Saturday, January 25, 2025

रामाचे - रामाचे ऽऽ अनुसंधान राहू दे!

रामाचे - रामाचे ऽऽ
अनुसंधान राहू दे!ध्रु.
 
राम स्मरता 
भोग भोगता 
सुशांत होऊ दे!१

रामच कर्ता
तोच करविता 
दर्शन देऊ दे!२ 

राम कीर्तनी 
मुळास पाणी 
विकास साधू दे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२५.०१.१९७९ 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २५ (२५ जानेवारी) वर आधारित काव्य.

नामस्मरण हे प्रपंचाकरिता, म्हणजे तो चांगला व्हावा म्हणून नाही तर प्रपंचाची आसक्ती कमी करण्यासाठी आहे. आपल्याच कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागतात हे खरे, पण भोग आले की आपल्या मनाला चैन पडत नाही. म्हणून मनाला भगवंताच्या स्मरणात गुंतवून ठेवले असता आपले समाधान टिकते. आपल्या सध्याच्या अवस्थेमध्ये भगवंताच्या इच्छेने घडायचे ते घडते, असे मानणे किंवा भगवंत चांगले करील असा विश्वास ठेवून वागणे हेच सोपे जाईल. विषय कसा सुटेल? मन एकाग्र कसे होईल? हे न कळले तरी चालेल. सोडण्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा धरण्याच्या गोष्टीचा म्हणजे अनुसंधानाचा अभ्यास करावा. झाडाच्या मुळाला पाणी घातले की त्याच्या सर्व भागांना ते पोहोचते, तसे भगवंताचा विसर पडू न दिला तर सर्व काही होते. दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे, तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यास त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे.

No comments:

Post a Comment