Monday, January 20, 2025

रामा, ध्यास तुझा लागु दे!

रामा, ध्यास तुझा लागु दे!ध्रु.

तळमळ वाढो, वाढो भक्ती
हवी वाटु दे तुझीच प्राप्ती
वेड तुझे लागु दे!१

' मी रामाचा ' वदु दे वाचा
विसर पडू दे निज देहाचा
विश्वात्मक होउ दे!२

निवांत मजसी बसता यावे
मानस माझे विषयि विटावे
तव रंगी रंगु दे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २९९ (२५ ऑक्टोबर) वर आधारित काव्य.

ईश्वराची प्राप्ती व्हावी ही मनापासून तळमळ लागली पाहिजे. ज्यास अशी तळमळ लागली त्याचे निम्मे काम झाले. ज्याप्रमाणे मोठी इमारत बांधताना तिचा पाया अगोदर बळकट असावा लागतो, त्याप्रमाणे खरी तळमळ लागली म्हणजे पुढील कार्य होण्यास फार अडचण पडत नाही व हे होण्यास भाग्य लागते. आपण मनाने रामाचे आहोत असे ठरवून देहाने प्रपंच करावा म्हणजे प्रपंच न बिघडता उलट चांगला होतो.  माझ्याकडे इतके जण येतात पण एकाने तरी मला रामाची प्राप्ती करून द्या म्हणून विचारले आहे काय? मी आलो आहे, तो तुमचे विषय पुरविण्यास आलो आहे काय? समजा, एक जण चोरी करायला निघाला व वाटेत त्यास मारुतीचे देऊळ लागले. तेथे त्याने जाऊन मारुतीला नवस केला की मला जर आज चोरीत यश आले तर मी तुझे देवळावर सोन्याचा मुकुट चढवीन; तर आता सांगा त्या मारुतीने काय द्यावे? त्याने त्याच्या नवसास पावावे असे तुम्हाला वाटते काय? जर नाही, तर तुम्ही विषय मागितले व मी दिले नाहीत तर मला दोष का देता? आपणास नवस करायचा असेल तर असा करावा की ' मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे, म्हणजे समाधान राहील, व दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ नये. ' म्हणजे मग आपणास त्याचे होऊन राहता येईल.

No comments:

Post a Comment