जे झाले ते होउनि गेले
कुढू नको रे, रडू नको!
नामाचा तुज छंद लागला
चाल पुढे पथि अडू नको!ध्रु.
कुढू नको रे, रडू नको!
नामाचा तुज छंद लागला
चाल पुढे पथि अडू नको!ध्रु.
विषय त्यागता
रामी रमता
शांति लाभ तू सोडु नको!१
उठता, बसता
जाता, येता
नित्यनेम तू टाळु नको!२
नाम औषधी
नुरवी व्याधी
शंका कसली धरू नको!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०२.१९७९
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ५५ (२४ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.
आपल्या हातून वारंवार चुका होतात असे श्रींना म्हटले तेव्हा श्री म्हणाले लहान मुलगा चालताना अडखळतो, पडतो किंवा बोबडे बोलतो त्याचे आई-बापास मोठे कौतुक वाटते. त्याप्रमाणे मला या तुमच्या चुकांचे कौतुक वाटते. तसेच चुका सावरण्याच्या तुमच्या प्रयत्नांचेही मला कौतुक वाटते. खरा भक्त कधीही दुःखी कष्टी असत नाही. नेहमी आपल्या समाधानात असतो. भक्तास कसलीही आस नसते त्यामुळे त्याला दुःख नसते. परमात्म्याची इच्छा हीच त्याची इच्छा असते. सगुणाची भक्ती करता करता त्याला मी चा विसर पडत जातो. मी नसून तूच आहेस ही भावना दृढ होत जाते. प्रापंचिकाने सगुण भक्तीने तरून जावे. देहबुद्धी असणाऱ्या माणसाला सगुणावाचून भक्ती करताच येत नाही. भगवंतांना आपण सांगावे की भगवंता तुझी कृपा मजवर असू दे, आणि कृपा म्हणजे तुझे स्मरण मला अखंड राहू दे. आपल्या हातून होणाऱ्या चुकांचे परिमार्जन नामच करू शकते. भगवंताचे नाम हे सर्व रोगांवर रामबाण औषधच आहे. नामाचे हे औषध सतत थेंब थेंब पोटात गेले पाहिजे. गुरुने एकदा सांगितले की तुझे मागचे सर्व गेले पुढे मात्र वाईट वागू नकोस तर शिष्याने ते श्रद्धेने खरे मानावे.
No comments:
Post a Comment