रामनामाविना राम भेटेच ना!
राम भेटेच ना!ध्रु.
राम भेटेच ना!ध्रु.
प्रपंच कैसा आहे कळते
भगवंताची प्राप्ती होते
साद नच घालता माय धावेच ना!१
नामासम आधार न दुसरा
नामाधारे व्याधी विसरा
ध्यास नच लागता सिद्धि लाभेच ना!२
नाम आपुला स्वभाव व्हावा
रामनाम श्रांतास विसावा
नामस्मरणाविना देव गवसेच ना!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१२.०१.१९७४
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२ (१२ जानेवारी) वर आधारित काव्य.
राम राम म्हटल्या शिवाय राम भेटणे शक्य नाही. व्यवहारातही हाच आपला अनुभव आहे. बाकी सर्व केले पण नाम नाही घेतले तर काही उपयोग होत नाही. म्हणून नाम घेणे जरूर आहे. नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी. अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात. ते नाम मंगलात मंगल व अत्यंत पवित्र आहे. भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे; एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी. भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरूरी आहे; नंतर भगवंतावाचून आपल्याला दुसरा आधार नाही म्हणून नाम घ्यायला पाहिजे आणि शेवटी भगवंताच्या दर्शनानंतर नाम सवयीने आपोआप येते. जो नामस्मरण करील व अनुसंधान ठेवील त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल. नामाकरिता नाम घ्या की त्यात राम आहे हे कळेल. नाम घेत असता, जे घडेल ते चांगले व आपल्या कल्याणाचे आहे असा भरवसा ठेवावा. जसे इमारतीच्या पायालाही दगड व कळसालाही दगडच असतो, तसेच साधकांना व सिद्धांनाही नाम हेच साधन आहे. आपले जीवन देवाच्या हाती आहे व देव नामाच्या स्वाधीन आहे हे पक्के लक्षात ठेवा.
No comments:
Post a Comment