संसाराच्या सागरात घालू नामरूपी होडी!ध्रु.
नको भोगांची लालसा
घेऊ विरक्तीचा वसा
अहंकार छिद्र बुजवू करू तातडी तातडी!१
हाती विवेकाचे वल्हे
संतसद्गुरूंनी दिले
वेगे वल्हवू ही होडी जावयाचे पैलथडी!२
नामासाठी घेऊ नाम
सखा एक आत्माराम
घेऊ देवाजीचे नाम आम्ही भाबडे नावाडी!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २२, (२२ जानेवारी) वर आधारित काव्य.
आपण ऐहिक सुखाचे प्राप्ती करता नाम घेतो किंवा मी नाम घेतो ही अहंकाराची भावना बाळगतो. या उपाधीमुळे आपल्या प्रगतीला बरेच अडथळे येतात म्हणून नामाकरिताच नामस्मरण व तेही सद्गुरु आपल्याकडून करवून घेतात या भावनेने करावे. त्या योगाने अहंकार नष्ट होऊन शरणागती येईल.
शरणागतीला रामनाम हाच रामबाण उपाय आहे. भवसागर तरून जाण्यास नाम हेच साधन आहे. मनुष्यप्राणी भवसागरात गटांगळ्या खात आहे. समुद्रातून तरून जाण्यास जशी नाव, तसं भवसागरातून तरून जाण्याला भगवंताचे नाव आहे. फक्त संसाररूपी समुद्राचे पाणी नामरूपी नावेत येऊ देऊ नये. म्हणजेच कोणत्याही प्रापंचिक अडचणीमुळे नामात व्यत्यय येऊ देऊ नये. तसेच नामाचा उपयोग संसारातील अडचणी दूर होण्याकरताच व्हावा ही बुद्धी न ठेवता नामा करिताच नाम घ्यावे म्हणजे नावेत पाणी न शिरता सुखरूपपणे पैलतीराला म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचता येते. वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचे नाव घेतले तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही.
No comments:
Post a Comment