो देइल कोणाला?
गड्या रे, राम हवा भजला ! ध्रु.
गड्या रे, राम हवा भजला ! ध्रु.
प्रपंच करता देवा विसरे
घसरणीवरी संतत घसरे
प्रभुनामाचा खुंटा बळकट, जो धरि तो वाचला!१
हवे हवे हे कधी सरेना
तृप्ति जिवासी लव लाभेना
नाममेघ परि सदय विझविती तृष्णेच्या ज्वाला!२
जे जे गमले मना सुखाचे
ते ते कारण हो दुःखाचे
अपूर्ण का कधि नरास जगती ने पूर्णत्वाला!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६८ (८ मार्च) वर आधारित काव्य.
प्रपंचाच्या अपूर्ण गोष्टीत केव्हाही समाधान मिळणार नाही.
आत्मप्रचितीने जागरुकता येईल, भाव वाढेल, साधनाला जोर येईल व भगवत्प्राप्ती लवकर होईल. प्रपंच करीत असताना भगवंताची आपल्याला आवश्यकता वाटते का? आपण जर असा विचार केला की, आपण लहानाचे मोठे झालो, विद्या संपादन केली, नोकरी मिळाली, लग्न झाले, मुलेबाळे झाली, घरदार केले, परंतु आपल्याला अजून काहीतरी हवेसे वाटतेच आहे; हे आपले हवेपण केव्हा संपणार? आपण जन्मभर पाहतोच की सर्व काही केले, आयुष्यही संपले, तरी काहीतरी करण्याचे राहूनच जाते. त्याला पूर्णता येत नाही. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की आता ह्यापुढे काही करण्याचे उरले नाही, असे काही वाटत नाही. आता काहीएक नको आहे, जेवढे आहे त्यात समाधान आहे, असे कधी वाटते का? पुढे कसे होईल? हे सर्व टिकेल का? आणखी ह्यात कशी भर पडेल याची विवंचना कायमच. तेव्हा या प्रपंचाच्या गोष्टी अपूर्ण आहेत, त्यातून समाधान लाभेल हे कसे शक्य आहे? ह्या गोष्टी एकातून एक निर्माण होणाऱ्या आहेत. ज्या ज्या म्हणून सुखाच्या गोष्टी मानल्या त्या सर्व जरी एकत्र केल्या तरी त्यातून समाधान निर्माण होणार नाही. ज्या गोष्टी अपूर्णच आहेत त्यातून पूर्णत्वरूप असलेले समाधान कसे लाभेल?
No comments:
Post a Comment