Saturday, December 28, 2024

विषयाचा संग नको नको रामा, लौकिकाची चाड नको नको आम्हा!

विषयाचा संग नको नको रामा,
लौकिकाची चाड नको नको आम्हा!ध्रु.

भोगाची आसक्ति 
देवाची विरक्ति
होते अडचण आमचीच आम्हा!१
 
तुझी तळमळ 
भक्तमत्स्या जळ 
कळूनिया कैसे वळे नच आम्हा!२

तुझे नाम यावे 
गायनी रमावे 
हेचि एक दान देई देई रामा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १३५ (१४ मे) वर आधारित काव्य.

आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते. आपण रामाचे व्हायला अडचण आमचीच. आवडच मुळी आपण विषयाची व लौकिकाची ठेवतो. साहजिकच एकाची आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते. खरे म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळच लागत नाही. वैराग्याला नेहमी विवेकाची जोड लागते. वाईट कर्म कोणाला सांगण्याची आपल्याला लाज वाटते, पण सत्कर्म आपण अभिमानाने ज्याला त्याला सांगत सुटतो. परंतु सत्कर्माचा अहंभाव चांगल्या माणसालाही कुठे नेऊन सोडेल त्याचा पत्ता लागणार नाही. विषयासाठी आपण मरमर काम करतो व तेवढे करूनही सुख लागत नाही; मग भगवंताचे नाव न घेता प्रेम येत नाही हे म्हणणे किती वेडेपणाचे आहे. लग्नाआधी मुलीला दहा पाच जणांना दाखवली तरी लग्न झाल्यावर ज्याप्रमाणे तोच एक नवरा असतो आणि बाकीच्यांची तिला आठवणही राहत नाही, त्याप्रमाणे आम्ही एकदा रामाचे झालो म्हणजे त्याच्याशी लग्न लावले, म्हणजे मग विषयांचे प्रेम कुठे आले? संचिताला थाप द्यावी आणि क्रियमाण भगवंताचे नामात घालावे हे आयुष्याचे खरे सार आहे.

No comments:

Post a Comment