Wednesday, August 2, 2017

प्रसाद पुष्पे - वज्र व्हावे या मनाचे.

प्रसाद पुष्पे - वज्र व्हावे या मनाचे.

लेचेपेचे मन काय कामाचे?
चंचल मन माणसाला नाचवते. त्याची धिंड काढते. गोविंदाचे पायी स्थिरावलेले मन त्याला आनंद देते.
मन हे व्रतांनी, नियमांनी बांधून घ्यावे.
स्वातंत्र्यवीरांचे मनच पाहा ना!
स्वातंत्र्यप्राप्ती हेच ध्येय असणारे ते म्हणतात.
"की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने,
लब्धप्रकाशइतिहास निसर्गमाने -
जे दिव्यदाहक म्हणोनि असावयाचे
बुद्ध्याची वाण धरिले करि हे सतीचे!"

कणखर मनापुढे काळाचेही काही चालत नाही.
"बचेंगे तो और भी लडेंगे!" दत्ताजी शिंदेंची वाणी.
बलाढ्य रावणावर वनवासात असलेल्या राम लक्ष्मणाना विजय मिळवता आला. मनाची साथ लाभली.

या मनाला ज्याची गोडी लावावी त्याला ते चिकटते. गुळाच्या ढेपेला मुंगळा चिकटावा तसे!

समर्थांनी सज्जन मनाला भक्ति पंथानेच जाण्याचा उपदेश केला आणि त्याला विषयापासून विरक्त आणि रघुनाथाच्या ठिकाणी अनुरक्त करून दिले.

मनाला श्वासोच्छ्वासाच्या गतीशी जोडले आणि धरिता सो सोडता हम् शिकवले की आत चाललेला अजपाजप जाणवतो. हाच परमानंद.

भगवंताच्या ऐश्वर्याचा अनुभव येण्याला गीतेतील ११ वा अध्याय विश्वरूपदर्शन योग वारंवार वाचावा आणि लगेच १२ वा भक्ति योगाचा अध्याय म्हणावा.

संतांचे मेणाहून मऊ असे अंतःकरण प्रसंगी वज्राहून कणखर होते ते केवळ अंतरंग साधनेमुळेच.

उपासनेला दृढ चालवावे! ते यासाठीच.

निश्चयाचे बळ। तुका म्हणे तेचि फळ।

लेखक : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment